प्लास्टिक कचऱ्याची समस्या

पर्यावरणीय साक्षरता आमच्याकडे खूप कमी प्रमाणात आहे, ही खेदजनक बाब आहे. प्लास्टिक कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी आवश्यक नियोजन आणि कृती करणे गरजेचे आहे.

Story: विचारचक्र |
03rd June, 10:34 pm
प्लास्टिक कचऱ्याची समस्या

यंदा जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्लास्टिक कचऱ्याची जी गंभीर समस्या निर्माण झाली आहे, तिला तोंड देण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. मानवी समाजाच्या जीवनात प्लास्टिकच्या शोधाने प्रचंड क्रांती आणली होती. जंगलातील लाकडांची तोड करण्यापासून परावृत्त व्हावे म्हणून प्लास्टिकचा पर्याय समर्थपणे उपलब्ध झाला होता, त्यावेळी कोणालाही स्वप्नात वाटले नव्हते की प्लास्टिक कचऱ्याची समस्या उभी राहून प्रदूषण आपले जगणे संकटग्रस्त करील.

पावसाळ्यात साचलेला, कुजलेला केरकचरा जाळला जायचा. परिसर स्वच्छ, निर्मळ आणि सुंदर रहावा म्हणून दिवाळीच्या पूर्वसंध्येला प्रयत्न केला जायचा. अर्ध शतकापूर्वी गोव्यात आजच्यासारखे गल्लोगल्ली, गावोगावी निर्माण झालेले नरकासुराचे प्रस्थ नव्हते आणि त्यामुळे गवत, केरकचरा लोक नरकासुर म्हणून प्रतिकात्मकरीत्या जाळत असल्याने आजच्यासारखे पर्यावरणाचे प्रदूषण अभावाने व्हायचे. परंतु आज नरकासुराचे प्रस्थ एका संस्थानात परिवर्तित झालेले असून उत्सवाच्या नावाखाली खंडणीबहाद्दर मानवी मूल्ये पायदळी तुडवत असताना हवा, ध्वनी, जल प्रदूषणाची समस्या निर्माण करत असतात. आपल्या घटनेने प्रदान केलेल्या धार्मिक स्वातंत्र्याचा गैरफायदा घेत, उत्सवाच्या नावाखाली आम्ही पर्यावरणाची समस्या निर्माण करून आमचे जगणे संकटग्रस्त करत आहोत. भाद्रपदात साजऱ्या करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपती मूर्ती, प्लास्टिक, थर्माकोलचा सजावटीसाठी होणारा बेसुमार वापर यामुळे उत्सवानंतर निर्माण होणारा घनकचरा नदीनाल्यात विसर्जित बेशिस्तीत केला जातो. आपण जे प्लास्टिक नदीनाल्यात टाकतो, त्याचा वाईट परिणाम मत्स्य संपदेवर होतो, याचा अजिबात विचार केला जात नाही आणि त्यामुळे गोड्या पाण्यातल्याच नव्हे तर खाऱ्या पाण्यातल्या मत्स्य संपदेच्या पोटात प्लास्टिकचे सूक्ष्म कण आढळलेले आहेत.

आज संपूर्ण पृथ्वीच वाढत्या कर्बवायूच्या आणि तत्सम प्रदूषणकारी घटकांच्या प्रादुर्भावाच्या ताणाखाली तापमानवाढ आणि हवामानाच्या लहरीपणामुळे संकटांच्या खाईत लोटली जात आहे. त्यामुळे हवा, ध्वनी, जल प्रदूषणाच्या वाढत्या समस्यांवर नियंत्रण प्रस्थापित करण्याची नितांत गरज निर्माण झालेली आहे. प्लास्टिक, रबर, थर्मोकोल, प्लास्टर ऑफ पॅरिस आणि अन्य प्रकारच्या घनकचऱ्याने गोव्यातील रस्ते, महामार्ग, सागर किनारे, झरे, तलावासारखी स्थळे प्रदूषणाच्या खाईत लोटण्याबरोबर तिथला परिसर विद्रूप करून टाकलेला आहे. आज नाना तऱ्हेच्या रोगांना कारण ठरणाऱ्या मच्छरांची मोठ्या प्रमाणात जी पैदास होते, त्याला प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या आणि तत्सम बाबी जबाबदार आहेत. पावसाचे पाणी तेथे साचत असल्याने मच्छरांची पैदास होते आणि त्यामुळे रोगराईचा प्रसार होत असतो. बऱ्याच ठिकाणी केरकचरा गोळा करून जाळण्याचे प्रकार उद्भवत आहेत. प्लास्टिक कचऱ्याला जाळल्याने प्रदूषित आणि जहरी हवा सजीवमात्रांच्या अस्तित्वाला मारक ठरत असते, याची जाणीव बऱ्याच जणांना नसते.

