मडगाव : कोकण रेल्वेचा वेग पावसात ताशी ४० किमीवर

रुळांवर १०० मिमीपेक्षा अधिक पाणी साचल्यास तात्पुरती थांबवली जाणार गाड्यांची सेवा.

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
04th June, 12:15 pm
मडगाव : कोकण रेल्वेचा वेग पावसात ताशी ४० किमीवर

मडगाव : कोकण रेल्वेने पावसाळ्यातील सुरक्षिततेसाठी खास तयारी केली असून, १५ जूनपासून २० ऑक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. मुसळधार पावसात आणि कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत रेल्वेचा वेग ताशी ४० किमीवर ठेवण्याच्या सूचना लोको पायलटांना देण्यात आल्या आहेत. रुळांवर १०० मिमीपेक्षा अधिक पाणी साचल्यास गाड्यांची सेवा तात्पुरती थांबवली जाणार असून, पाणी कमी झाल्यानंतरच ती पुन्हा सुरू केली जाईल, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

सुरक्षिततेसाठी खास उपाययोजना :

मान्सून हंगामात प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वे सेवेतील व्यत्यय कमी करण्यासाठी ड्रेनेजची सफाई, दरडींची तपासणी, ६३६ गस्त कर्मचारी, आपत्कालीन यंत्रणा तयार ठेवण्यात आली आहेत. रत्नागिरी, चिपळूण, वेर्णा आणि कणकवली येथे उत्खनन यंत्रे आणि अपघात मदत व्हॅगन्स तैनात करण्यात आले आहेत.

आपत्कालीन संपर्क यंत्रणा सज्ज :

लोको पायलट व गार्डसाठी वॉकी-टॉकी, व्हिएचएफ सेट्स, तर प्रत्येक १ किमी अंतरावर आपत्कालीन संप्रेषण सॉकेट्स बसवले आहेत. पावसाची पातळी मोजण्यासाठी माणगाव, रत्नागिरी, मडगावसह ९ ठिकाणी स्वयंरेकॉर्डिंग पर्जन्यमापक कार्यरत आहेत. प्रमुख नद्यांवर पूर इशारा प्रणाली, तसेच वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी अ‍ॅनिमोमीटर बसवण्यात आले आहेत.

२४x७ नियंत्रण व वैद्यकीय कक्ष सज्ज :

बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथे २४ तास नियंत्रण कक्ष, तर चिपळूण, वेर्णा, मडगाव, कारवार आणि उडुपी येथे वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. प्रवाशांनी गाड्यांची स्थिती www.konkanrailway.com किंवा १३९ क्रमांकावरून तपासावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कोकण रेल्वेने सुरक्षित, वेळेवर आणि अडथळामुक्त प्रवासासाठी पावसाळ्यात विशेष तयारी केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.