निकालांना सामोरे जाण्यापूर्वी...

प्रत्येक निवडणुकीचे स्वत:चे वेगळे वैशिष्ट्य असते, नवा संदेश असतो. २०२४ ची लोकसभा निवडणूक ही अनोखी म्हणावी लागेल. प्रत्येक टप्प्यांत नानाविध रंग दाखविणारी अशी निवडणूक देशाने क्वचितच पाहिली असेल. सतत होणारी उलथापालथ, मौन, कधी उत्साह, तर कधी उदासिनता, धक्कादायक विधाने, आरोप-प्रत्यारोप यांसारखे प्रचाराचे अन पर्यायाने निवडणुकीचे बरेच कंगोरे दिसले. सध्याची निवडणूक देखील नवा संदेश देणारी आहे, पण तो काय असेल हे जाणून घेण्यासाठी चार जूनची वाट पाहावी लागणार. जगात प्रत्येक गोष्ट ‘इव्हॉल्व’ म्हणजेच विकसित होत जाते आणि हे चक्र सुरू राहते. राजकारण देखील नेहमीच ‘इव्हॉल्व’ असते. थांबले तर सडते. सबब या निवडणुकीतून धडे घेत पुढे चालावे लागेल. सर्वात अगोदर या प्रवासात आपण कसे हरवलो, दुधात मीठाचा खडा कसा पडला? कोणी आणि का टाकला? याचा शोध घ्यावा लागेल.

Story: विशेष |
03rd June, 06:38 am
निकालांना सामोरे जाण्यापूर्वी...

प्रत्येक निवडणुकीचे स्वत:चे वेगळे वैशिष्ट्य असते, नवा संदेश असतो. २०२४ ची लोकसभा निवडणूक ही अनोखी म्हणावी लागेल. प्रत्येक टप्प्यांत नानाविध रंग दाखविणारी निवडणूक देशाने क्वचितच पाहिली असेल. निवडणुकीत सतत होणारी उलथापालथ, मौन, कधी उत्साह तर कधी उदासिनता, धकादायक विधाने, आरोप-प्रत्यारोप यांसारखे प्रचाराचे अन पर्यायाने निवडणुकीचे बरेच कंगोरे दिसले. ही निवडणूक नवा संदेश देणारी आहे, पण तो काय असेल? अर्थात हे जाणून घेण्यासाठी चार जूनची वाट पाहावी लागणार. तोपर्यंत आतापर्यत काय काय घडले, काय दिसले, अनुभवले हे पाहणे गरजेचे ठरते. आपल्या बाजूने निकाल लागण्यासाठी, वातावरण फिरण्यासाठी कोणत्या पक्षाच्या कोणत्या नेत्यांनी कसे भाषण केले, कोणते तारे तोडले, काय काय जांगडगुत्ता केला याचे पोस्टमार्टेम करणे आवश्यक आहे. कारण त्यातूनही बऱ्याच नव्या गोष्टी बाहेर पडतील आणि त्यातूनही शिकण्यासारखे बरेच काही असेल.

सर्वप्रथम हॅटट्रिक करण्याचा दावा करणार्‍या टॉपर पक्षाचा विचार करू. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत या पक्षाने टॉप रँकिंग मिळवली. साहजिकच यावेळीही त्यांच्या कामगिरीबाबत कुतूहल असणे स्वाभाविक आहे. या टॉपर पक्षाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा अनेक विक्रम प्रस्थापित करण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला जात आहे आणि तसे गृहितही धरले जात आहे. त्यांनी इतिहास घडविण्यासाठी काय काय केले? निवडणुकीच्या अगोदर ‘चारसौ पार’ ची घोषणा दिली. या ऐतिहासिक घोषणेतून त्यांनी सर्वांना मागे टाकण्याची आणि आपण सर्वात पुढे असण्याची रणनीती आणली. सर्व बाजूंनी विचारमंथन करूनच ही घोषणा समोर आणली. सर्वात पुढे राहण्याची घाई करताना एक अनावधानाने चूक झाली. ती म्हणजे पुढे जाऊन ही रणनीती पक्षाला जड झाली. फार तर बुमरँग म्हणा. ज्या शायनिंगने ते मैदानात उतरले, तोच मुद्दा आता मागे पडला. किंबहुना त्यावर धूळही बसली.

