सर्वपक्षीय शिष्टमंडळात सहभागी होत विरोधी पक्षनेत्यांनी आपली देशनिष्ठा सिद्ध केली असली तरी काँग्रेसचे नेते वेगळेच वक्तव्य करून त्यांची कुचंबणा करीत आहेत.
काँग्रेसचे वाईट दिवस संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. खरे तर राहुल गांधी यांचे नेतृत्व अपयशी ठरत असल्याची भावना काँग्रेस पक्षात व्यक्त होत आहे. मल्लिकार्जुन खर्गे अध्यक्ष असले तरी प्रत्यक्षात सारा कारभार राहुल गांधी यांच्या लहरीवर चालतो. २००४ सालापासून राजकारणात सक्रिय झालेले राहुल गांधी सतत पराभव पत्करत आहेत, आकडेवारीच द्यायची तर ५२ पराभवांना ते सामोरे गेले आहेत. त्यांना पक्षात आपल्याला शह देणारा किंवा आव्हान निर्माण करणारा नेता नको असल्याने ते इतरांची मते ऐकण्यास तयार नसतात, असे मानले जाते. याच कारणास्तव अनेक नेते आतापर्यंत पक्ष सोडून गेले आहेत. आजची स्थिती पाहता, पक्षात राहून काही ज्येष्ठ व प्रभावी नेते नाराजी व्यक्त करीत आहेत. अर्थात त्याचा कोणताही परिणाम होत असल्याचे दिसत नाही. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानवरील कारवाईचे समर्थन सर्वपक्षीयांनी करावे अशी अपेक्षा केंद्र सरकारने व्यक्त केली होती, त्यानुसार विरोधी पक्षांनी बैठकीत तशी भूमिका घेतली होती, पण सरकारला विरोध करण्याच्या प्रयत्नांत काँग्रेस पक्ष सध्या सरकारवर टीका करीत आहे. सिंदूर कारवाईसंबंधात शंका व्यक्त करीत आहे. काँग्रेसचेच काही नेते याबद्दल नाराज आहेत. परदेशात भारताची भूमिका पटवायला गेलेल्या सर्वपक्षीय शिष्यमंडळात काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी सहभागी होत देशाप्रती आपली निष्ठा दाखवलेली असली तरी देशात जी भूमिका राहुल गांधी व अन्य काही नेते घेत आहेत, त्यामुळे दौऱ्यावरील नेत्यांची कुचंबणा होत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. पाकिस्तानवरील कारवाईचे जोरदार समर्थन शशी थरूर, सुप्रिया सुळे, सलमान खुर्शीद यांच्यासारखे करीत असताना, देशात मात्र अविश्वासाचे वातावरण निर्माण केले जात आहे. याच कारणास्तव खुर्शीद यांनी भारतातील राजकीय मतभेदांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. एक ज्येष्ठ राजकारणी आणि माजी परराष्ट्र मंत्री असलेले खुर्शीद सध्या पूर्व आशियामध्ये जनता दल (यू)चे खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय संसदीय गटाचा भाग म्हणून तेथे गेले आहेत. सध्याच्या स्थितीबाबतर आपले मत व्यक्त करताना, खुर्शीद यांनी लिहिले आहे की, दहशतवादाविरुद्धच्या मोहिमेवर, जगाला भारताचा संदेश पोहचवण्यासाठी सर्वपक्षीय नेते कार्यरत असताना देशातील नेत्यांनी आमची राजकीय निष्ठा मोजत असलेले पाहणे वेदनादायी आहे. देशभक्त असणे इतके कठीण आहे का? असे ते विचारतात.
