रंजिता पै यांची माहिती : महिला आयोगाकडे महिन्याला सरासरी १५ तक्रारी
पणजी : राज्य महिला आयोगाकडे सध्या जी प्रकरणे येत आहेत, त्यातून पती-पत्नींमध्ये वाढत असलेल्या भांडणांमागे मोबाईल हे सर्वात मोठे कारण बनत असल्याची माहिती आयोगाच्या अध्यक्ष रंजिता पै यांनी मंगळवारी ‘गोवन वार्ता’शी बोलताना सांगितले.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा महिला आयोगाकडे येणाऱ्या प्रकरणांत घट झालेली आहे. सद्यस्थितीत महिन्याला सरासरी पंधरा प्रकरणे आयोगाकडे येतात. त्यातील सर्वाधिक प्रकरणे घरगुती हिंसाचाराची असतात. घरगुती कारणांसह इतर काही कारणांमुळेही पती आणि सासरच्या इतर मंडळींकडून महिलांवर अत्याचार केले जातात. यात सध्या मोबाईलचाही समावेश झाल्याचे गेल्या काही महिन्यांतील प्रकरणांतून दिसून आल्याचेही पै यांनी सांगितले.
महिला आयोगाकडे येणाऱ्या प्रकरणांत आणखी घट व्हावी, यासाठी आयोगाकडून वेळोवेळी समाजात जागृती करण्यात येत आहे. त्यासाठी विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येत आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत, असेही पै म्हणाल्या.
दरम्यान, विद्या गावडे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राज्य सरकारने रंजिता पै यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक केली. पण, त्यानंतर काही महिने आयोगावर इतर सदस्यांची नेमणूक झाली नव्हती. आयोग पूर्ण झाल्यानंतर पै यांनी प्रलंबित ३२२ प्रकरणांवर जलदगतीने सुनावण्या घेऊन ती प्रकरणे निकाली काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे पहिल्याच टप्प्यात अनेक प्रकरणे सुटली होती.
३६८ प्रकरणे निकाली
- महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आपण ताबा घेतला त्यावेळी आयोगात ३२२ प्रकरणे प्रलंबित होती. त्यानंतर मार्च २०२५ पर्यंत २१० प्रकरणांची वाढ झाली. त्यातील जुनी आणि नवी मिळून ३६८ प्रकरणे निकाली काढण्यात आल्याचे रंजिता पै यांनी सांगितले.
- जुन्यापैकी काही प्रकरणे अनेक वर्षांपासून सुरू होती. त्या प्रकरणांतील महिलांना प्रकरणे पुढे चालवायची नव्हती. अशी प्रकरणे मिटवण्यात आलेली आहेत, असेही त्यांनी नमूद केले.