दिल्ली : अरविंद केजरीवाल आज दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांनी सकाळी ११:३० वाजता मुख्यमंत्री भवनात विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. यामध्ये नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित होणार आहे. 'आप' दुपारी १२ वाजता नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा करणार आहे. सायंकाळी ४:३० वाजता केजरीवाल लेफ्टनंट गव्हर्नर (एलजी) विनय सक्सेना यांची भेट घेतील आणि राजीनामा सादर करतील. विशेष म्हणजे आज पीएम मोदींचा ७४ वा वाढदिवसही आहे.
एलजी यांच्या भेटीदरम्यान केजरीवाल दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नावही सादर करतील. समोर आलेल्या माहितीनुसार, आतिशी, कैलाश गेहलोत, गोपाल राय आणि सुनीता केजरीवाल यांच्यापैकी कोणीही दिल्लीचे पुढील मुख्यमंत्री होऊ शकते. नवीन मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधीही याच आठवड्यात होणार आहे.
१३ सप्टेंबरला मद्य धोरण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर केजरीवाल यांनी १५ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली होती. मी प्रमाणिक आहे; माझ्या प्रामाणिकपणाचा निकाल जनतेच्या न्यायालयात लागेल असे त्यांनी म्हटले होते.
*खलिस्तानी संघटनांकडून १३३ कोटी रुपये घेतल्याचा आरोप: मार्च २०२४ मध्ये, वर्ल्ड हिंदू फेडरेशनने आरोप केला की अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने २०१४ ते २०२२ दरम्यान खलिस्तानी दहशतवादी गटांकडून १३३ कोटी रुपये घेतले होते. देवेंद्र पाल भुल्लरची सुटका व्हावी यासाठी हा प्रपंच होता. यानंतर व्हीके सक्सेना यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात एनआयए तपासाची शिफारस केली. मात्र, 'आप'ने हे आरोप फेटाळून लावले होते.
*दिल्ली मद्यधोरण घोटाळा: केजरीवाल सरकारने २०२१ मध्ये नवीन दारू धोरण आणले. जुलै २०२२ मध्ये, एलजीने त्यात अनियमितता आढळून आल्याने सीबीआय चौकशीची शिफारस केली. ईडी-सीबीआयने ऑगस्ट २०२२ मध्ये गुन्हे दाखल केले. केजरीवाल यांना ईडी आणि सीबीआयने या घोटाळ्याचा मास्टरमाइंड म्हणत अटक केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ईडी प्रकरणात जुलैमध्ये आणि सीबीआय प्रकरणात सप्टेंबरमध्ये जामीन मंजूर केला होता. सुमारे १७७ दिवस ते तिहार तुरुंगात राहिले.
* अधिकाऱ्यांच्या बदल्या-पोस्टिंग: ११ मे २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला अधिकाऱ्यांच्या बदल्या-पोस्टिंगवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार दिला. तसेच दिल्ली एलजी राज्य सरकारच्या सल्ल्यानेच काम करेल, असेही सांगितले. हा आदेश आल्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सेवा सचिव आशिष मोरे यांना हटवले. आशिष मोरे यांच्या विरोधात घेतलेल्या या निर्णयाला एलजीने स्थगिती दिली आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे.
* ठकसेन सुकेशचा दावा - प्रकल्प मंजूर करण्याच्या बदल्यात भेटवस्तू दिल्या गेल्या : ठकसेन सुकेश चंद्रशेखर याने दिल्लीतील एलजी सक्सेना यांना लिहिलेल्या पत्रानुसार करोलबागमध्ये प्रकल्प मिळवण्यासाठी त्यांनी घराच्या नूतनीकरणासाठी फर्निचर भेट म्हणून पाठवले होते. त्यात राल्फ लॉरेन आणि व्हिजनियर ब्रँडचे फर्निचर देखील समाविष्ट होते. याशिवाय ९० लाख रुपयांची चांदीची क्रोकरीही त्यांना देण्यात आली.