आज आपण ज्या वस्तूंचा मोठ्या प्रमाणात वापर करतो, त्या प्लास्टिकच्या वेष्टनात उपलब्ध असतात आणि त्यामुळे बिस्कीट, ब्रेड आणि तत्सम पदार्थांना असलेल्या प्लास्टिक वेष्टनाला मिळेल तेथे लोक टाकतात आणि त्यामुळे कुठल्याही जंगल प्रदेशात किंवा नदीच्या पात्रात हा कचरा बिनधास्तपणे टाकला जातो. आपल्या आततायी कृत्यांमुळे प्रदूषणाचे साम्राज्य निर्माण करतो आहे, याचे साधे भानही आपणाला नसते, त्यामुळे ठिकठिकाणी कचऱ्याचे भले मोठे डोंगर सर्वत्र निर्माण झालेले दिसून येतात.

दरवर्षी २३ दशलक्ष टन कचरा समुद्र, नदीनाल्यात आपल्याकडून टाकला जातोय आणि त्यामुळे पर्यावरणीय परिसंस्थेची जी अपरिमित हानी होत आहे, त्याबाबत आम्ही बेफिकीर आहोत. खरेतर दरदिवशी २,००० ट्रक भरेल इतका कचरा निर्माण करून, आपल्याकडून जलस्त्रोतांत टाकला जातोय आणि त्यामुळे जे प्रदूषण होतेय त्याविषयी आपणाला माहिती असूनही आम्ही आमच्या वागण्यात सुधारणा घडवण्यास तयार नसतो.

सध्या गोव्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने तयारीत असणारी युवा पिढी सजावटीसाठी प्लास्टिक थर्माकोल, रबर वापरत असून, त्यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याऐवजी आपण मिळेल तेथे टाकत आहोत. आपण दिवाळीच्या कालखंडात ज्या नरकासुराचे दहन करणार आहोत, त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत जाणीव असूनही त्या बाबींवर नियंत्रण प्रस्थापित करत नाही, ही चिंताजनक बाब आहे. आज आपल्या परिसरात प्लास्टिकच्या नानाविध कचऱ्याने महाकाय प्रदूषणकारक असुराचे रूप धारण केलेले आहे; ज्यामुळे हवा, पाणी, मृदा प्रदूषणाची समस्या गंभीर झालेली आहे. मडगावसारख्या शहरात सोनसडा येथे जो कचऱ्याचा महाकाय डोंगर निर्माण झाला आहे, त्याच्या प्रदूषणाचा मुद्दा कळीचा ठरला आहे. म्हापसा शहरातील कचऱ्याने तर गणेशपुरीला चक्क कचरापुरी करून टाकले आहे, याची आम्हाला अजिबात चिंता नाही. प्लास्टिक, थर्माकोलचा कचरा नष्ट करण्यासाठी आम्ही आवश्यक उपाययोजना करण्याऐवजी असा कचरा जाळून टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. शक्य असेल तेथे प्लास्टिक, थर्माकोलचा वापर टाळण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न केले जात नाहीत आणि त्यामुळे प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावणारी यंत्रणा प्रभावीरीत्या यशस्वी करण्याकडे आपण लक्ष देत नाही. त्यामुळे साक्षर आणि सुशिक्षित लोकांच्या जेथे वस्ती आहेत, तेथेच कचऱ्याची समस्या गंभीर झालेली पाहायला मिळालेली आहे.

बाजारहाट करण्यासाठी जाताना कपड्याची पिशवी नेणे, दुकानदाराने दिलेल्या प्लास्टिक पिशव्या वेष्टण स्पष्टपणे नाकारणे, ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून विल्हेवाट लावणे, ओल्या कचऱ्याचा सेंद्रिय खत तयार करण्यासाठी वापर करणे, पंचायत - नगरपालिका यांच्याशी संबंधित कर्मचाऱ्यांना कचरा गोळा करण्यात सहकार्य करणे, नदीनाले - समुद्र किनारी कचरा टाकण्याऐवजी त्याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.

दरवर्षी जागतिक स्तरावर पर्यावरण संवेदनक्षम समाज निर्माण व्हावा म्हणून वेगवेगळे कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन केले जाते. १०० टक्के साक्षरतेबाबत गोवा सरकारने हल्लीच अधिकृतरित्या घोषणा केलेली आहे. परंतु असे असताना पर्यावरणीय साक्षरता आमच्याकडे खूप कमी प्रमाणात आहे, ही खेदजनक बाब आहे. प्लास्टिक कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी आवश्यक नियोजन आणि कृती करणे गरजेचे आहे.


प्रा. राजेंद्र केरकर

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 

असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५