माहेराची ओढ लावणारा पाऊस...

घरणीबाईच्या लेकासारखाही पुरुष समाजात आहे जो आपल्या स्त्रीसाठी पारंपरिक सामाजिक विचारांना छेद देत स्त्री जीवन आनंदमय करण्याचा प्रयत्न करीत असतो.

Story: भरजरी |
25th May, 02:52 am
माहेराची  ओढ लावणारा पाऊस...

जून महिन्याला अजून अवकाश असला तरी पर्जन्यराजाने आपली हजेरी गोव्यात गेल्या आठ दिवसांपासून लावली आहे. वैशाखातील रणरणीत उन्हाला दूर करत ज्येष्ठातील पावसाच्या सरी उन्हाळ्याने त्रस्त झालेल्या धरतीवर थंडगार पाण्याचा शिडकाव करीत आहेत. शिडकाव कसला धो धो वर्षावच! मानव जातीला या अवकाळी पावसाचा थोडा त्रास जरी सहन करावा लागला, तरी सृष्टीला मात्र या पावसामुळे नक्कीच आल्हाद प्राप्त झालेला आहे. या पावसामुळेच जमिनीला नवनिर्मितीचे डोहाळे लागले आहेत. तिच्यातून ठिकठिकाणी चैतन्यमय पालवी रुजून वर येऊ लागली आहे. शुष्क धरतीमधून हिरवीगार पाने डोकावून पाहू लागली आहेत. एकूण काय, तर धरतीला या पावसामुळेच खरे गर्भारपण लाभले आहे. तिच्या विरहाच्या भावना मातीतून फुटणाऱ्या कोंबामधून सबंध सृष्टीला दिसून येऊ लागला आहेत. पण कुठल्यातरी एका घरात, एका जात्यावर दळण दळीत असलेल्या घरणीबाईच्या मनात मात्र तिच्या भावनांचा उद्रेक होत आहे. अशावेळी घरणीबाई आपला रथ म्हणजेच जाते मांडून आपल्या भावनांना ओवीच्या रूपाने आणि डोळ्यातील आसवांच्या रुपाने वाट करून देऊ लागली आहे.

पाऊस घडोघडे
आदो मीरग पाणी करी
मातेला चिंता मोठी
लेका उरली पर घरी 

पावसाच्या पहिल्या सरीबरोबर धरती आपल्या अंकुराला गोंजारत आपल्या कुशीतून बाहेर काढते. ते फुललेले अंकुर पाहून मातेला आपल्या लेकीची आठवण येते. उन्हाळा अगदी शिगेला पोहचता पोहचता ढगांच्या गडगडाटासह आणि विजेच्या लखलखाटासह पावसाची सर कोसळते. मृग नक्षत्र लागल्याची ही निशाणी असते. शेतीप्रधान देशांमध्ये मृग नक्षत्राला फार मोठे महत्त्व. शेताची कामे याच महिन्यात सुरू होतात. नांगरणी, लावणी अशी अनेक कष्टाची कामे समोर मी मी म्हणत असतात. अशावेळी मृग नक्षत्राच्या पहिल्या दोन दिवसात लेकीने माहेरी यावे, सुखाचे दोन घास खावे असे मातेला वाटते. म्हणून या पहिल्या पावसाला सुरुवात होताच मातेला चिंता वाटू लागते की या दोन दिवसात लेकीला आणली नाही, तर दिवाळी येईपर्यंत लेकीला आपण पाहू शकणार नाही.

इकडे लेकीची अवस्थाही काही वेगळी नसते. माहेरी पहिल्या पावसाच्या सरीमुळे लेकीच्या आठवणीमुळे माता जशी गहिवरते, तशीच सासरी लेक आपल्या आईच्या आठवणीने विचलित होते. तिला आपल्या आईच्या घरचे, आपल्या प्रेमळ मामांच्या घरचे प्रेमळ क्षण आठवू लागतात.

