जैवविविधतेला धोका : ‘रॅली फॉर बेळगाव’तर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन
बेळगाव : म्हादई आणि कळसा-भांडुरा प्रकल्पांमुळे पश्चिम घाटातील जैवविविधता आणि वनसंपदेला गंभीर धोका निर्माण झाला असून, संपूर्ण उत्तर कर्नाटकचे रूपांतर पावसाअभावी वाळवंटात होण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर, या प्रकल्पासह हिडकल जलाशयाचे पाणी हुबळी-धारवाडकडे वळवण्याच्या प्रकल्पाविरोधात पर्यावरणप्रेमी संघटना आणि शहरवासीयांनी मंगळवारी सकाळी 'रॅली फॉर बेळगाव' हे भव्य जनांदोलन छेडले. मोर्चेकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करून प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली.
खानापूरसह बेळगाववासीयांसाठी उत्तर कर्नाटकाची जीवनवाहिनी असलेल्या म्हादई नदीचे रक्षण करण्यासाठी आयोजित या भव्य जनआंदोलनासाठी मंगळवारी सरदार हायस्कूल मैदानावर मोठ्या संख्येने नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, निसर्गप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय स्तरावरील १७ वर्षीय पर्यावरणीय कार्यकर्ता रिधिमा पांडे म्हणाल्या, आपल्या नद्या, जंगले आणि परिसंस्था वाचवण्यासाठी अनेक वर्षांपासून परिश्रम घेतले जात आहेत. याला पाठिंबा देण्यासाठी आज मी येथे आले आहे. जंगलाविना झाडे व पाणी नसेल तर मनुष्याचे काहीही अस्तित्व नाही. मानवजातीच्या हितासाठी जंगलांचे जतन करणे आवश्यक असून, म्हादईचे पाणी वळवल्यास तेथील जंगल नष्ट होणार असल्यामुळे संबंधित प्रकल्प रद्द करण्याची मागणी त्यांनी केली.
'म्हादाई वाचवा, आमचे भविष्य वाचवा' या घोषवाक्याखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांच्या हातात 'म्हादाई वाचली तर मलप्रभा वाचेल', 'आमची म्हादाई वळवू नका तिला मुक्त वाहू द्या', 'आमचे पाणी आमचा हक्क... म्हादाई वळवल्यास आमची दुर्दशा' असे जनजागृती फलक होते. या मोर्चामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मोर्च्याची सांगता झाली. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन सादर करण्यात आले.
आता गोमंतकीयांनी कृती करावी : घाटे
म्हादईचे पाणी वळवू नये यासाठी बेळगावकर एक झाले आहेत. कर्नाटकात वीसहून अधिक मोठ्या नद्या आहेत. असे असूनही तेथील जनता म्हादईचा प्रवाह वळवू नये यासाठी आंदोलन करत आहे. या आंदोलनाला गोमंतकियांनी पाठिंबा दिला पाहिजे. सुमारे ४६ टक्के गोवा पाण्यासाठी म्हादईवर अवलंबून आहे. येथे व्याघ्र प्रकल्प घोषित झाल्यास न्यायालयात गोव्याची बाजू बळकट होऊ शकते. त्यासाठी आता शांत न राहता गोमंतकीयांनीही याबाबत ठोस कृती करणे आवश्यक आहे, असे आवाहन राजन घाटे यांनी मंगळवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी शंकर पोळजी व अन्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.