मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
दिसपुर : आसाममध्ये गेल्या १५ दिवसांत मुसळधार पावसामुळे गंभीर परिस्थिती उद्भवली असून गुरुवारी राज्यातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. आसाम राज्य सरकारच्या एका अधिकृत बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली. बुलेटिनमध्ये सांगण्यात आले की, पुरामुळे राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये १६.५० लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. ब्रह्मपुत्रा, दिगारू आणि कोलोंग नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, कामरूप (मेट्रो) जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुवाहाटीमधील मालीगाव, पांडू बंदर आणि मंदिर घाट या पूरग्रस्त भागांना भेट देत बुधवारी रात्री उशिरा सर्व जिल्हा आयुक्तांसोबत पूरस्थितीबाबत बैठक घेतली. यावेळी सरमा यांनी पूरग्रस्तांना लवकरात लवकर मदत करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. १५ ऑगस्टपूर्वी सर्व पुनर्वसन दावे निकषांनुसार पूर्ण करावेत आणि मुख्यालयाला अचूक माहिती द्यावी व लोकांना दिलासा मिळेल याची व्यवस्था करावी असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
आसाम सरकारचे कॅबिनेट मंत्री गुरुवारपासून पुढील ३ दिवस पूरग्रस्त जिल्ह्यांना भेट देतील आणि परिस्थितीचा आढावा घेतील. आसाममध्ये यावर्षी पूर, भूस्खलन आणि वादळात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा ५६ वर पोहोचला असून आणखी ३ लोक बेपत्ता आहेत. पुरामुळे बारपेटा, विश्वनाथ, कचार, चरईदेव, चिरांग, दररंग, धेमाजी, दिब्रुगड, गोलाघाट, जोरहाट, कामरूप महानगर, कार्बी आंगलांग, करीमगंज, लखीमपूर, माजुली, मोरीगाव, नागाव, नलबारी, शिवा , सोनितपूर जिल्हे प्रभावित आहेत.
आसाममध्ये पूर संकटामुळे धुब्रीमध्ये सर्वाधिक २.२३ लाख लोक बाधित झाले आहेत, त्यानंतर दारंगमध्ये सुमारे १.८४ लाख लोक आणि लखीमपूरमध्ये १.६६ लाखांहून अधिक लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. निमतीघाट, तेजपूर, गुवाहाटी, गोलपारा आणि धुबरी येथे ब्रह्मपुत्रा नदीने धोक्याची पातळी ८ दिवस आधीच ओलांडलेली होती.