भरपाईसाठी ३२३ शेतकऱ्यांचे अर्ज

दक्षिण गोव्यात शेतीचे मोठे नुकसान

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd June, 01:11 am
भरपाईसाठी ३२३ शेतकऱ्यांचे अर्ज

पणजी : दक्षिण गोव्यात मान्सूनपूर्व पावसामुळे शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईसाठी आतापर्यंत एकूण ३२३ अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी दिली आहे. अर्जांची आणि नुकसानीची तपासणी केल्यानंतर शेतकऱ्यांना योग्य भरपाई देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यंदा मान्सूनच्या आगमनापूर्वी राज्यात मुसळधार पाऊस पडला. या पावसाचा सांगे, केपे, काणकोण, सासष्टी आणि फोंडा तालुक्यातील शेतकऱ्यांना फटका बसला. यंदा कापणी सुरू असतानाच पाऊस सुरू झाला. आठवडाभर पाऊस पडल्यानंतर शेतात पाणी साचून राहिले. त्यामुळे यंदा कापणी केलेली शेते कुजली आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी विभागीय कृषी कार्यालयात भरपाईसाठी अर्ज केले आहेत. वरील तालुक्यातून एकूण ३२३ अर्ज आले आहेत. पात्र शेतकऱ्यांना शेतकरी आधार निधीअंतर्गत भरपाई मिळणार आहे. प्रति हेक्टरप्रमाणे ४० हजार भरपाई दिली जाणार आहे. अर्जांची तपासणी केल्यानंतर, कृषी खात्याचे एक पथक शेतीची पाहणी करेल. जर नुकसान झाल्याचे सिद्ध झाले तर अर्ज मंजूर केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

उत्तर गोव्यातून भरपाईसाठी अर्ज नाही

याउलट, उत्तर गोवा जिल्ह्यातील शेतांची कापणी साधारणतः मे महिन्याच्या सुरुवातीला पूर्ण होते. त्यामुळे येथील बहुतांश शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पाऊस सुरू होण्यापूर्वीच आपली लावणीची कामे पूर्ण केली होती. याच कारणामुळे उत्तर गोव्यातून नुकसान भरपाईसाठी अद्याप कोणताही अर्ज आलेला नाही, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.