नागरिकांकडून संताप : ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर टीका
रस्त्याकडेला ठेवल्या गेलेल्या सिमेंट काँक्रीटच्या लाद्या आडव्या पडलेल्या स्थितीत. (अक्षंदा राणे)
वास्को : एमईएस चौक ते दाबोळी-बोगमाळो चौक दरम्यान उभारण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाचे काम सध्या चर्चेचा विषय बनले आहे. कारण अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेमुळे तेथील रस्ते अपघातप्रवण बनले आहेत. याच कामाशी संबंधित ठेकेदाराविरोधात वास्को पोलिसांनी गुन्हा दाखल केला असतानाही, परिस्थितीत काहीही सुधारणा झालेली नाही. सोमवारी सकाळी एक दुचाकीस्वार रस्त्यावरील उंच-सखल भाग आणि खड्ड्यांपासून बचाव करताना तोल जाऊन पडला आणि त्याच्या पायाचे हाड मोडले.
उड्डाण पुलाच्या कामामुळे आतापर्यंत दोन नागरिकांनी प्राण गमावले असून अनेक अपघातांचे सत्र सुरूच आहे. २८ तारीखला झालेल्या अपघातात मारुती जाधव यांचा मृत्यू झाल्यावरच पोलिसांनी ठेकेदार, अभियंता आणि पर्यवेक्षकांवर गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर गोवा कॅन व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यानंतर काही ठिकाणी नाममात्र सुरक्षा उपाय राबविण्यात आले. मात्र, एकूण स्थिती पाहता हाच निष्काळजीपणाचा नमुना सातत्याने दिसून येतो.
काम चालू असताना वाहतुकीचा गोंधळ
काम सुरू असताना कंत्राटदाराच्या वाहनांची भरधाव ये-जा चालू असते, मात्र वाहनचालकांना सूचित करण्यासाठी कोणताही कर्मचारी किंवा सुरक्षा यंत्रणा तेथे नसते. खोदकाम केलेल्या भागावर बॅरिकेड्स लावणे, सूचना फलक लावणे, वाहतूक व्यवस्थापन करणे हे सर्व नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
दाबोळी-बोगमाळो चौक परिसरात दुभाजकासाठी लावण्यात आलेल्या काँक्रीटच्या लाद्या वाहनांच्या धक्क्याने कोसळतात. हे चित्र देखील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक आहे. सर्विस रस्ते एकमेकांशी योग्यरित्या न जोडल्याने अनेक दुचाकीस्वारांना धक्के बसून नियंत्रण सुटण्याचे प्रकार घडत आहेत.
जबाबदारीचे पालन अपेक्षित
या पार्श्वभूमीवर ठेकेदाराने तातडीने सुधारणा करावी, अधिक खबरदारी घ्यावी व भविष्यातील संभाव्य अपघात टाळावेत अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. संबंधित विभागांनी याची गंभीर दखल घ्यावी, अशी अपेक्षा आता जनतेकडून व्यक्त केली जात आहे.