वर्षांच्या सुरुवातीला उत्तराखंडमध्ये जंगलात लागलेल्या भीषण वणव्यामुळे उत्सर्जित झालेल्या कार्बन डाय ऑक्साइडसारख्या वायुमुळे बर्फ वितळला असावा असा निष्कर्ष अनेकांनी काढला आहे
पिथौरागढ: उत्तराखंडच्या पिथौरागढमध्ये असलेला ओम पर्वत अनेकांचे श्रद्धास्थान आहे. अनेक भाविक, पर्यटक तसेच पर्वतारोही येथे निसर्गाचा व अध्यात्माचा अनुभव घेण्यासाठी येतात. मात्र गेल्या काही काळात येथे येणाऱ्या पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. ओम पर्वतावर दिसणारा ॐ हा गायब झाला आहे. वाढत्या तापमानामुळे हे घडले असावे असे हवामानशास्त्रज्ञांणी म्हटले असून, याचे योग्य निराकारण न झाल्यास भविष्यात ही समस्या गंभीर रूप धारण करेल अशी चिथावणी देखील दिली आहे.
पिथौरागढ जिल्ह्यातील व्यास खोऱ्यात असलेले ओम पर्वत हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ठिकाणी भेट दिली आणि त्यांची छायाचित्रेही शेअर केली तेव्हा सुमारे १४,००० फूट उंचीवर वसलेल्या ओम पर्वताची लोकप्रियता आणखीनच वाढ झाली. डोंगराच्या माथ्यावर नैसर्गिक हिमवर्षाव होतो तेव्हा या पर्वतावर असलेल्या खाचांत बर्फ साचुन ओमचा आकार बनतो, जो अगदी १०-१२ किलोमीटर अंतराच्या परिघातूनही स्पष्टपणे दिसतो. त्यामुळे या पर्वताला ओम पर्वत हे नाव पडले आहे. हा डोंगर वर्षभर बर्फाने झाकलेला असतो तरी यंदा मात्र येथून अचानक बर्फ गायब झाल्याने अनेक स्तरांतून चिंता व्यक्त केली जात आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पंतप्रधानांच्या भेटीपासून येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याचेही हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पीएम मोदींनी आदि कैलास पर्वत शिखराला भेट देण्यासाठी जोलिंगकाँगला भेट दिल्यानंतर येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या जवळपास १० पट वाढली आहे. स्थानिक लोक आणि पर्यावरणवाद्यांचे मत आहे की पर्यटकांच्या जास्त संख्येमुळे येथील वातावरण बदलत आहे. पिथौरागढमध्येही अनेक दिवसांपासून बांधकाम सुरू आहे. हिमालयीन प्रदेशांवर त्याचा विपरीत परिणाम होईल, असा दावा केला जात आहे. २०१९ मध्ये रस्ता तयार झाल्यापासून दररोज सुमारे १० वाहने ओम पर्वताकडे जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कार्बनचे प्रमाण वाढत असून त्यामुळे संवेदनशील पर्वतांवर वाईट परिणाम होत आहेत.
यासोबतच कुमाऊं मंडल विकास निगमने सुरू केलेली हेलिकॉप्टर दर्शन सेवाही यासाठी जबाबदार धरण्यात येत आहे, त्यामुळे हिमालयीन भागात प्रदूषण वाढत आहे. त्याविरोधात स्थानिकांनी निदर्शनेही केली होती. हेलिकॉप्टर आदि कैलास आणि ओम पर्वतावर थेट न नेता ओम पर्वताच्या १६ किमी आधी गुंजी येथे थांबवले तर पर्यावरणाचे रक्षण होऊन स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी स्थानिकांची मागणी होती.
आदि कैलाश यात्रा बेसकॅम्प,धारचुलाचे प्रभारी धन सिंह बिश्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमाऊं मंडल विकास निगममध्ये काम करत असताना त्यांनी यंदा पहिल्यांदाच ओम पर्वत पूर्णपणे बर्फमुक्त पाहिला आहे. दरवर्षी साधारणपणे ९५-९९ टक्के बर्फ वितळत असे, पण यावर्षी पूर्ण १०० टक्के बर्फ वितळला असल्याचे त्यांनी सांगितले. जी.बी. पंत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन एन्व्हायर्नमेंट, अल्मोडाचे संचालक सुनील नौटियाल यांनी माध्यमानशी बोलतांना येथे उद्भवलेल्या एकूण परीस्थितिवर प्रकाश टाकला.
ओम पर्वतातून बर्फ गायब होण्यामागे ग्लोबल वॉर्मिंग, तसेच इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे हिमालयीन प्रदेशातील संवेदनशील भागात तापमान वाढले आहे. त्याच बरोबर वर्षांच्या सुरुवातीला उत्तराखंडमध्ये जंगलात लागलेल्या भीषण वणव्यामुळे उत्सर्जित झालेल्या कार्बन डाय ओक्साइडसारख्या वायुमुळे बर्फ वितळला आहे असे त्यांनी म्हटले आहे. जंगलातील आगीमुळे निर्माण होणारा कार्बन हिमालयातील संवेदनशील ठिकाणांनाही हानी पोहोचवत आहे, हे तंतोतंत खरे आहे.