शेख मुजीबुर रहमान आणि बांगलादेशचे चलन

Story: विश्वरंग |
03rd June, 10:33 pm
शेख मुजीबुर रहमान आणि बांगलादेशचे चलन

बांगलादेशने १ जूनपासून नवीन नोटा जारी करण्यास सुरुवात केली असून, या नव्या नोटांवरून देशाचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान अर्थात शेख हसीना यांच्या वडिलांचा फोटो हटवण्यात आला आहे. 

या नोटांवर बौद्ध आणि हिंदू मंदिरांची चित्रे, प्रसिद्ध चित्रकार जैनुल आबेदीन यांची कलाकृती, तसेच राष्ट्रीय शहीद स्मारकाचा समावेश करण्यात आला आहे. या डिझाईनचा उद्देश १९७१ च्या मुक्तिसंग्रामातील बलिदानाची आठवण करून देणे हा आहे. हे नवीन चलन बांगलादेश बँकेच्या मुख्यालयातून टप्प्याटप्प्याने देशभर वितरित करण्यात येणार आहे.

शेख मुजीबुर रहमान हे बांगलादेशचे संस्थापक आणि पहिले राष्ट्रपती होते. १९७० च्या निवडणुकीत त्यांनी पूर्व पाकिस्तानसाठी (आजचा बांगलादेश) मोठ्या प्रमाणावर यश मिळवले आणि १९७१ मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी निर्णायक भूमिका बजावली. पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तानमध्ये तणाव वाढला होता. या तणावाच्या आधीच काही महिने बंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग पक्षाने सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळविला होता. परंतु पश्चिम पाकिस्तानातील राजकीय, लष्करी नेतृत्व बंगालींना सत्ता हस्तांतरित करण्यास सहमत नव्हते.  

अधिवेशन ३ मार्च १९७१ पासून सुरू होणार होते. पण अध्यक्ष जनरल खान यांनी १ मार्च रोजी अचानक निर्णय घेऊन नियोजित अधिवेशनाला स्थगिती दिली. लोकांनी रस्त्यावर उतरून खान यांच्या निर्णयाचा निषेध केला. शेख मुजीबूर यांनी २ मार्च रोजी ढाका आणि लगतच्या सर्व प्रांतात बंद पुकारला. या बंदनंतर ७ मार्च रोजी मुजीबूर यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी मुजीबूर यांनी केलेले भाषण पुढे बांगलादेशच्या निर्मितीस कारणीभूत ठरले. 'हा संघर्ष आपल्या स्वातंत्र्याचा संघर्ष आहे', अशी सुरूवात शेख मुजीब यांनी आपल्या भाषणात केली. त्यांच्या याच शब्दांनी पूर्व पाकिस्तानला स्वातंत्र्याच्या युद्धासाठी तयार होण्याची प्रेरणा दिली. या भाषणानंतर केवळ १८ दिवसांनी बांगलादेश मुक्ती युद्धाला सुरुवात झाली. अखेर पाकिस्तानचे दोन भाग होऊन १६ डिसेंबर १९७१ रोजी स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झाली. मात्र बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या चार वर्षांत राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबुर रहमान आणि त्यांच्या अनेक कुटुंबीयांची हत्या करण्यात आली आणि देशात अराजकता निर्माण झाली होती.


- गणेशप्रसाद गोगटे