उत्तराखंड : अंकिता भंडारी हत्याकांड : ३२ महिन्यांनंतर मिळाला कुटुंबीयांना न्याय

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
30th May, 04:11 pm
उत्तराखंड : अंकिता भंडारी हत्याकांड : ३२ महिन्यांनंतर मिळाला कुटुंबीयांना न्याय

कोटद्वार  : उत्तराखंडमधील बहुचर्चित अंकिता भंडारी हत्या प्रकरणात तब्बल ३२ महिन्यांनंतर न्यायालयाने निकाल दिला आहे. कोटद्वार येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांनी शुक्रवारी दिलेल्या निर्णयात तिन्ही आरोपींना दोषी ठरवण्यात आले. आज (शुक्रवार) शिक्षा काय द्यायची यावरही न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे.

दोषी ठरवण्यात आलेल्या आरोपींमध्ये वनंत्रा रिसॉर्टचा संचालक पुलकित आर्य, सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता यांचा समावेश आहे. या प्रकरणात सुमारे दोन वर्षे आठ महिने सुनावणी झाली. न्यायालयाने ४७ साक्षीदारांची साक्ष नोंदवली तर एसआयटीने एकूण ९७ साक्षीदारांची यादी तयार केली होती.

हत्येचा धक्कादायक तपशील

सप्टेंबर २०२२ मध्ये अंकिता भंडारी (१९) ही गंगा भोगपूर येथील वनंत्रा रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून कार्यरत होती. रिसॉर्टमध्ये आलेल्या ‘वीआयपी’ पाहुण्यांची 'शय्या सोबत' करण्यास तिने नकार दिल्याने तिची हत्या करण्यात आली. आरोपींनी अंकिताची हत्या करून तीला रात्री ओढ्यामध्ये ढकलून दिले. आठवड्याभरानंतर तिचा मृतदेह चीला ओढ्यामधून सापडला.

अपराधी न्यायालयीन कोठडीतच

अंकिताच्या हत्येच्या एका आठवड्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. एसआयटीने ५०० पानी चार्जशीट दाखल केली. आरोपींवर गँगस्टर कायद्याखालीही गुन्हे दाखल करण्यात आले. तेव्हापासून आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.

पीडित कुटुंबाला मदत

सरकारने अंकिताच्या कुटुंबाला २५ लाखांची आर्थिक मदत दिली. तिच्या वडिलांना व भावाला शासकीय नोकरीही देण्यात आली. कुटुंबाच्या मागणीनुसार तीन वेळा सरकारी वकील बदलण्यात आले. विद्यमान सरकारी वकिलांनी प्रभावी बाजू मांडल्याने आरोपींच्या जामिनाच्या अर्जांना वारंवार नकार देण्यात आला.

सुरक्षा व्यवस्था कडक

या खटल्याची संवेदनशीलता लक्षात घेता कोटद्वार न्यायालय परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पीडितेच्या कुटुंबियांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.