मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत मंत्री, आमदारांची ‘चुप्पी’

फेरबदल म्हणजे ‘एंटरटेन्मेंट प्रोग्राम’ : हळर्णकर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd June, 01:08 am
मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत मंत्री, आमदारांची ‘चुप्पी’

पणजी : गेल्या अडीच वर्षांपासून राज्यात वारंवार चर्चेला येत असलेल्या मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत बोलणे मंत्री, आमदारांनी टाळले आहे. मंत्री हळर्णकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना मंत्रिमंडळ फेरबदलाचा विषय म्हणजे ‘एंटरटेन्मेंट प्रोग्राम’ असल्याचे वक्तव्य केले. तर, आमदार दिगंबर कामत, मायकल लोबो यांनी आपल्याला फेरबदलाबाबत काहीच माहीत नाही, असे स्पष्ट केले.             

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकारला ११ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने राज्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंतकुमार गौतम यांनी सोमवारी पणजीतील पक्ष कार्यालयात मंत्री आणि भाजप आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत मंत्रिमंडळ फेरबदलाचा विषय चर्चेला येण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत होती. परंतु, बैठकीत यावर चर्चा झाली नाही. त्याआधी याबाबत मंत्री हळर्णकर यांना छेडले असता, राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यापासून हाच विषय सुरू आहे. पण, हा विषय ‘एंटरटेन्मेंट प्रोग्राम’ इफ्फीसारखाच असल्याचे ते म्हणाले. तर, आमदार दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांनीही यासंदर्भात आपल्याला काहीही माहिती नाही. फेरबदलाचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे असे सांगत, यावर बोलणे टाळले.

मंत्रिमंडळातील फेरबदलाचा निर्णय मुख्यमंत्री आणि भाजपचे केंद्रीय नेते घेतात. त्यामुळे हा विषय सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून आहे. - सदानंद शेट तानावडे, खासदार, राज्यसभा