अधिवेशनात आतापर्यंत नवे शैक्षणिक धोरण, आपत्कालीन व्यवस्थापन, वीज दरवाढ, पायाभूत साधनसुविधा, कचरा व्यवस्थापन आदींसारखे काही महत्त्वाचे विषय चर्चेला आलेले आहेत. म्हादईसारखे महत्त्वपूर्ण विषय पुढील आठ दिवसांत चर्चेला येणार आहेत. त्यामुळे विरोधकांनी आतातरी भानावर येऊन एकमेकांना साथ देणे आणि तमाम गोमंतकीयांचा त्यांच्याप्रती असलेला विश्वास शाबून ठेवणे महत्त्वाचे आहे.
राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातील दहा दिवस संपले आहेत. अधिवेशन ७ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असल्याने अजून आठ दिवसांचे कामकाज शिल्लक आहे. गेल्या दहा दिवसांच्या सभागृहातील कामकाजाचा आढावा घेतल्यास विरोधकांमधील छुप्या फुटीमुळे अनेक प्रश्नांना सरकारकडून म्हणावा तसा न्याय मिळालेला नसल्याचे आणि या फुटीचा मंत्री योग्य प्रकारे वापर करून घेत असल्याचे प्रकर्षाने जाणवते.
१५ जुलैपासून अधिवेशनास सुरुवात झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनीच गदारोळ घातल्यामुळे पहिल्या दोन दिवसांचे प्रश्नोत्तराचे तास वाया गेले. पहिल्या दोन दिवसांत नवे शैक्षणिक धोरण, वीज दरवाढ असे प्रश्न चर्चेला येणार होते. यावरून अधिवेशनाच्या प्रारंभीच विरोधकांनी संघटित होऊन सरकारला घेरू नये, यासाठीच प्रश्नोत्तराचा तास बंद पाडण्याचा डाव सत्ताधाऱ्यांनी आखल्याची चर्चाही सुरू झाली. परंतु, तिसऱ्या दिवसानंतर आतापर्यंत काही प्रश्न, समस्या वगळता विरोधी आमदारांनी सरकारची म्हणावी तशी कोंडी केल्याचे दिसून आलेले नाही.
गत विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर विरोधी बाकांवर केवळ सात आमदार राहिले. ‘सात असलो म्हणून काय झाले, आम्ही साथ साथ आहोत’, असे म्हणत प्रत्येक विधानसभा अधिवेशनात आम्ही संघटित राहून सरकारला धारेवर धरू, अशी घोषणा विरोधात असलेल्या काँग्रेस, आप, गोवा फॉरवर्ड आणि रिव्हॉल्यूशनरी गोवनच्या (आरजी) आमदारांनी छातीठोकपणे केली होती. यापूर्वीच्या अधिवेशनांमध्ये त्याचा प्रत्ययही आला. पण, सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात मात्र विरोधकांमध्ये मोठी फूट पडल्याचे वारंवार दिसून येत आहे. गेल्या दहा दिवसांच्या कामकाजात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार विजय सरदेसाई यांनी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्यावर चढवलेला हल्ला आणि दक्षिण गोव्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयावरून आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची केलेली कोंडी वगळता महत्त्वाच्या प्रश्नांवरून लढण्यास विरोधक एकत्र आल्याचे चित्र दिसले नाही.
विधानसभा अधिवेशनात राज्यभरातील जनतेला छळत असलेले प्रश्न मांडून सरकारकडून त्यावर तोडगा काढून घेण्याची जबाबदारी विरोधकांची असते. परंतु, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव वगळता विरोधातील चारही पक्षांचे आमदार जनतेच्या प्रश्नांपेक्षा स्वत:च्या पक्षाच्या धोरणानुसार काम करीत आहेत. काँग्रेसकडे जे तीन आमदार आहेत, त्यातील युरी आलेमाव विरोधी पक्षनेते या नात्याने धडपड करीत आहेत, यात शंका नाही. राज्याच्या अनुषंगाने आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांवरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह संबंधित खात्यांच्या मंत्र्यांवरही ते तुटून पडत आहेत. दुसरे आमदार एल्टन डिकॉस्टा प्रत्येकवेळी युरी आलेमाव यांना पाठिंबा देताना दिसतात. पण, कायद्याचे प्रचंड ज्ञान असतानाही आमदार कार्लुस फेरेरा मात्र अनेकवेळा युरींना साथ देण्यास पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. ‘आप’चे व्हेंझी व्हिएगश आणि क्रूज सिल्वा यांनी तर सुरुवातीपासूनच आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला आणखी यश मिळवून देण्यासाठी आवश्यक अशाच प्रश्नांवर आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. सभागृहात अन्याय होत असल्याचे जाणवताच पूर्वी विरोधी सातही आमदार सभापतींसमोरील हौदात जाऊन गोंधळ घालत होते. त्यात अनेकवेळा त्यांना सभागृहाबाहेर जावे लागले. काहीवेळा त्यांचा गोंधळ शांत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीही प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली. पण, या अधिवेशनात मात्र आतापर्यंत सर्वच विरोधी आमदार