काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात अनेक गेंडे, निलगाई, अस्वलांसह अनेक छोट्या प्राण्यांचा बुडून मृत्यू .
दिसपुर : आसाममध्ये पूरस्थिती सतत बिघडत असताना गुरुवारी आणखी सहा जणांचा मृत्यू झाला. राज्यातील २९ जिल्ह्यांतील २१ लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. आसाम राज्य सरकारच्या अधिकृत बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली. बुलेटिननुसार, राज्यातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) च्या दैनंदिन पूर अहवालानुसार, गेल्या १५ तासांत गोलाघाटच्या चार, तर दिब्रुगढ आणि चरैदेवमधील प्रत्येकी एकाने जीव गमावला. यावर्षी पूर, भूस्खलन आणि वादळामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ६२ वर पोहोचली आहे.
अहवालातून समोर आलेल्या महितीनुसार; आसामच्या २९ जिल्ह्यांतील एकूण २१,१३,२०४ लोकांना पुराचा फटका बसला आहे, तर ५७,०१८ हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांमध्ये धुबरीचा समावेश आहे, येथे ६,४८,८०६ लोक प्रभावित झाले आहेत. तर दारंगमध्ये १,९०,२६१, कचारमध्ये १,४५,९२६, बारपेटा येथे १,३१,०४१ आणि गोलाघाटमध्ये १,०८,५९४ लोकांना पुराचा फटका बसला आहे. सध्या ३९,३३८ बाधित लोक ६९८ मदत छावण्यांमध्ये आश्रय घेत आहेत. आसाम सरकारद्वारे जारी बुलेटिननुसार, विविध एजन्सींनी बोटींचा वापर करून एक हजाराहून अधिक लोक आणि ७०० हून प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.
कामरूप (महानगर) जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे ब्रह्मपुत्रा, दिगारू आणि कोलोंग नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली आहे. महत्त्वाचे म्हणजे ब्रम्हपुत्रेच्या खोऱ्यात कहर माजला असून काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात अनेक गेंडे, निलगाई, अस्वलांसह छोट्या प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक प्राण्यांना वाचवण्यात यश मिळाले आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, उद्यानात २३ हॉग डियरचा (हरणाची प्रजाती) बुडून मृत्यू झाला तर १५ हॉग डियरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वन अधिकाऱ्यांनी इतर प्राण्यांसह ७३ हॉग डियर, ८ निलगाई, २ गेंडे, दोन ओटर, एक सांबर आणि एक स्कोप घुबड यांची सुटका केली आहे. सध्या २० जनावरांवर उपचार सुरू आहेत तर ३१ इतर प्राण्यांना उपचारानंतर सुरक्षित स्थानी सोडण्यात आले आहे असेही अधिकाऱ्याने सांगितले.