विषारी दारूमुळे २३ बळींच्या घटनेने पंजाब हादरले

Story: राज्यरंग |
15th May, 10:36 pm
विषारी दारूमुळे २३ बळींच्या घटनेने पंजाब हादरले

‘मद्यप्राशन आरोग्याला हानिकारक आहे,’ असे दारूच्या बाटलीवर ठळक अक्षरात लिहिले तरी मद्यपींची संख्या कमी होताना दिसत नाही. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. एकदा व्यसन लागले की ते सुटणे महाकठीण. खिशाला परवडत नसल्यामुळे अनेक जण स्वस्तातील दारूच्या शोधात असतात. स्वस्तात मिळणारी दारू बऱ्याच वेळा प्राणघातक ठरते. अशीच हृदयद्रावक घटना पंजाबात नुकतीच घडली. विषारी दारूमुळे तब्बल २३ लोकांना प्राणांना मुकावे लागले. या घटनेमुळे पंजाब हादरून गेला आहे.

अमृतसर जिल्ह्यातील मजिठा विधानसभा मतदारसंघात १२ मे रोजी ही दुर्घटना घडली. विषारी दारूने २३ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार घेत आहेत. काहींची प्रकृती गंभीर असून ते बोलण्याच्या स्थितीत नाहीत, असे जिल्हाधिकारी साक्षी साहनी यांनी सांगितले.

दुर्घटना घडल्यानंतर पोलीस आणि प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी विषारी दारूचे प्रमुख पुरवठादार प्रभजीत सिंग आणि साहिब सिंग यांना अटक केली. दोघांकडून बेकायदा दारू खरेदी करून गावोगावी वाटणाऱ्या इतर चौघांनाही ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस अधीक्षक मनिंदर सिंग यांनी उत्पादन शुल्क कायद्याच्या कलम १०५ बीएनएस आणि ६१अ अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. या प्रकरणात एकूण दहा जणांची अटक झाली आहे. विषारी दारू कुठून आणि कशी आली, याचा तपास सुरू आहे. राज्याचे पोलीस प्रमुख गौरव यादव यांनी सांगितले की, मजिठाचे पोलीस उपअधीक्षक अमोलक सिंग आणि स्टेशन हाऊस ऑफिसर अवतार सिंग यांना निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल निलंबित केले असून त्यांची विभागीय चौकशी सुरू आहे.

मजिठा भागात बनावट दारूचा व्यवसाय बराच काळापासून सुरू आहे. प्रशासनाने कधीही कठोर कारवाई केली नाही, असे स्थानिक लोक सांगतात. जिल्हाधिकारी साक्षी साहनी यांनी बाधित कुटुंबांना भेटून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. संपूर्ण नेटवर्कची चौकशी सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्या तीन वर्षांत राज्यात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूची ही चौथी मोठी घटना आहे. २०२० च्या सुरुवातीला अमृतसर, तरनतारन आणि बटाला येथे विषारी दारूमुळे १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी पठाणकोटमध्ये विषारी दारू पिऊन २१ जणांचा बळी गेला होता. याशिवाय नवांशहर आणि होशियारपूरमध्येही अशी प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आणखी किती जणांचे बळी गेल्यानंतर विषारी दारूची निर्मिती आणि विक्री यावर आळा बसणार आहे, असा प्रश्न जनता विचारत आहे.


प्रदीप जोशी, 

(लेखक दै. ‘गाेवन वार्ता’चे उप वृत्तसंपादक आहेत)