नवी दिल्ली : दिल्ली मद्यधोरण घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची जामिनावर सुटका झाली. आज दिल्लीच्या आम आदमी पक्षाच्या कार्यालयात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भाजपने माझ्यावर अप्रामाणिकपणा आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले, आता जनतेच्या न्यायालयातच माझ्या प्रामाणिकपणाचा निर्णय होईल. निवडणुकीपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच मनीष सिसोदिया यांच्यावरही माझ्यासारखेच आरोप आहेत, ते देखील कोणतेही पद घेणार नाहीत असे केजरीवाल यांनी यावेळी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर तब्बल १५६ दिवसांनंतर तिहार जेलमधून मुख्यमंत्री केजरीवाल बाहेर आले. ते तुरुंगात असताना त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी केली होती. त्यामुळे केजरीवाल नेमकी काय भूमिका घेतात या कडे सर्वांचे लक्ष लागून होते. आज दिल्ली येथील सभेत त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली.
मी प्रमाणिक आहे. तुम्हालाही असे वाटत असल्यास आम आदमी पक्षाला भरभरून मतदान करा. दिल्लीच्या निवडणुका येत्या फेब्रुवारीत पार पडणार आहेत. महाराष्ट्राची निवडणूक नोव्हेंबर मध्ये होणार आहे, दिल्लीचीही त्यासोबच व्हावी. अशी माझी मागणी आहे असे ते यावेळी म्हणाले. जोपर्यंत निवडणुका पार पडत नाहीत तोपर्यंत पक्षातूनच कुणीतरी मुख्यमंत्रीपद सांभाळेल, येत्या दोन दिवसांत आमदारांच्या बैठकीत पुढचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर येईल असेही ते म्हणाले.
१) मुख्यमंत्री, पण सत्ता नाही: अरविंद केजरीवाल दिल्ली मद्यधोरण प्रकरणात १७७ दिवसांनंतर जामिनावर तुरुंगातून बाहेर आले. ते मुख्यमंत्री कार्यालयात जाणार नाहीत आणि कोणत्याही फाईलवर स्वाक्षरी करणार नाहीत, अशी अट सर्वोच्च न्यायालयाने ठेवली आहे. म्हणजे तुरुंगातून बाहेर येऊन मुख्यमंत्री असूनही त्यांच्याकडे सत्ता राहिलेली नाही. मंत्रिमंडळाच्या भरवशावर सरकार चालेल.
२)अवघ्या ५ महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक: दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२५ मध्ये संपत आहे. म्हणजे सरकारकडे निवडणुकीसाठी अवघे ५ महिने उरले आहेत. केजरीवाल न्यायालयाच्या अटींना बांधील आहेत. मात्र तुरुंगातून सुटल्यानंतर केजरीवाल यांच्याबद्दल लोकांत सहानुभूती आहे. या सहानुभूतीचे भांडवल केजरीवाल यांना दोन-तीन महिने आधीच दिल्लीत निवडणुकांची मागणी करून करायचे आहे.
३)भाजपने राजीनामा मागितला होता, त्याचेही उत्तर देऊ: दिल्ली दारू धोरण प्रकरणात त्यांचे नाव आल्यापासून आणि अटक झाल्यापासून भाजप नेते अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे, अशी मागणी करत आहेत. केजरीवाल यांनी आता राजीनामा जाहीर केला आहे. आता मी राजीनामा दिला आहे, असे सांगून भाजप नेत्यांच्या प्रत्येक हल्ल्याला ते प्रत्युत्तर देतील.