परक्या व्यक्तीच्या दुःखाने ज्याचे हृदय कळवळते, त्यालाच जीवन कळले हो! असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. आजकाल जो तो आपले दु:ख किती मोठे आहे हे सांगताना समोरची व्यक्ती किती दुःखात आहे, याचा विचार कधी करताना दिसत नाही. जेव्हा समोरच्या व्यक्तीच्या दु:खाची जाणीव झाल्यावर त्या व्यक्तीचे दु:ख नाहीसे करण्याचा जी व्यक्ती प्रयत्न करते, ती व्यक्ती श्रेष्ठ म्हणून गणली जाते. आणि जेव्हा हे महान कार्य अवघ्या पंधरा वर्षांची मुलगी करते, तेव्हा तिच्यापुढे नतमस्तक व्हावेसे वाटते.
कामुर्ली बारदेश येथे राहणारी आणि म्हापसा येथील ज्ञानप्रसारक विद्यालयात इयत्ता दहावीत शिकणारी श्रिया शिवानंद साळगांवकर ही अवघ्या पंधरा वर्षांची मुलगी. पण तिने जे कार्य केले आहे, ते निश्चितच कौतुकास्पद आहे. श्रियाच्या वर्गात तिच्याच वयाची सविता (नाव बदलले आहे) नावाची एक मुलगी शिक्षण घेते. सविता ही मूळ कारवारची. दोन वर्षांपूर्वी सविताचे वडील वारले. सविताला एक दिव्यांग भाऊ व दहा वर्षांची लहान बहीण आहे. सविताची आई लोकांच्या घरी पडेल ते घरकाम करून आपला आणि आपल्या मुलांचा उदरनिर्वाह करत असल्याने सविताचे वडील वारल्यावर या सर्वांचा सांभाळ करणे कठीण होईल या उद्देशाने तिच्या आईने सविताला पुढील शिक्षणासाठी गोव्यात राहणार्या तिच्या मावशीकडे पाठवून दिले. सविताने ज्ञानप्रसारक विद्यालय, म्हापसा येथे शिक्षणासाठी प्रवेश घेतला.
सविता गोव्यात आपल्या मावशीकडे आल्यावर तिला अनेक वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागले. डोक्यावरील पित्याचे छत्र हरपल्यावर समोर असलेले जीवन जगताना तिला आलेले अनुभव फार वाईट होते. तिच्या सख्या मावशीकडूनच तिचा मानसिक आणि शारीरिक छळ होऊ लागला. तिची मावशी सविताकडून सर्व घरातील कामे करून घेताना तिला दोन-दोन दिवस उरलेले शिळे अन्न देणे, प्रसंगी मारहाण करणे असे प्रकार करत असे. बिचार्या सविताला हे सर्व सहन करण्यापलीकडे दुसरा मार्ग नव्हता. सविताने अनेक वेळा शेजार्यांना आपल्यावर काय प्रसंग ओढवत आहे याची कल्पना देताना पोलीस स्टेशनलाही आपली व्यथा कळवली. पण त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही.
मावशीचा जाच असह्य झालाच पण त्यात मावशीने सविताला घराबाहेर काढले. असहाय्य सविताने शेवटी समोर राहणार्या एका बाईला आपली कर्मकहाणी सांगताना मावशीच्या या जाचातून सुटण्यासाठी तिच्याकडे आसरा देण्याची विनंती केली. त्या बाईने सविताला पंधरा दिवस आपल्या घरी ठेवून घेतले. पण ती बाईही गरीब असल्याने तिला सविताच्या राहाण्या जेवण्याचा खर्च परवडत नसल्याने तिने सविताला एखाद्या सरकारी संस्थेमध्ये आश्रित म्हणून राहण्याचा सल्ला दिला. सविताने आपल्याला जमेल तशी सर्व चौकशी केली, पण वयाची अठरा वर्षे पूर्ण न झाल्याने हॉस्टेलमध्ये तिला प्रवेश नाकारण्यात आला.
सविता आता हतबल झाली होती. पुढचे जीवन कसे काढायचे हा प्रश्न तिच्या समोर ‘आ’ वासून उभा होता. सविताच्या वर्गातच श्रिया शिकत होती. एके दिवशी सविताने आपली ही सर्व कर्मकहाणी श्रियाला सांगितली.
