एप्रिल महिना संपत आलाय आणि तापमान वाढतंच आहे. उन्हाळा नकोसा झालाय आणि उकाडा कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय आपण सगळेजण करत आहोत. साध्या पाण्याऐवजी माठातील पाणी, वेगवेगळी सरबतं आपण पितो. उकाडा वाढला की घामाचे प्रमाण सुद्धा वाढते, जरा कुठे बाहेर फेर फटका मारला तरी घामाने शरीर ओले चिंब होते. दिवसातून दोन, तीन वेळा आंघोळ केल्याशिवाय फ्रेश वाटत नाही. ही उन्हाळ्यातली आंघोळ अजून थंडावा देणारी व्हावी यासाठी काही सोप्पे उपाय तुम्ही करू शकता.
गुलाब पाण्याचे स्नान -
आंघोळीच्या पाण्यात एका गुलाबाच्या पाकळ्या ३- ४ तास घालून ठेवाव्या किंवा गुलाब जल २ चमचे आंघोळीच्या पाण्यात मिसळावे. गुलाब पाकळ्या घातलेल्या पाण्याने आंघोळ केली असता ताजे तवाने वाटते.
चंदन घातलेले पाणी -
चंदन उगाळून १ चमचाभर गंध किंवा चंदन तेल ४- ५ थेंब आंघोळीच्या पाण्यात मिसळावे. चंदन घातलेल्या पाण्याने आंघोळ केली असता शरीराला छान सुगंध येतो. घामाचा त्रास होत नाही आणि थंडावा जाणवतो.
मोगऱ्याचे पाणी -
मनमोहक सुगंध असलेला मोगरा उन्हाळ्यात फुलतो. मोगऱ्याची ५-६ फुलं आंघोळीच्या पाण्यात घालून ठेवावी. आणि सुगंधी स्नानाचा आनंद घ्यावा. याचप्रमाणे बकुळ, चाफा ही फुलं सुद्धा आंघोळीच्या पाण्यात घालू शकता.
सुगंधी वाळा -
वाळ्याची मुळं उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यात घातली जातात त्याचप्रमाणे ही मूळं किंवा वाळ्याचे सुगंधी चूर्ण १ चमचा बादलीभर पाण्यात घालून अंघोळीसाठी सुगंधी पाणी वापरू शकता.
सुगंधी पाण्याने आंघोळ केली असता थंडावा तर मिळतोच त्याशिवाय उकाड्यामुळे येणारे घामोळे येत नाही आणि मन सुद्धा प्रसन्न राहते. या उन्हाळ्यात तुम्हाला वरील पैकी जी फुलं मिळतील ती या उन्हाळ्यात आंघोळीच्या पाण्यात वापरा आणि नैसर्गिक सुगंधी स्नानाचा आनंद घ्या.
वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य