सडा येथे इंधनवाहू टँकरमधून इंधन चोरणाऱ्या दहाजणांना अटक

संशयितांना पोलीस कोठडी : टँकर, मालवाहू वाहने, रोख रक्कम जप्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
31st May, 12:51 am
सडा येथे इंधनवाहू टँकरमधून इंधन चोरणाऱ्या दहाजणांना अटक

वास्को : सडा येथील विनावापर असलेल्या सबजेलमागील भागात इंधनवाहू टँकरांतून इंधन चोरणाऱ्या दहाजणांना मुरगाव पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. संबंधितांनी इंडियन ऑईल टँकरातून सुमारे १ लाख ७८ हजार रुपये किमतीचे इंधन चोरले. याप्रकरणी मुरगाव पोलिसांनी पाच इंधनवाहू टँकर, तीन मालवाहू वाहने व रोख रक्कम अशी सुमारे २२ लाख ३९ हजारांची मालमत्ता जप्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सडा सबजेलमागे इंधनवाहू टँकरातील इंधन चोरण्यात येत असल्याची माहिती मुरगाव पोलिसांना मिळाली होती. त्यांनी पाळत ठेऊन इंधन चोरणाऱ्यांना अटक केली. त्यांची वाहने, टँकर जप्त केले. अटक केलेल्यांमध्ये ब्रिटो मायकल राज (४९, वास्को), मुत्तापा कानगिरी (४७, दाबोळी), मोहन पाटील (५०, दाबोळी), बबलू पटेल (२२, दाबोळी), गुलाब पटेल (४९, दाबोळी), नीरज पटेल (२२, दाबोळी), उमेश कुमार (३२ दाबोळी), रामनयन पटेल (२८, दाबोळी), सूरज जैस्वार (२७, वास्को), विठ्ठल मेत्री (४०, नावेली) यांचा समावेश आहे. टँकरांतून १ लाख ७८ हजार रुपयांचे डिझेल चोरुन ते रिक्षातून नेण्यात येत होते. यामुळे स्फोटक पदार्थांची वाहतूक केल्याने मानवी जीवनाला धोका निर्माण झाला होता. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता ३१६, ३०३, २८८ r/w ३ (५), तसेच पेट्रोलियम कायदा १९३४ च्या कलम २३ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. मुरगाव पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक स्टँली गोम्स पुढील तपास करीत आहेत. संशयितांना न्यायालयात उभे केले असता, एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीशांनी दिला आहे.

दहाजणांना अटक करण्यात आल्याने हे इंधनचोरी प्रकरण चर्चेत आले आहे. यापूर्वीही मुरगाव तालुक्यात अशाप्रकारे इंधन चोरी करण्याचे प्रकार घडले होते. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. तथापी इंधन चोरीचे प्रकार अद्याप थांबले नाहीत. यापूर्वी डिसेंबर २०२४ मध्ये मांगोरहिल येथे महामार्गाच्याकडेला टँकर उभे करुन त्यातील विमानासाठी लागणारे इंधन (एटीएफ) चोरीप्रकरणी काहीजणांना सीबीआयने पकडले होते. त्यानंतर शुक्रवार, दि. ३० रोजी मुरगाव पोलिसांनी दहाजणांना डिझेल चोरीप्रकरणी अटक केली आहे.

निर्जनस्थळी इंधन चोरीचा प्रकार

सडा सबजेलचा आता वापर करण्यात येत नाही. त्यामुळे तो भाग निर्जन आहे. त्याचा फायदा घेऊन तेथे इंधनवाहू टँकर उभे करून इंधन चोरण्यात येत होते, असे समजते.