काँग्रेस आक्रमक : पोलीस महासंचालकांना निवेदन सादर
पणजी : दाबोळी येथे रस्त्याच्या असुरक्षित कामामुळे झालेल्या दोन मृत्यूंच्या प्रकरणी काँग्रेसने तीव्र भूमिका घेतली आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी एमव्हीआर कंपनीला या मृत्यूंसाठी जबाबदार धरले असून, कंपनीच्या संचालकांविरुद्ध खुनाच्या कलमांतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यासह अटकेची मागणी केली आहे. १० दिवसांत गुन्हा दाखल न झाल्यास पोलीस महासंचालक (डीजीपी) आलोक कुमार यांना घेराव घालण्याचा इशारा पाटकर यांनी दिला. काँग्रेसने डीजीपींची भेट घेऊन त्यांना निवेदनही सादर केले आहे.
काँग्रेस सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत पाटकर यांच्यासोबत दक्षिण गोव्याचे खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस, शरद चोपडेकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. पाटकर यांनी सांगितले की, एमव्हीआर कंपनीच्या निष्काळजीपणामुळे दाबोळीत ४ मार्च २०२५ रोजी वीज कर्मचारी स्वप्नील चिंदरकर आणि २८ मे रोजी मारुती जाधव या दोन व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले. कंपनीच्या संचालकांविरुद्ध १० दिवसांच्या आत खून (कलम ३०२) आणि निष्काळजीपणामुळे मृत्यू (कलम ३०४अ) या कलमांखाली गुन्हा दाखल करावा. तसेच मृतांच्या कुटुंबियांना योग्य भरपाई देण्यात यावी, अशी मागणी पाटकर यांनी केली.
वाहतूक मंत्र्यांच्या अटकेची मागणी
खासदार कॅ. फर्नांडिस यांनी राज्यातील वाहतूक मंत्र्यांवर गंभीर आरोप केले. वाहतूक मंत्र्यांच्या दबावामुळेच एमव्हीआर रस्त्यांची कंत्राटे घेत आहे. एमव्हीआरच्या कामांमुळे अपघात होऊन जीवितहानी होते. त्यामुळे वाहतूक मंत्र्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाईची मागणी फर्नांडिस यांनी केली.
विमानाच्या इंधन चोरीची चौकशीची मागणी
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी दाबोळी विमानतळावरील विमानाच्या इंधनाची चोरी होत असल्याचे सांगून या चोरीची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे. तर खासदार फर्नांडिस यांनी हा प्रस्ताव संसदेत उपस्थित करणार असल्याचे सांगितले.