मोदी सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-कश्मीरमधील विशेष दर्जा रद्द करत संविधानातील कलम ३७० हटवले. या निर्णयाला तीव्र विरोधक केलेल्या काँग्रेस पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते आता या निर्णयाच्या पुनरावलोकनावर नवा सूर लावत आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी या निर्णयाचे अप्रत्यक्ष समर्थन करत केंद्र सरकारच्या धोरणात काही सकारात्मक बाजू असल्याचे नमूद केले. आता सलमान खुर्शीद यांनीही कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाबाबत बदललेला दृष्टिकोन मांडला आहे. सलमान खुर्शीद यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे की, कलम ३७० चा इतिहास लक्षात घेतल्यास ते हटवणे हा केवळ राजकीय निर्णय नसून घटनात्मक प्रक्रियेचा भागही ठरू शकतो. या निर्णयामागे असलेली भूमिका जर देशाच्या एकसंधतेच्या दृष्टीने विचारात घेतली, तर तो दृष्टिकोन पूर्णपणे चुकीचे आहे असे म्हणता येणार नाही. परदेशातही खुर्शीद यांनी काश्मीरसंबंधी केलेले वक्तव्य काँग्रेस पक्षाच्या धोरणाशी विसंगत आहे. काश्मीरमधील स्थिती शांत होत असून तो प्रदेश विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे पाहून पाकिस्तानने दहशतवादी पाठवून कागाळी केली आहे, असे ते म्हणतात. मोदी सरकारच्या भूमिकेशी मिळताजुळता असा हा विचार आहे, असे म्हणता येईल. त्यांनी न्यायालयात ३७० रद्द करण्याविरोधात न्यायालयात याचिकाकर्त्यांचे म्हणणे मांडले असले, तरी समाज बदलतो तसे संविधानही बदलायला हवे, असे ते म्हणतात. या विधानातून त्यांच्या भूमिकेत झालेला स्पष्ट बदल जाणवतो. काही दिवसांपूर्वी शशी थरूर यांनीही कलम ३७० रद्द करण्यावर भाष्य करताना, जर जम्मू-कश्मीरसारख्या राज्याचा विकास आणि मुख्य प्रवाहाशी एकरूप होणे हे या निर्णयामुळे शक्य होत असेल, तर आपण निव्वळ राजकारणाच्या नजरेने पाहणे चुकीचे ठरेल, असे म्हटले होते. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. काँग्रेस पक्षाने कलम ३७० हटवण्याच्या वेळी संसदेत जोरदार विरोध केला होता. परंतु आता वरिष्ठ नेत्यांच्या बदललेल्या मतामुळे काँग्रेसची एकसंध भूमिका बधीर होत असल्याचे चित्र उभे राहत आहे.
भाजपने हा मुद्दा नेहमीच देशाच्या एकात्मतेचा भाग मानला आहे. अशा वेळी काँग्रेसचे नेते जर याच निर्णयाचे समर्थन करत असतील, तर त्याचा राजकीय फायदा भाजपला आगामी निवडणुकांमध्ये होऊ शकतो. दुसरीकडे, काँग्रेसमध्ये अंतर्गत धोरणबदलाची चिन्हे दिसू लागल्याचेही स्पष्ट होते. कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय फक्त कायदेशीर किंवा राजकीय मर्यादेत न राहता देशाच्या एकात्मतेच्या आणि विकासाच्या दृष्टिकोनातूनही पाहिला जात आहे. काँग्रेसमधील शशी थरूर, सलमान खुर्शीद यांसारखे नेते जर या निर्णयाला उघडपणे समर्थन देत असतील, तर काँग्रेस पक्षाला आपली अधिकृत भूमिका पुन्हा ठरवावी लागणार आहे. मंगळवारी पक्षप्रवक्ते पवन खेरा यांनी मोदी सरकारच्या युद्धनीतीविषयी प्रश्न निर्माण करून काँग्रेस पक्ष सरकारशी सहमत नसल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करताना आपण पाकिस्तानला सहाय्यभूत ठरत आहोत, याचे भान पक्षाला राहिले नसल्याने जनतेपर्यंत नेमका काय संदेश जात आहे, याचा विचार या नेत्यांनी करायची वेळ आली आहे.
गंगाराम केशव म्हांबरे
(लेखक पत्रकार असून विविध
विषयांवर लेखन करतात)
मो. ८३९०९१७०४४