वायनाडमधील (केरळ) मृतांची संख्या २७६ वर. बचावकार्य सुरूच. लष्कराने आपत्कालीन पूल बांधण्याचे काम पूर्ण केल्याने बचावकार्याला येणार वेग.
वायनाड : केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलनाच्या घटनांमध्ये मृतांची संख्या २७६ च्या आसपास पोहोचली आहे. २०० हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. मदत कर्मचाऱ्यांनी सुमारे १ हजार लोकांना वाचवले आहे. मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. लष्कराने पूल बांधण्याचे काम जवळपास पूर्ण केले आहे. लष्कराच्या म्हणण्यानुसार, आज गुरुवार संध्याकाळपर्यंत पुलाचे काम पूर्ण होणार आहे. हा पूल बांधल्यानंतर मदत आणि बचाव कार्याला वेग येईल. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वायनाडला भेट देत आहेत. दोन्ही नेते मदत शिबिरात पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.
मुख्यमंत्री पिनराई विजयन सर्वपक्षीय बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. या बैठकीला राज्याचे मंत्री, वायनाडचे आमदार आणि जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे नेते उपस्थित राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. बुधवारी रात्रीपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मृतांपैकी १०० जणांची ओळख पटली आहे. बचावकार्य तिसऱ्या दिवशीही सुरूच होते आणि अट्टामाला, मुंडक्काई आणि चुरलमाला येथे लष्कर, नौदल आणि तटरक्षक दलाकडून सखोल शोधमोहीम सुरू असल्याचे एका निवेदनात म्हटले आहे. प्रत्येक टीमसोबत श्वान पथकही तैनात करण्यात येणार आहे.
वायनाडच्या भूस्खलनग्रस्त भागात बचाव कार्याला गती देण्याच्या प्रयत्नात, मुंडक्काई आणि चुरलमला या सर्वात जास्त प्रभावित भागांना जोडण्यासाठी १९० फूट लांबीचा 'बेली ब्रिज' बांधला जात आहे. चोवीस टन लोड क्षमता असलेल्या या पुलाचे बांधकाम गुरुवारी सायंकाळपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. मद्रास इंजिनियर्स ग्रुप (#MEG) च्या टीमने चुरमलाई येथील पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत आहेत.
मदत आणि बचाव कार्याबाबत मेजर जनरल मॅथ्यू दिलेल्या माहितीनुसार, केरळ सरकार आणि लोकांना ३० जुलैच्या सकाळपासून मदत करत आहोत. १०० हून अधिक मृतदेह बाहेर काढले आहेत आणि एकूण मृतदेहांची संख्या यापेक्षा कितीतरी जास्त आहे. बऱ्याच लोकांची सुटका करण्यात आली आहे,मात्र येथे अजून लोक अडकले आहेत की नाही हे पाहण्यासाठी एक पूल बांधण्याची गरज आहे. शोध आणि बचाव कार्यासाठी श्वान पथकाचाही वापर केला जाईल. सध्या या ठिकाणी लष्कराचे ५०० जवान ड्युटीवर आहेत.