UPSC- मुलाखत कशी द्यावी

पर्सनॅलिटी टेस्ट एक गडावरचा बालेकिल्ला असतो. खालून गड सर करणे म्हणजे पूर्वपरीक्षा (प्रिलिम). परत पुढे चढाई करून त्याच दमाने तटबंदी भेदून किल्ला जिंकणे म्हणजे मुख्य परीक्षा (मेन्स) व पुढे त्याच दमात सर्वात कठीण बालेकिल्ला जिंकणे म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट अर्थात मुलाखत (इंटरव्ह्यू).

Story: यशस्वी भव: |
18th May, 02:41 am
UPSC- मुलाखत कशी द्यावी

UPSC मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्याला दिल्ली येथील UPSC मुख्यालयात प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलवण्यात येते. ज्या विद्यार्थ्यांना असे बोलावण्यात आले नसेल त्या विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचे की परत त्यांना आता नवीन कॅलेंडर वर्षात पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षा उत्तीर्ण व्हायची तयारी करावी लागणार आहे. येथे एकदा मुख्य परीक्षा पास झाली आता काम फत्ते झाले असे मानून चालत नाही. पर्सनॅलिटी टेस्ट एक गडावरचा बालेकिल्ला असतो. खालून गड सर करणे म्हणजे पूर्वपरीक्षा (प्रिलिम). परत पुढे चढाई करून त्याच दमाने तटबंदी भेदून किल्ला जिंकणे म्हणजे मुख्य परीक्षा (मेन्स)  व पुढे त्याच दमात सर्वात कठीण बालेकिल्ला जिंकणे म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट अर्थात मुलाखत (इंटरव्ह्यू). हे सर्व जसे एका दमात करावे लागते तसेच हे टप्पे एकाच कॅलेंडर वर्षात पार करावे लागतात. ढोलकपूर येथे UPSC मुख्यालय आहे. यामध्ये एक पॅनल असते जे उमेदवाराला साधारणपणे ४५ मिनिटं ते १ तास प्रश्न विचारते. ही चाचणी गप्पा गोष्टीच्या स्वरूपात सुरू होते व जसेजसे विषय येत जातील तशीतशी आपली मते, सहाय्यकारी मते, विरुद्ध मते, तटस्थ मते, बॅलन्स बिहेविअर, प्रामाणिकपणा, प्रशासकीय गुण, निर्णयक्षमता, आत्मविश्वास, विषयाचे आकलन, त्याची खोली याचबरोबर मॉरॅलिटीही तपासली जाते. स्मरणशक्ती, जुन्या घडलेल्या घटनांमधील आवश्यक तपशील, अधिकाऱ्यांचे निर्णय, त्यावेळची परिस्थिती, हातबलता यावर सुद्धा मत प्रदर्शन करावे लागते. खूपदा विद्यार्थ्यांच्या हॉबी / छंद या प्रकारापासून चर्चा सुरू होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांने इंप्रेशन मारायला तसे लिहिले आहे की त्यात खरंच त्याला रुची आहे आणि रुचीच्या गोष्टी तो कितपत मनापासून जपतो व त्यात त्याला कसा आनंद मिळतो हे पण तपासले जाते. त्यामुळे जर विद्यार्थ्यांने प्रामाणिकपणा बाळगला तर मुलाखतीमध्ये फायदा होतो आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यायलाच हवे आहे हा हट्टाहास सोडावा. ज्या प्रश्नाचे उत्तर माहिती नसेल अथवा सत्यतेबद्दल खात्री नसेल तर तेथे  प्रामाणिकपणे माहिती पूर्ण नाही किंवा क्षमस्व, मला खरंच माहिती नाही किंवा मला यातील गोष्टी जाणून घेऊन मगच उत्तर देणे पर्याप्त आहे अशा प्रकारची वागणूक प्रशंसनीय असते. कारण कमिशनला 'गुगल' वाला अधिकारी नको असतो तो एक ' स्टेट्समन' पद्धतीचा हवा असतो. जो धोरणी असू शकतो. फायदा - तोट्याचा विचार करणारा, सारासार विचार करून पब्लिक पॉलिसीचा विचार करणारा एक 'माणूस' हवा असतो. अशा मुलाखतीमधून ते उमेदवारातील माणूस शोधतात. 

जीपीएसएस्सी परीक्षेमध्ये सध्यातरी क्लास ‘ए’ व क्लास ‘बी’ लाच पॅनेल मुलाखत होते. ज्युनिअर स्केल ऑफिसर, सबरजिस्ट्रार तसेच व्हिडिओ, असिस्टंर पब्लिक प्रोसिक्युटर या पदांसाठी दीर्घकालीन मुलाखत होते. अर्थात सर्व पोस्टसाठी मुलाखत होतेच त्यामुळे मुलाखतीची तयारी आधीपासून नीट करणे योग्य ठरते.


अॅड. शैलेश कुलकर्णी
कुर्टी - फोंडा
(लेखक नामांकित वकील आणि
करिअर समुपदेशक आहेत.)