आषाढ महिन्यात शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीपासून जगन्नाथ रथयात्रा काढली जाते. या रथयात्रेत भगवान जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा भव्य रथात बसून श्री गुंडीचा मंदिरात जातात.
पुरी : ओडिशातील पुरी येथे आजपासून भगवान जगन्नाथाच्या जगप्रसिद्ध रथयात्रेला सुरुवात होत आहे. येथे दरवर्षी भगवान जगन्नाथाची भव्य रथयात्रा आयोजित केली जाते. आषाढ महिन्यात शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीपासून ही रथयात्रा काढली जाते. हिंदू धर्मात या रथयात्रेला विशेष स्थान आहे. रथयात्रेचे दर्शन घेतल्याने १००० यज्ञांचे पुण्य प्राप्त होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. यंदा ही रथयात्रा आज ७ जुलैपासून सुरू होईल. हा उत्सव १६ जुलै रोजी संपणार आहे. देश-विदेशातील अनेक लोक या उत्सवात सहभागी होतात. हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा असतो.
यंदा तब्बल ५७ वर्षांनंतर प्रथमच दोन दिवस रथयात्रा होणार आहे. स्नान पौर्णिमेला आजारी पडलेले भगवान जगन्नाथ आज सकाळी बरे झाले, त्यामुळे आज रथयात्रेपूर्वीचे उत्सवही साजरे केले जात आहेत. प्रभूला नेहमीपेक्षा २ तास लवकर उठवण्यात आले. मंगला आरती पहाटे ४ ऐवजी रात्री २ वाजता झाली. यापूर्वी १९७१ मध्येही रथयात्रा दोन दिवस चालली होती.
मंगला आरतीनंतर रात्री अडीच वाजता दशावतार पूजन झाले. पहाटे ३ वाजता नैत्रोत्सव तर ४ वाजता पुरीच्या राजातर्फे पूजा करण्यात आली. सूर्यपूजेनंतर देवाला खिचडीचा नैवेद्य दाखवला गेला. यानंतर रथाचे पूजन करून भगवानांना विशेष वस्त्रात गुंडाळून मंदिराबाहेर आणले गेले. रथयात्रेत भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू याही रथयात्रेत सहभागी होणार आहेत.
जगन्नाथ रथयात्रा जगन्नाथ मंदिरापासून सुरू होऊन ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री गुंडीचा मंदिरात पोहोचते. या ठिकाणीच विश्वकर्मांनी तिन्ही देवतांच्या मूर्ती बनवल्याची आख्यायिका आहे. हे जगन्नाथाचं जन्मस्थान असल्याचीही एक मान्यता आहे. येथे तिन्ही देवी-देवता सात दिवस विश्रांती घेतात. आषाढ महिन्याच्या दशमीला रथ पुन्हा मुख्य मंदिराकडे मार्गस्थ होतो. या रथयात्रेत जगन्नाथाचा रथ, देवी सुभद्राचा रथ आणि बलरामाचा रथ ओढला जातो. रथयात्रेत बलराम समोर, बहिण सुभद्राचा रथ मध्यभागी आणि भगवान जगन्नाथाचा रथ मागे असतो.
रविवार ७ जुलै २०२४ : भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा रथ सिंहद्वारातून श्री गुंडीचा मंदिराकडे जाण्यासाठी मार्गस्थ होईल. देशाच्या माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देखील भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेत सहभागी होणार असून भगवान जगन्नाथांचे आशीर्वाद घेणार आहेत. रथयात्रेच्या पहिल्या दिवशी दुपारी भगवान जगन्नाथ, भगवान बलराम आणि देवी सुभद्रा यांना एक एक करून मंदिरातून बाहेर आणले जाणार आहे. त्यानंतर पुरीचे शंकराचार्य रथाचे पूजन करतील. सायंकाळी भाविक भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे रथ ओढण्यास सुरुवात करतील.
सोमवार ८ जुलै २०२४ : ८ जुलै रोजी सकाळी पुन्हा रथ पुढे नेण्यात येईल. पुरी मंदिराच्या अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार , सोमवारी रथ गुंडीचा मंदिरात पोहोचेल. काही कारणास्तव उशीर झाल्यास मंगळवारी रथ मंदिरात पोहोचतील.
८-१५ जुलै २०२४ : भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांचे रथ श्री गुंडीचा मंदिरात राहणार आहेत. त्यांच्यासाठी येथे विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे.
१६ जुलै २०२४ : या दिवशी रथयात्रा संपेल आणि तिन्ही देवी-देवता जगन्नाथ मंदिरात परततील.
भगवान जगन्नाथाचा महाप्रसाद : भगवान जगन्नाथांना सहा वेळा महाप्रसाद दिला जातो. सात वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ, चार प्रकारच्या डाळी, नऊ प्रकारच्या भाज्या आणि अनेक प्रकारच्या मिठाई जेवणात दिल्या जातात. गोड पदार्थ तयार करण्यासाठी येथे साखरेऐवजी गूळाचा वापर केला जातो. मंदिरात बटाटा, टोमॅटो, फ्लॉवरचा वापर केला जात नाही.