अरुणाचल प्रदेशच्या 'फिशटेल' क्षेत्राजवळ चीन एक नवीन हेलीपोर्ट बांधत आहे. हे ठिकाण प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून (LAC) फक्त २० किलोमीटर अंतरावर आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
इटानगर : अरुणाचल प्रदेशच्या 'फिशटेल' क्षेत्राजवळ चीन नवीन हेलीपोर्ट बांधत आहे. हे ठिकाण प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून (LAC) फक्त २० किलोमीटर अंतरावर आहे. हेलीपोर्ट तयार झाल्यानंतर चिनी लष्कर या भागात लष्करी संसाधने जलद आणि सहज जमवण्यास सक्षम बनेल. हा परिसर डोंगरांनी वेढलेला आहे. या ठिकाणी हेलीपोर्टच्या उभारणीमुळे या भागात चीनची लष्करी ताकद वाढणार आहे.
येत्या हिवाळ्यात चिनी लष्कराच्या हालचालींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. हे हेलीपोर्ट दुर्गम भागात बांधले जात आहे. ते तयार झाल्यावर चीनला अधिक वेगाने सैन्य तैनात करण्यास मदत होईल. उपग्रह इमेजरीच्या मध्यमातून समोर आलेल्या फुटेजनुसार चीनने २०२३ च्या उत्तरार्धात बांधकाम सुरू केले. सध्या हे काम सुरू आहे. चिनी सैन्याची संरक्षण आणि आक्रमण क्षमता वाढवण्यासाठी याची तयारी करण्यात येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
चीनच्या निंगची प्रांतात गोंगरीगाबू नदीच्या काठावर हे हेलीपोर्ट बनवले जात आहे . इथली भौगोलिक स्थिती पाहता चिनी हेलिकॉप्टर्सना अधिक पेलोडसह उड्डाण करण्यास मदत होईल. डोंगराळ भागात हेलिकॉप्टर उतरवणे आणि टेक ऑफ करणे अवघड आहे, मात्र या हेलीपोर्टवर ६०० मीटर लांबीची धावपट्टी तयार करण्यात आली आहे. यामुळे हेलिकॉप्टर रोलिंग टेकऑफ सहज करू शकतील.
अरुणाचल प्रदेशातील फिशटेल क्षेत्राबाबत भारत आणि चीनमध्ये वाद सुरू आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) मतभेद आहेत. फिशटेल-१ आणि फिशटेल-२ फील्ड दिबांग व्हॅली आणि अंजाव जिल्ह्यात आहेत. हे क्षेत्र सामरिक दृष्टिकोनातून भारतासाठी महत्त्वाचे आहे. ईस्टर्न कमांडचे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल प्रवीण बक्षी यांच्या मते, हे हेलिपोर्ट भारताच्या सुरक्षेला गंभीर आव्हान देऊ शकते.
चीनने अलीकडच्या वर्षांत एलएसीच्या बाजूने अनेक विवादित भागांत छोटी गावे निर्माण केली आहेत. ही गावे चीनच्या 'स्लॅमी स्लाइसिंग' धोरणाचा भाग आहेत. या रणनीतीद्वारे चीन हळूहळू सीमेला लागून असलेल्या भागांवर ताबा मिळवत आहे. भूतानमध्ये तसेच अरुणाचल प्रदेशातील अनेक भागात चीनने अनेक मार्गांनी जमिनी बळकावल्या आहेत. ही गावे बांधून चीन या भागांवर आपला दावा मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.
या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी भारताने व्हायब्रंट व्हिलेज योजना सुरू केली आहे, ज्या अंतर्गत अरुणाचल प्रदेशातील ३,००० गावांमध्ये विकास कामे केली जात आहेत. याशिवाय २,४०० किमी लांबीचा ट्रान्स-अरुणाचल महामार्ग बांधण्याचे कामही वेगाने सुरू आहे. या महामार्गाच्या निर्मितीनंतर भारतीय लष्कर एलएसीला लागून असलेल्या चौक्यांपर्यंत सहज पोहोचेल. भारताचे हे पाऊल चीनच्या जमीन बळकावण्याच्या धोरणाला प्रत्युत्तर आहे. याशिवाय, यामुळे चीनच्या सीमेवर भारताची लष्करी उपस्थितीही वाढेल.