पाऊस घडोघडे गे
पाऊस घडोघडे
माज्या मामाच्या गावाकडे
पिकले येलदोडे
असे पिकले साळेसुळे
पिकले साळेसुळे
असे दळीता दळीता
माजे वळले बावळे 

ह्या गडगडणाऱ्या पावसाबरोबरच याच दिवसात मामाच्या घरी वेलदोड्यांचा घमघमाट तिच्या नाकात घुमतो. हा वेलदोडा म्हणजे मामाच्या घरच्या सुबत्तेचे प्रतीक. पूर्वीच्या काळी धनधान्याचे अनेक प्रकार दिसून यायचे. कांगू, राळे, पाकार, साळे, सुळे असे आता लुप्त झालेले धान्याचे प्रकार दिसून यायचे. आज हे धान्य प्रकार घरणीबाईच्या ओव्यांमधूनच दिसून येतात. तर इकडे आपल्या मामाची, आपल्या माहेरची आठवण काढत काढत स्वतः दळण दळत असते आणि हे दळण करीत असताना तिचे बावळे (हात) वळून येतात म्हणजे दुखू लागतात. सुकुमार अशी आपली लेक कोणकोणत्या कष्टांना सामोरी जात असेल याचा अंदाज तिच्या मातेला असतो. आणि आपल्या या कष्टांना आपली माता जाणून आहे, माझ्या भेटीसाठी आपल्या माहेरची सगळी मंडळी आतुर आहेत याची लेकीलाही जाणीव असते. आपली हीच भावना ओव्यांमधून व्यक्त करताना लेक म्हणते,

दळण मिया दळी
असे दळीते वले गउ
पांडुरंग माजो भाऊ
मला बलई भेटायला
भरली चंद्रभागा
पानी जाले ते राना मळा
कबीर नी संताची
अशी बुडली धर्मशाळा 

घरणीबाईची लेक दळण दळीत असली तरी ते दळण भराभर निपटत नाही. कसे निपटणार? कारण तिच्यासमोर ओले गहू ठेवलेले असतात. ज्यांना कितीही जात्यामधून फिरवले तरी त्यापासून भराभर पीठ निघणे अशक्यप्राय. अशावेळी आपला भाऊ जो प्रति पांडुरंग आहे, तो आपल्याला भेटायला बोलावत आहे. पण मी जाणार तरी कशी? कारण त्याच्या आणि माझ्या मध्ये भली थोरली चंद्रभागा नदी वाहत आहे. त्या चंद्रभागेला पूर येऊन रानोमाळी ते पाणी पसरले आहे. गावाच्या वेशीवर असलेली कबीर संतांची धर्मशाळाही त्यामुळे बुडाली आहे. याचाच अर्थ तिच्या माहेरी जाण्याच्या मार्गात अनेक अडचणी आहेत आणि त्या तिला ओलांडून येणे शक्य नाही. हा एक प्रकारचा सासुरवास तिला भोगावा लागत आहे. 

पण माहेरची माया ती वेगळी. ती नदीला पूर आला किंवा वादळ वाऱ्याला घाबरून आटून जाणारी नाही. त्यामुळे भाऊ आपल्या ह्या गाय समान गरीब बहिणीला स्वतः आणायला जाऊ लागतो. धो धो पाऊस कोसळत असला तरी आईची आणि बहिणीची भेट घडवून आणायची असा निग्रह बाळगलेला भर पावसात झाडांचा आसरा घेऊन बहिणीच्या घरी पोहोचतो.

