बिहारच्या सिवान जिल्ह्यात अवघ्या १२ तासांत तब्बल ३ पूल कोसळले. तर छपरा येथे दोन पूल कोसळले. सिवानमध्ये पूल कोसळण्याची पहिली घटना महाराजगंज उपविभागातील देवरिया गावात घडली.
पाटणा : गेल्या महिन्याभरात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे देशाच्या पूर्वेकडील राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आसाम, ओडिशा, बिहार, बंगालच्या अनेक भागांत पुरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने हजारो लोकांवर विस्थापित होण्याची पाळी आली आहे. हलक्या दर्जाचे बांधकाम आणि बांधकामात भ्रष्टाचारामुळे बिहारमध्ये गेल्या १५ दिवसांत तब्बल ९ पूल कोसळले आहेत.
दरम्यान वकील ब्रजेश सिंह यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत बिहार सरकारला राज्यातील सर्व बांधकामाधीन पुलांचे ऑडिट करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यात पूल कोसळण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन जुने आणि कमकुवत पूल पाडण्यात यावे व नव्याने बांधण्यात यावेत अशीही मागणी करण्यात आली आहे.
याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, पूल कोसळण्याच्या सध्याच्या समस्येवर सर्वोच्च न्यायालयाने तातडीने विचार करण्याची गरज आहे. ते म्हणाले की, दोन वर्षांत तीन मोठे बांधकाम सुरू असलेले पूल आणि मोठे, मध्यम आणि छोटे पूल कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये काही लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. सरकारचे घोर दुर्लक्ष आणि कंत्राटदार व संबंधित यंत्रणांच्या भ्रष्ट संगनमताने भविष्यात आणखी घटना घडू शकतात, असे ते म्हणाले.
याचिकेत सिवान, मधुबनी, किशनगंज आणि इतर भागातील घटनांचा उल्लेख आहे. याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, पूरप्रवण भागात पूल सतत कोसळत आहेत ही अत्यंत चिंतेची बाब आहे. बिहारमध्ये पूल कोसळण्याच्या अशा घटना योग्य नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने तातडीने पावले उचलावीत. बिहारमधील बांधलेल्या, जुन्या आणि बांधकामाधीन पुलांच्या प्रत्यक्ष निरीक्षणासाठी योग्य धोरण किंवा यंत्रणा बनविण्याच्या सूचना देण्यात याव्यात,असे वकील ब्रजेश सिंह यांनी याचिकेत स्पष्ट केले आहे.
बिहारच्या परिसरात पडणाऱ्या पुलांसाठी सेन्सर वापरून पुलांच्या मजबुतीवर लक्ष ठेवण्यासाठी अनिवार्य मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत. एवढ्या मोठ्या प्रमाणात पूल कोसळल्यानंतर नितीश कुमार यांनी बिहारमधील सर्व विद्यमान आणि बांधकामाधीन पुलांवर सतत देखरेख ठेवण्यासाठी आणि राज्यातील सर्व अस्तित्वात असलेल्या पुलांच्या आरोग्यावर सर्वसमावेशक डेटाबेस तयार करण्यासाठी संबंधित क्षेत्रातील उच्चस्तरीय तज्ञांचा समावेश असलेली एक कार्यक्षम स्थायी संस्था तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
सिवानमध्ये एकाच दिवसात तीन पूल कोसळले. छपरा येथे दोन पूल कोसळले. सिवानमध्ये पूल कोसळण्याची पहिली घटना महाराजगंज उपविभागातील देवरिया गावात घडली. गंडक नदीवर बांधलेल्या पुलाचा एक खांब धसला आणि पूल कोसळला. हा पूल ४० वर्षे जुना असल्याचे सांगण्यात येत आहे.
याचिकाकर्त्याने बिहारचे मुख्य सचिव, रस्ते बांधकामाचे अतिरिक्त मुख्य सचिव, बिहार स्टेट ब्रिज कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव आणि इतरांना पक्षकार बनवले आहे. १८ जून रोजी अररियातील बाकरा नदीवर १२ कोटी रुपये खर्चून बांधलेला पूल कोसळला होता. यानंतर २२ जून रोजी सिवानमधील गंडक नदीवर बांधलेला पूल कोसळला. हा पूल सुमारे ४० ते ४५ वर्षे जुना असल्याचे सांगितले जाते.