एकत्ररित्या हौदात गेल्याचे दिसले नाही. दक्षिण गोव्यातील खासगी महाविद्यालयाच्या विषयावेळी तर विजय सरदेसाई, युरी आलेमाव, कार्लुस फेरेरा, एल्टन यांच्यासोबत व्हेंझीही हौदात गेले. त्याचवेळी दुसरा प्रश्न व्हेंझी व्हिएगश यांचा होता. सभापती रमेश तवडकर यांनी त्यांचे नाव पुकारताच हौदात गेलेल्या व्हेंझींनी इतरांची साथ सोडून आपल्या जागेवर धाव घेतली. गोवा फॉरवर्डचे एकमेव आमदार विजय सरदेसाई राज्याचे प्रश्न आक्रमकपणे मांडतात, यात शंका नाही. पण या अधिवेशनात विजय सरदेसाईच इतर विरोधकांपासून फुटल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. याआधी विरोधी आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांना मंत्र्यांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास विजय संबंधित मंत्र्यांवर तुटून पडत होते. किंबहुना मंत्र्यांनी उत्तरे देताना आमदारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्यास विजय सरदेसाई अभ्यासू भाषणाने त्यांना गारद करीत होते. आता मात्र विजय विरोधातील एकाही आमदाराच्या मदतीस धावून जाताना दिसत नाहीत. विजय सरदेसाईंच्या प्रश्नांवरून वाद पेटल्यास विरोधी पक्षनेते युरी आलेमाव सरदेसाईंना मदत करतात. परंतु, विजय मात्र यात हात आखडता घेत असल्याने मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांचे काम सोपे झाले आहे. गोवा आणि गोमंतकीयांच्या रक्षणासाठीच राजकीय पक्ष स्थापन करून राजकारणात उतरल्याचा दावा करणारे ‘आरजी’चे एकमेव आमदार विरेश बोरकर नव्याची नवलाईप्रमाणे याआधीच्या अधिवेशनांमध्ये विविध प्रश्नांवर बोलत राहिले, विरोधी आमदारांच्या सोबतीला राहिले. या अधिवेशनात मात्र ते इतर सहाही जणांनी फटकून आहेत. ‘आरजी’साठी महत्त्वाचे विषय वगळता इतर प्रश्नांचे मात्र त्यांना काहीही सोयरसूतक नसल्याचे ते स्वत:हूनच दाखवून देत आहेत. आपला सांतआंद्रे मतदारसंघ वगळता राज्यातील इतर महत्त्वाच्या विषयांवर बोलण्याचेच ते टाळत आहे. विरोधी आमदारांमधील ही दरी चाणाक्ष असलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अधिवेशनाच्या तिसऱ्याच दिवशी ओळखली. तेव्हापासून विरोधातील एखादा आमदार आक्रमक झाला, तर त्याला एका क्षणात कसे शांत बसवायचे याची युक्तीही त्यांनी शोधून काढली असून, कामकाज पाहत असलेल्या बहुतांशी जणांना त्याची कल्पनाही आलेली आहे.
सत्ताधारी आमदारांच्या कामगिरीचा विचार केल्यास सत्ताधाऱ्यांमधील शंभर टक्के आमदारांनी या अधिवेशनाच्या माध्यमातून आपापल्या मतदारसंघांतील प्रश्न, समस्या सोडवण्याची हमी मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांकडून मिळवण्याचेच ध्येय समोर ठेवले आहे. त्यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नांमधून ही बाब स्पष्टपणे दिसून येत आहे. दुसरीकडे, विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल सुरू झाल्यानंतर पूर्वी नीलेश काब्राल, मॉविन गुदिन्हो, संकल्प आमोणकर हे आमदार चर्चेत सहभागी होऊन मुख्यमंत्र्यांना हातभार लावत होते. यावेळी मात्र विरोधकांना मुख्यमंत्री एकटेच भिडत असल्याचे दिसत आहे. विरोधकांप्रमाणेच सत्ताधाऱ्यांमध्येही दुही निर्माण झाल्यामुळे असे घडत आहे की विरोधकांतील फुटीमुळे त्यांना मुख्यमंत्र्यांच्या मदतीस जाण्याची गरज नाही, याचे कोडे मात्र अजूनही उलगडत नाही. पूर्वी प्रश्नोत्तरासह पुरवण्या मागण्यांवरून सत्ताधारी आणि विरोधी आमदार संबंधित मंत्र्यांवर बरसत होते, ते चित्र या अधिवेशनात दिसत नाही. कृषीमंत्री रवी नाईक यांनी तर पुरवण्या मागण्यांवर अवघे दहा मिनिटांचे भाषण दिले. इतर काही मंत्र्यांनीही आमदारांच्या प्रश्नांना सकारात्मक उत्तरे दिली नाहीत. तरीही काही आमदार वगळता इतर मात्र ‘आळीमिळी गुपचिळी’ आहेत. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांना म्हणावा तसा न्याय मिळत असलेला दिसत नाही.
एकंदरीत, अधिवेशनात आतापर्यंत नवे शैक्षणिक धोरण, आपत्कालीन व्यवस्थापन, वीज दरवाढ, पायाभूत साधनसुविधा, कचरा व्यवस्थापन आदींसारखे काही महत्त्वाचे विषय चर्चेला आलेले आहेत. म्हादईसारखे महत्त्वपूर्ण विषय पुढील आठ दिवसांत चर्चेला येणार आहेत. त्यामुळे विरोधकांनी आतातरी भानावर येऊन एकमेकांना साथ देणे आणि तमाम गोमंतकीयांचा त्यांच्याप्रती असलेला विश्वास शाबून ठेवणे महत्त्वाचे आहे.
सिद्धार्थ कांबळे, ७५१७६६१७७८