भयीनिला हाडू जाता
अशी झाडाच्या आसाऱ्यान
भायनीच्या सासरान
धाडून देईना म्हटल्यान 

पण एवढे त्रास घेऊन भाऊ जरी बहिणीच्या घरी पोहोचला, तरी तिचा सासरा तिला माहेरी पाठवण्यास नकार देतो. विचार करा, भर पावसात वादळग्रस्त वातावरणात, ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या कडकडाटात भाऊ फक्त दोन दिवस का होईना बहिणीला माहेरी घेऊन जायला म्हणून येतो आणि तिचा सासरा बहिणीला पाठवून द्यायला नकार देतो. त्या भावाला या नकाराच्या किती यातना झाल्या असतील? एवढे कष्ट करून फक्त दोन दिवसासाठी आपल्याला न्यायला आलेल्या आपल्या भावाला आपला सासरा असा तोंडावर नकार देतो हे पाहून त्या बहिणीला किती त्रास झाले असतील? बालपणापासून एकत्र बागडलेल्या त्या भावंडांना आज दोन दिवस एकत्र राहता येत नाही याचे किती दुःख होत असेल? पण पुरुषप्रधान भारतामध्ये ह्या गोष्टी व्हायच्या. गरीब गायी समान स्त्रीवर पुरुष असा अधिकार गाजवायचा. या गोष्टी अधोरेखित करणाऱ्या ह्या ओव्या जरी असल्या तरी बहीण भावाच्या प्रेमाची नाजूक किनार दर्शविणाऱ्याही ह्याच ओव्या आहेत. 

एकीकडे स्त्रीला फक्त काम करणारी गुलाम असे मानण्यात येत असले, तरी दुसरीकडे आपली मुलगी ही आपल्या घरची लक्ष्मी. मृग नक्षत्राच्या सुरुवातीला या लक्ष्मीला घरी आणून तिची सेवा करून तिला तृप्त करून पाठवावे अशी इच्छा बाळगणारी ही आपलीच संस्कृती. म्हणून आजही मृग नक्षत्राची पहिली पावळी ही आपल्या माहेरीच बघावी किंवा मामाच्या घरी बघावी अशी रीत काही ठिकाणी आहे. 

इथे मात्र सासरा जेव्हा बहिणीला माहेरी पाठवायला नकार देतो तेव्हा भाऊ दुःखी होतो. तेव्हा बहीण त्याला आश्वासन देते, 

भयनीला हाडु जात्या
बंधू नका रे दुःख करू
हियानी गाय म्हशी
बंधू येता रे दिसा दिशी

तू मला इतक्या प्रेमाने घेऊन जायला जरी आलास तरी आज काही कारणास्तव मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही. पण तू एवढे दुःख करू नकोस. घरी काम खूप आहे गाई, म्हशी व्यायच्या आहेत. काही दिवसांनी गाई म्हशी व्यायल्या, घरातील कामाचा ओघ जरा कमी झाला की दिसादिशी का होईना पण मी स्वतः माहेरी येईन. 

हे आश्वासन देताना बहिणीलाही माहिती असते की आपल्या मागे लागलेली कामाची रीघ काही संपणारी नाही आणि मला माहेरी काही जाता येणार नाही. तसेच भावालाही माहिती असते की बहीण आपल्याला बरं वाटावं म्हणून हे आश्वासन देत आहे. तिचा दिसादिशी माहेरी येण्याचा दिवस काही उजाडणार नाही कारण या सासुरवासातून तिची एवढ्या सहजासहजी काही सुटका होणार नाही. 

समाज कितीही बदलला असला तरी त्याच्यातील पुरुषसत्ताकपणा अजून पूर्णपणे पुसलेला नाही. याचा प्रत्यय अक्षर ओळख नसलेल्या घरणीबाईनेही घेतला होता. हा पुरुषसत्ताक अहंकार तिने आपल्या ओव्यांमधून अधोरेखित केला. आज फक्त आजूबाजूचे भौगोलिक आणि सामाजिक वातावरण जरी बदलले असले तरी मानसिकता तीच आहे. काही अपवाद वगळता पुरुषसत्ता अहंकारही तोच आहे, फक्त रूपं बदलली आहेत. माध्यमे बदलली आहेत. पण जशा नाण्याच्या दोन बाजू असतात तशा घरणीबाईच्या लेकासारखाही पुरुष समाजात आहे जो आपल्या स्त्रीसाठी पारंपरिक सामाजिक विचारांना छेद देत स्त्री जीवन आनंदमय करण्याचा प्रयत्न करीत असतो.


- गाैतमी चाेर्लेकर गावस