श्रिया सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. सुहासबुवा वझे यांच्याकडे कीर्तन शिकत असतानाच तिला भक्तीची, माणुसकीची, परोपकाराची जाणीव झाली. तिच्या परोपकारी स्वभावामुळे दुसर्यांचे दु:ख समजून घेण्याच्या तिच्या वृतीत कमालीचा सोशिकपणा आला असून दु:खात असलेल्या समोरच्या व्यक्तीला समजून घेताना त्या व्यक्तीला मदत करणे हा तिचा स्थायी स्वभाव बनून गेला. त्यामुळे जेव्हा सविताने आपल्याच वर्गात शिकणार्या श्रियाकडे आपल्या दु:खाची वाच्यता केली, तेव्हा श्रियाच्या कोमल मनात दयेचा पाझर फुटला आणि तिने सविताला मानसिक आधार देत, आपल्या वडिलांकडे सर्व घडलेल्या गोष्टी सांगितल्या श्रियाला आपल्या घरी आणायची परवानगी मागितली.
श्रियाच्या वडिलांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तिच्या मागणीला होकार दर्शवला, पण भविष्यात काही त्रास नको म्हणून तिच्या आईला कारवारहून बोलावून घेतले आणि एक साधाच करार लिहून घेतला. दहावीची परीक्षा होईपर्यंत माणुसकीच्या दृष्टिकोनातून सविताला त्यांच्या घरी ठेवून घेताना तिचा सर्व खर्च करण्याचा मोठा निर्णय घेतला.
सविता आणि श्रिया या गेली दोन वर्षे एकमेकांना ओळखत आहेत. पण इतका मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करूनही सविताने शाळेत कधीच कोणाजवळ याची वाच्यता केली नव्हती. हे वर्ष दहावीचे असल्याने बोर्डाच्या परीक्षेमुळे सविता कारवारला किंवा इतर दूर ठिकाणी राहून आपले शिक्षण पूर्ण करू शकत नव्हती. पण आता श्रिया आणि श्रियाच्या कुटुंबाने सविताला आपल्या घरात आणले आणि सविताच्या दहावीच्या शिक्षणाचा मार्ग सुकर केला. श्रियाचे वडील शिवानंद यांचेही या कार्यात मोठे योगदान आहे. त्यांनी आपल्या मुलीच्या योग्य निर्णयाला मान्यता दिली आणि एका असहाय्य मुलीला भविष्यातील वाईट प्रसंगाना सामोरे जाण्यापासून वाचवले.
सविताच्या वयाची मुले ही आपल्या देशाचा भावी आधार आहेत. जर सविताला योग्य शिक्षण मिळाले तर त्या आधारे कोणत्याही उच्च पदाला पोहोचू शकते. सविताच्या या पडत्या काळात तिला मानसिक आधार देत लहानग्या श्रियाने मोठी कामगिरी बजावली आहे. जर श्रियाने सविताला आपल्या घरी आसरा दिला नसता, तर आज सविताचे जीवन भरकटले असते. कारण हेच वय असते, जेव्हा या वयात कठीण परिस्थिती ओढवल्यावर योग्य ती मदत न मिळाल्यास अशा मुलींचे आयुष्य हे कायमचे बरबाद होऊ शकते. एका चांगल्या मुलीची वाताहत होऊ शकते.
परंतु श्रियाच्या योग्य निर्णयामुळे आज सविताचे जीवन वाईट मार्गाला जाण्यापासून वाचले आहे. इतक्या लहान वयात श्रियासारख्या मुलीने उचललेले हे पाऊल अतिशय कौतुकास्पद असून अनेक मुलींना प्रेरणादायी आहे.
आज सविता श्रियाच्या घरी सुखरूप आहे. पण सवितासारख्या अनेक मुली समाजात आहेत. अशा मुलींच्या शिक्षणाची आणि इतर खर्च उचलण्याची जबाबदारी समाजातील अनेक जागरूक नागरिकांनी उचलायला हवी. तेव्हाच देशाची भावी पिढी मजबूत होऊन आपला देश खर्या अर्थाने सुजलाम सुफलाम होईल.
कविता प्रणीत आमोणकर, रावणफोंड, मडगाव