कर्नाटकमधून ५ वर्षांत १३,००० मुले बेपत्ता

मुलींचे प्रमाण अधिक : वाचा सविस्तर

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
01st June, 12:41 pm
कर्नाटकमधून ५ वर्षांत १३,००० मुले बेपत्ता

बंगळूर : कर्नाटकातून गेल्या पाच वर्षांत सुमारे १३,००० मुले बेपत्ता झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. २०२० ते २०२४ या कालावधीत कर्नाटकातून १२,७९० पेक्षा जास्त मुले बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या असून, यातील १,३०० हून अधिक मुलांचा अजूनही पत्ता लागलेला नाही.

बहुतांश अपहरण प्रकरणांमध्ये मुलीचे प्रमाण जास्त असून त्या शाळा, ट्यूशन किंवा इतर दैनंदिन कामातून परतताना अचानक गायब झाल्याचे निदर्शनास आले आहे. या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले  असून पोलिसांसमोरही ही मोठी डोकेदुखी ठरत आहे. बंगळूर, तुमकुरू, शिवमोग्गा, मांड्या, दावणगेरे, हसन, चित्रदुर्ग आणि मैसूर हे जिल्हे अपहरणाच्या घटनांसाठी विशेषतः संवेदनशील ठरले आहेत.

या घटनांमध्ये मानव तस्करी, बालश्रम, लैंगिक शोषण, अवयव तस्करी आणि भीक मागायला लावणे अशा प्रकरणांत गुंतलेल्या सिंडिकेट्सचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या सर्व शक्यतांचा तपास सुरू केला असून संशयित टोळ्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून एक विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यात आलेली असून तिचं उद्दिष्ट म्हणजे बेपत्ता मुलांचा शोध घेणे आणि अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या टोळ्यांचा बंदोबस्त करणे हे आहे. ही स्थिती पाहता, नागरिकांनी सतर्क राहून आपल्या मुलांवर विशेष लक्ष ठेवावे, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.