मडगावात वाहतुकीसह नागरिकांची कोंडी सुटणार कधी?

Story: अंतरंग |
04th June, 10:34 pm
मडगावात वाहतुकीसह नागरिकांची कोंडी सुटणार कधी?

वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे मडगाव शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न वर्षागणिक आणखीच गंभीर होत आहे. त्यातच रखडलेला पार्किंग प्रकल्प, बेकायदेशीररीत्या रस्त्याशेजारी बसणारे विक्रेते, चुकीच्या ठिकाणी पार्क केली जाणारी वाहने, पे पार्किंग झोन तयार न करणे याशिवाय शाळांचे न झालेले स्थलांतर या सर्व बाबींमुळे मडगावात वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी केवळ पोलीस तैनात करून सुटणार नाही, हे स्पष्ट दिसत आहे. 

मडगाव शहरातील पार्किंग प्रकल्प २०१५ मध्ये सुरू करण्याचे ठरवण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत केवळ कारणे दिली जात असून प्रशासकीय पातळीवरील समस्यांचे निराकरण केले जात नाही. यामुळे या प्रकल्पाला दरवेळी तारीख पे तारीख मिळत आहे. 

मडगाव पालिकेकडून जीसुडाकडे जागेचा ताबा देत निधी देण्यात आल्यानंतरही प्रकल्पाचे काम अजूनही सुरू झालेले नाही. पार्किंग प्रकल्प नसल्याने न्यू मार्केट व गांधी मार्केटमध्ये येणाऱ्या ग्राहकांना मिळेत त्या ठिकाणी गाड्या पार्क करून खरेदीस जावे लागते. वाहने रस्त्यांवर पार्क केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. रस्त्याशेजारी विविध वस्तू घेऊन बसणाऱ्या  विक्रेत्यांकडे खरेदीसाठी नागरिकांकडून गाड्या थांबवण्यात येतात, हे कारणदेखील वाहतुकीला अडथळा होण्याचे आहे. 

वाहतुकीच्या प्रश्नांची उकल करताना नियोजनबद्ध विकास नसण्याचे कारण मुख्यत्वेकरून दिसून येते. शहराची वाढ होत असताना आवश्यक अशा पार्किंगच्या सुविधा वेळोवेळी उपलब्ध करतानाच पे पार्किंगसाठी जागांची निवड करून कमी दरात तासाप्रमाणे शुल्क आकारल्यास पालिकेला महसूल मिळेल व लोकांनाही पार्किंगसाठी जागा मिळेल. अनेक ठिकाणी रेंट अ कार व रेंट अ बाईक गाड्या पार्क केलेल्या दिसून येतात. पोलीस व आरटीओने मोहीम राबवून अशा प्रकारांना आळा घालण्याची गरज आहे. 

मडगावातील वाहतूक कोंडीचा नागरिकांना त्रास होतो तसाच विद्यार्थ्यांच्या पालकांनाही होत आहे. मडगाव शहराच्या मध्यवर्ती भागात एकेरी मार्ग असलेल्या ठिकाणीही शाळा असून त्यांची पटसंख्या मोठी आहे. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत पालकांच्या गाड्यांचा लोंढा या मार्गावरून पुढे सरकतच नाही. प्रत्येकाची घाई व चुकीचे पार्किंग या गोष्टीही कोंडी होण्यास कारणीभूत आहेत. त्यामुळे या शाळांचे स्थलांतरण दवर्लीतील स्कूल कॉम्प्लेक्समध्ये झाल्यास शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कमी होणार आहे. शहरातील वाहतूक कोंडीवरील उपाययोजनांची तात्पुरत्या मलमपट्टीची कामे करतानाच प्रश्न पूर्णपणे मिटण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांवरही भर देण्याची गरज आहे.


अजय लाड, 

(लेखक दै. गोवन वाार्तचे दक्षिण गोवा ब्युरोचिफ  आहेत.)