राजकीय उलथापालथीमुळे निलांबूर पोटनिवडणूक लक्षवेधी

Story: राज्यरंग |
05th June, 10:28 pm
राजकीय उलथापालथीमुळे निलांबूर पोटनिवडणूक लक्षवेधी

केरळ विधानसभेचा कार्यकाळ जेमतेम सहा-सात महिन्यांचा शिल्लक असतानाच एका विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. मलप्पुरम जिल्ह्यातील निलांबूर विधानसभा मतदारसंघात ही पोटनिवडणूक होत आहे. मुस्लिमबहुल असलेल्या मतदारसंघावर डावे आणि काँग्रेस यांचाच वरचष्मा राहिला आहे. आपल्या ताकदीचा अंदाज घेण्यासाठी भाजपही मैदानात उतरला आहे. एकूण आठ उमेदवार रिंगणात असले तरी चौरंगी लढत अपेक्षित आहे. १९ जून रोजी मतदान, तर २३ जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

मागील २०२१ च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार पी. व्ही. अन्वर निवडून आले होते. नंतर त्यांनी सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटला (डावी लोकशाही आघाडी) पाठिंबा दिला होता. १३ जानेवारी रोजी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळेच ही पोटनिवडणूक होत आहे. येथे एलडीएफने सीपीआय (एम)चे नेते एम. स्वराज यांना उमेदवारी दिली आहे. विरोधी पक्ष काँग्रेसप्रणित यूडीएफकडून (युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट) आर्यदान शौकत मैदानात आहेत. सुरुवातीला निवडणूक लढवणार नसल्याचे सांगणारे माजी आमदार पी. व्ही. अन्वर यांना यूडीएफकडून उमेदवारी अपेक्षित होती; मात्र नकार मिळाल्यानंतर त्यांनी जेपीपीएम ही नवी राजकीय आघाडी स्थापन केली. तृणमूल काँग्रेसने त्यांना राज्याचे संयोजकपद दिले. आता ते तृणमूलचे अधिकृत उमेदवार आहेत. ‘आप’ने पाठिंबा दिला असल्याचे अन्वर यांनी सांगितले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे (रालोआ) भाजपकडून पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते अॅड. मोहन जॉर्ज नशीब आजमावत आहेत.

पी. व्ही. अन्वर निलांबूरमधून दोन वेळा एलडीएफ समर्थित अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आहेत. सत्ताधारी आघाडीशी कटुता निर्माण झाल्यामुळेच त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता.

जानेवारीत तृणमूलमध्ये प्रवेश केल्यापासून ते तृणमूलला यूडीएफमध्ये स्थान मिळावे यासाठी प्रयत्न करत होते. अन्वर यांनी शौकत यांच्या विजयाबाबत साशंकता व्यक्त केल्यानंतर अखेरच्या क्षणी यूडीएफशी त्यांचे संबंध बिघडले. त्यांनी ख्रिश्चन वसाहतवादी शेतकरी समुदायातील काँग्रेसचे नेते व्ही. जॉय यांना उमेदवारी मिळावी यासाठी यूडीएफ नेतृत्वाला वेठीस धरले होते.

सुरुवातीला ही पोटनिवडणूक नगण्य मानणाऱ्या भाजपने उशिरा भूमिका बदलली आणि काँग्रेसचे नेते मोहन जॉर्ज यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीची ही पोटनिवडणूक ‘सेमिफायनल’ ठरली आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीतून बाजूला राहणे परवडणारे नाही, हे भाजपने ओळखले.

मतदारसंघातील मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर मतदारराजा कुणाला कौल देतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.


प्रदीप जोशी, 

(लेखक दै. ‘गाेवन वार्ता’चे उप वृत्तसंपादक आहेत)