बाजू ऐकून अहवाल सादर : नड्डांच्या निर्णयानंतर पुढील कार्यवाही
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडील आदिवासी कल्याण खात्याच्या कारभारावर केलेल्या टीकेप्रश्नी आपण मंत्री गोविंद गावडे यांच्याशी सोमवारी चर्चा केली. त्यांची बाजू ऐकून घेऊन त्यासंदर्भातील अहवाल भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पाठवण्यात आला आहे. नड्डा जो निर्णय घेतील, त्यानुसार पुढील कार्यवाही होईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
आदिवासी कल्याण खाते आणि ‘उटा’ संघटनेतर्फे गेल्या रविवारी फोंड्यात आयोजित प्रेरणा दिन कार्यक्रमात मंत्री गावडे यांनी आदिवासी कल्याण खात्याच्या कारभारावर सडकून टीका केली होती. पणजीतील श्रमशक्ती भवनाखाली कंत्राटदारांकडून ‘घेवाण-देवाण’ होऊन फायली वर पोहोचवल्या जातात, असे म्हणत या खात्यात भ्रष्टाचार सुरू असल्याचा अप्रत्यक्ष आरोपही त्यांनी केला होता. आदिवासी कल्याण खाते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे असल्यामुळे गावडेंनी केलेल्या आरोपांवरून सत्ताधाऱ्यांतील वरिष्ठ नेत्यांनी गावडेंवर टीका केली. तर, हीच संधी साधून विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले. या टीकेमुळे संतापलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जबाबदार मंत्र्यांनी बेजबाबदार वक्तव्ये करू नये, असे म्हणत मंत्री गावडे यांच्यावर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले होते. तर, त्याच काळात गोव्याबाहेर असलेल्या दामू नाईक यांनीही गावडेंशी चर्चा करून त्यांच्यावर कारवाई करण्याची हमी दिली होती.
दरम्यान, गेल्या गुरुवारी नागपुरातून गोव्यात आल्यानंतर दामू नाईक त्याच दिवशी सायंकाळी पं. दिनदयाळ उपाध्याय जयंती कार्यक्रमानिमित्त दिल्लीला गेले होते. तेथून रविवारी रात्री ते गोव्यात परतले. सोमवारी दुपारी त्यांनी मंत्री गावडे यांची भेट घेऊन त्यांची बाजू ऐकून घेतली आणि तसा अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठवला आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडून गावडेंवर नेमकी कोणती कारवाई होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
राज्य समिती नसल्यामुळे अहवाल पक्षश्रेष्ठींकडे
पक्षाच्या शिस्तीचा भंग करणाऱ्या मंत्री, आमदारांवर तत्काळ कारवाई करण्याचा अधिकार राज्य समितीला असतो. परंतु, पक्षाची राज्य समिती अजून स्थापन झालेली नाही. त्यामुळे गोविंद गावडेंबाबत मी एकटाच निर्णय घेऊ शकत नसल्याने यासंदर्भातील अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आल्याचेही दामू नाईक यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले नाहीत!
फोंड्यातील प्रेरणा दिन कार्यक्रमात आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर अजिबात भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नाहीत. आपण जे बोललो ते आदिवासी कल्याण खात्याच्या कारभाराच्या अनुषंगाने होते. खात्याच्या कारभाराचा आदिवासी समाजाला फटका बसत आहे. समाजाच्या तळमळीतूनच आपण त्यावर भाष्य केले, अशाप्रकारची बाजू मंत्री गोविंद गावडे यांनी आपल्यासमोर मांडल्याचे दामू नाईक यांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना स्पष्ट केले.