भारताचे पुढील दीड वर्षांचे व्यस्त वेळापत्रक पाहता बांगलादेश मालिकेसाठी अनेक दिग्गज खेळाडूंना वर्कलोड मॅनेजमेंटचा ताळमेळ साधत विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.
मुंबई : दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातून मानसिक थकव्याचे कारण देत माघारी परतल्यानंतर भारताचा आक्रमक यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनचे ग्रह काहीसे फिरल्याचे दिसत होते. त्यातल्यात्यात बीसीसीआयचे तत्कालीन सचिव जय शहा यांनी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांत समाधान कामगिरी केल्याशिवाय कुणासाठीही भारतीय संघाचे दरवाजे उघडले जाणार नाही असे म्हटले होते. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या इशान किशनला बोर्डाने तंबी दिल्यानंतर त्याने आयपीएल आणि देशांतर्गत इतर स्पर्धांत भाग घेतला. दरम्यान सध्या सुरू असलेल्या दुलीप करंडक स्पर्धेत त्याने दमदार कामगिरी करत एक शतक फटकावले व भारतीय संघातील जागेसाठी आपली दावेदारी पेश केली.
इशान किशनचा टीम इंडियात पुनरागमनाचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे. कारण, भारतीय निवड समिती उपकर्णधार शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि ऋषभ पंत या खेळाडूंना वर्कलोड मॅनेजमेंट पॉलिसी अंतर्गत बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेतून विश्रांती देण्याचा विचार करत आहेत. तसेच यावेळी यष्टीरक्षकाच्या जागेसाठी प्रथम पसंती असेलल्या ऋषभ पंतला विश्रांती दिल्यास किशनच्या नावाचा विचार होऊ शकतो. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार 'शुभमन गिलसह काही वरिष्ठ खेळाडूंना ६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेतून विश्रांती दिली जाईल'. गिल, बुमराह, पंत आणि सिराज हे येत्या १९सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत सहभागी होणार आहेत.
गेल्या वीस वर्षांत क्रिकेटच्या जगतात आमूलाग्र बदल झाले आहेत. एका वर्षात भारतीय संघ किमान ३ विदेशी दौऱ्यांवर तर ५-६ क्रिकेट मालिका या मायदेशी खेळतो. यात वर्ष भरात ६-१० कसोटी, ८-१२ एकदिवसीय आणि बरेच टी-२० सामने तसेच एखाद्या बहूपक्षीय मालिकेचा देखील समावेश आहे. तसेच देशांतर्गत क्रिकेट स्पर्धाही बऱ्याच असतात. आयपीएल स्पर्धाही याच व्यस्त वेळापत्रकाचा महत्वपूर्ण भाग आहे. आयपीएलचा विचार करूनच सर्व क्रिकेट बोर्ड आपले क्रिकेट दौरे ठरवतात असे म्हणल्यास वावगे ठरू नये. इतक्या व्यस्त वेळापत्रकातून जात असतांना खेळाडूंना दुखापत होऊ नये आणि झाल्यास त्यातून सावरता यावे यासाठी रोटेशनल पद्धतीने खेळवले जाते.
आता आगामी काळात भारताला १० कसोटी सामने खेळायचे आहेत. यातील ५ कसोटी सामने घरच्या मैदानावर होणार आहेत. भारताचा सामना बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ५ कसोटी सामने खेळणार आहे. बांगलादेशसोबतची टी-२० मालिका आणि न्यूझीलंडसोबतची मालिका यामध्ये फक्त ३ दिवसांचे अंतर आहे. बांगलादेश टी-२० मालिकेतील सामने ७ तारखेला ग्वाल्हेर, १० तारखेला दिल्ली आणि १३ ऑक्टोबरला हैदराबादमध्ये होणार आहेत. न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका १६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
*शुभमन गिल: भारतीय कसोटी संघात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज. रोहित शर्मा, विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांच्यासह गिल संघाच्या टॉप ऑर्डरचा महत्त्वाचा भाग आहे.
*ऋषभ पंत: निवडकर्त्यांसाठी पंतचा वर्कलोड महत्त्वाचा आहे आणि कसोटीत त्याची सर्वाधिक गरज आहे. कारण भारताला अजून १० कसोटी खेळायच्या आहेत.
*जसप्रीत बुमराह: तो संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. गेल्या वर्षी दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर सातत्याने सामने खेळत आहे. त्यांना विश्रांती देणे महत्वाचे आहे.
*मोहम्मद सिराज : बुमराहचा जोडीदार. ऑस्ट्रेलियाविरुद्ध महत्त्वपूर्ण सिद्ध होईल. अशा परिस्थितीत त्यांना ताजेतवाने ठेवणे महत्त्वाचे आहे.
भारताने अमेरिकेत पार पडलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करत टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले. आता येणाऱ्या काळत चॅम्पियन्स करंडक (५०-षटके), टेस्ट चॅंपियनशिप (कसोटी) तसेच अन्य 'सेना' देशांतील महत्त्वाच्या मालिका होत आहेत. यामध्ये एकदिवसीय तसेच कसोटी सामन्यांवर लक्ष केंद्रित केले जाणार असून टी-२० सामन्यांना कमी प्राधान्य दिले जाणार आहे. भारताला पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये एकदिवसीय सामन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी आणि जूनमध्ये कसोटीतील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम फेरी खेळायची आहे.