छत्तीसगड : दंतेवाडामध्ये चकमकीत ३०हून अधिक नक्षलवादी ठार

स्वयंचलित शस्त्रे जप्त : नारायणपूर-दंतेवाडा सीमेवर शोध मोहीम

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
04th October, 08:11 pm
छत्तीसगड : दंतेवाडामध्ये चकमकीत ३०हून अधिक नक्षलवादी ठार

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
दंतेवाडा : छत्तीसगडमधील नारायणपूर-दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवर शुक्रवारी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने ३० नक्षलवाद्यांना यमसदनी धाडले. घटनास्थळावरून सुरक्षा दलाला मोठ्या प्रमाणात स्वयंचलित शस्त्रे सापडली आहेत. नक्षलवाद्यांकडे ‘एके ४७’ असल्याचेही समोर आले आहे. चकमकीनंतर नारायणपूर-दंतेवाडा सीमेवर माड परिसरात शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. चकमकीत सहभागी झालेले सुरक्षा दलाचे सर्व जवान सुरक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही चकमक अबूझमाड येथे झाली. हा परिसर नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमाभागात येतो. अबूझमाड क्षेत्रात मोठ्या संख्येने नक्षलवादी दाखल झाल्याची माहिती सुरक्षा दलाला गुप्तहेरांकडून मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने शोध मोहीम हाती घेतली. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या दिशेने गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात सुरक्षा जवानांनीही गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलाला आतापर्यंत १४ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. त्याच बरोबर एके ४७, एसएलआरसह अन्य शस्त्रे सापडली आहेत. दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांनी याला दुजोरा दिला आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते. या घटनेचा तपास केला जात आहे.
राज्याचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय हे सध्या बस्तर जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत विधानसभेचे अध्यक्ष रमण सिंह आणि वनमंत्री केदार कश्यप हेदेखील आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळीच सुरक्षा दलाने ही मोठी कारवाई केली आहे.
वर्षभरात १५०हून अधिक नक्षलवादी ठार
गेल्या काही महिन्यांत छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत सुरक्षा दलांच्या झालेल्या चकमकीच्या बातम्या समोर येत आहेत. याआधी २३ सप्टेंबर रोजी नारायणपूर येथे झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार झाले होते. त्यामध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २४ सप्टेंबरला सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलाने दोघा नक्षलवाद्यांना ठार केले होते. चकमकीनंतर दोघांचे मृतदेह त्यांचे सहकारी घेऊन गेले होते. या वर्षभरात छत्तीसगडच्या बस्तर क्षेत्रात झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या १५०च्या पुढे आहे.

हेही वाचा