दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी आतिशीची निवड; पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष
नवी दिल्ली : केजरीवाल सरकारमध्ये शिक्षण मंत्री आतिशी मार्लेना दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री असतील. अरविंद केजरीवाल यांनी आज मंगळवारी ११:३० वाजता पार पडलेल्या आम आदमी पक्षाच्या (आप) विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर आतिशी मुख्यमंत्रीपदाचा ताबा घेणार आहे. सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित यांच्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या आतिशी या तिसऱ्या महिला असतील.
दिल्लीच्या कालकाजी विधानसभा मतदारसंघातील आमदार आतिशी मारलेना या आम आदमी पक्षाच्या नेत्या तसेच पक्षाच्या राजकीय घडामोडी समितीचे (पीएसी) सदस्य आहेत. सध्या आतिशी या केजरीवाल सरकारमध्ये शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत संघटनेच्या तयारीची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. दिल्लीतील सरकारी शाळांमधील शिक्षणाची स्थिती सुधारण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आतिशी यांनी सुरुवातीपासूनच शिक्षण पद्धतीवर विशेष भर दिला. त्यांनी सिसोदिया यांच्या सल्लागारपदी असताना नव्या शिक्षण नितीवर काम केले व एकूणच शिक्षण प्रणालीत महत्त्वाचे बदल घडवून आणले.
दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक विजय कुमार सिंग आणि तृप्ता वाही यांच्या पोटी जन्मलेल्या आतिशीचे शालेय शिक्षण दिल्लीच्या स्प्रिंगडेल स्कूलमधून झाले. त्यानंतर त्यांनी सेंट स्टीफन कॉलेजमध्ये इतिहासाचा अभ्यास केला. येथे त्यांनी विशेष नैपुण्य दाखवत दिल्ली विद्यापीठात प्रथम आली. त्यानंतर शेव्हनिंग शिष्यवृत्तीवर पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी त्या ऑक्सफर्ड विद्यापीठात गेली. काही वर्षांनी त्यांनी ऑक्सफर्डमधून शिक्षण संशोधनात रोड्स स्कॉलर म्हणून दुसरी पदव्युत्तर पदवी मिळवली.
समाज व्यवस्था सुधारण्याच्या कल्पनेने भारून गेलेल्या आतिशी यांनी मध्य प्रदेशातील गावांत ७ वर्षे घालवली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर समाजात बदल घडवून आणण्याच्या इच्छेमुळेच त्या राजकारणात ओढल्या गेल्या. मध्यप्रदेशातील गावांत असताना त्यांनी तेथील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी अनेक कल्पक योजना आखल्या. त्यांनी राबवलेलले सेंद्रिय शेतीचे काही प्रकल्प आणि प्रगतीशील शिक्षण प्रणालीमुळे आजही त्यांचा या गावात चाहता वर्ग आहे. त्यांनी तिथे अनेक ना-नफा संस्थांसोबत काम केले, येथेच त्या आम आदमी पार्टीच्या सदस्यांना भेटल्या.
२०१३ मध्ये आम आदमी पार्टीच्या स्थापनेच्या वेळी आतिशी 'आप'मध्ये सामील झाल्या. पक्षाच्या स्थापनेच्या सुरुवातीच्या काळात 'आप'च्या धोरणांना आकार देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पक्षाच्या धडाडीच्या प्रवक्त्या म्हणूनही त्यांनी काम पाहिले. टीव्ही चॅनेल्सवर त्यांची बोलण्याची पद्धत आणि त्यांचा शांत स्वभाव यामुळे लोकांचे लक्ष वेधून घेतले.
आम आदमी पार्टीच्या सर्व आमदारांनी आतिशी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. केजरीवाल आज सायंकाळी साडेचार वाजता लेफ्टनंट गव्हर्नर (एलजी) विनय सक्सेना यांच्याकडे राजीनामा सोपवतील. नवीन मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधीही याच आठवड्यात होणार आहे. येत्या २६ आणि २७ सप्टेंबर रोजी विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशनही बोलावण्यात आले आहे. १३ सप्टेंबरला मद्य धोरण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर केजरीवाल यांनी १५ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली होती.
१) केजरीवाल-सिसोदिया यांच्या जवळच्या आणि सर्वात विश्वासू महिला नेत्या.
२) केजरीवाल-सिसोदिया तुरुंगात असताना पक्षाचे काम सचोटीने केले.
३) सिसोदिया तुरुंगात गेल्यावर त्यांनी शिक्षण खात्यासह ६ महत्त्वाची मंत्रालये सांभाळली.
४) २०१३ च्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा तयार करणाऱ्या समितीमध्ये त्या होत्या.
५)बिहारमधील जीतन राम मांझी आणि झारखंडमधील चंपाई सोरेन यांचा अनुभव पाहता आम आदमी पक्षाला अशा चेहऱ्याकडे कमान सोपवायची आहे, जो नंतर बंडखोरी करत केजरीवालच्या सत्तेला आव्हान देणार नाही. आतिशी यांचे अरविंद केजरीवाल यांच्याशी असलेले वैचारिक साम्य पाहता केजरीवाल व सिसोदीया यांचे त्यांना नेहमीच समर्थन मिळाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कधीच फुटणार नाही, असा विश्वासही पक्षाला आहे.
आम आदमी पार्टीने अतिशय हुशारीने आम आदमी पक्षातील सर्वात अनुभवी असलेल्या गोपाल राय यांना पुढे करून आतिशीचे नाव जाहीर केले. आंदोलनाच्या दिवसांपासून ते अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आहेत. अरविंद केजरीवाल यांनाही त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा चांगलीच ठाऊक आहे.