विरोधकांनी ‘चारसौ पार’ चा मुद्दा लावून धरला आणि या घोषणेवरून प्रश्नांची सरबत्ती केली. अनेक शंका-कुशंका जन्माला घातल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना बदलण्यासाठीच आणि आरक्षण संपविण्यासाठी सत्ताधार्‍यांकडून हा नारा दिला जात असल्याचे विरोधकांकडून मतदारांच्या गळी उतरविण्यात आले आणि त्यात ते यशस्वी ठरले. मग काय निवडणुकीची खेळपट्टी विरोधकांनी याच मुद्दयाभोवती तयार केली. विरोधकांकडून प्रश्नरुपी यॉर्कर, बाऊन्सर टाकण्यात आले. म्हणजेच विरोधकांनी तयार केलेल्या खेळपट्टीवर सत्ताधार्‍यांना उतरण्याची वेळ आली. गेल्या दहा वर्षांत असे पहिल्यांदाच घडले. परिणामी ‘चारसौ पार’ चा नारा हा मागे पडत गेला. भाजपच्या बड्या नेत्यांना ठिकठिकाणी स्पष्टीकरण द्यावे लागले. ‘चारसौ पार’ बाबतचे गैरसमज दूर करता करता सरकारी योजनांमुळे लाखो लोकांना मिळालेला लाभ, तोंडी तलाक, राम मंदिर, ३७० कलम, महिला आरक्षण, आयुष्यमान भारत योजना, राष्ट्रवाद यासारखे मुद्दे भाजपच्या प्रचारातून गायब झाले. दहा वर्षात केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा पंतप्रधान आणि त्यांच्या टीमला जनतेसमोर मांडता आला नाही आणि त्यावर लक्षही केंद्रीत करता आले नाही. दहा वर्षातील काम आणि भविष्यातील योजना सांगायला सत्ताधार्‍यांना वेळच मिळाला नाही. प्रचारातील कळीच्या मुद्याचे गांभीर्य मागे पडले आणि त्याजागी मंगळसूत्र, असली नकली, ‘बिजली काट जाना, भैस ले जाना’ यांसारखी आश्चर्यकारक वक्तव्ये प्रचारात आली आणि त्याचाच बोलबाला राहिला.

प्रचाराच्या खेळात एका षटकात नेत्यांकडून वाईड, बाय, नो बॉल टाकले जाऊ लागले. कोणता चेंडू कोठून येईल हे पाहून फलंदाज चक्रावून गेला. नवीन खेळपट्टी आणि विचार गायब झाल्याचा परिणाम म्हणजे भाजप नेत्यांची भाषा आणि देहबोली या दोन्हीत मागच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत फरक जाणवू लागला. सोशल मीडियावर जबरदस्त पकड असणार्‍या आणि अजिंक्य प्रतिमा नेटिझन्सच्या मनावर ठसविणार्‍या पक्षाची पिछेहाट होऊ लागली आणि कालांतराने ती विस्कळीतही दिसू लागली. आयटी सेलही दिशाहीन झाला. भाजपची संपूर्ण प्रचाराची मोहीम मोदी आणि अन्य दोन नेत्यांवरच टिकून राहिली. लोकसभा निवडणूक भाजप नाही तर एकटेच मोदी लढत आहेत, असेच चित्र निर्माण झाले. त्यांची भाषणे, मुलाखती आणि विधाने पाहिली तर ती आमच्याऐवजी, ‘मी आणि माझे’ केंद्रीत होती.  

वास्तविक सत्ताधारी पक्षांतील सुंदोपसुंदी ही अगोदरपासूनच दिसत होती. तिकीट वाटपात तर पक्षाचा आत्मविश्वास हा पराकोटीला पोहचला होता. यातच गडबड झाली. सर्वात मोठ्या लोकसभेच्या मैदानात नवखे, अपरिपक्व आणि दलबदलू लोकांना उतरविण्यात आले आणि हे चित्र पाहून मतदारांच्या मनात कालवाकालव सुरू झाली. मैदानात असे चेहरे उतरविले की त्यांना जनता विटलेली होती. त्याचा परिणाम तात्काळ पाहवयासही मिळाला. एकट्या उत्तर प्रदेशात भाजपच्या दहा उमेदवारांसाठी जनतेने ‘गो बॅक’चे नारे दिले. माध्यमांशी बोलताना तर तंत्र बिघडले होते. कनिष्ठ पातळीपासून ते पंतप्रधानापर्यंत हे चित्र पाहवयास मिळाले. ज्याला जे वाटेल ते बोलत होते. प्रत्येक जण मुलाखती देत होता. गुजरातमध्ये केंद्रीय मंत्री रुपाला यांच्या जातसंदर्भातील विधानाची झळ उत्तर प्रदेशपर्यंत पोहचली आणि भाजपचे ठाकूर नेते देखील भाजप विरोधी लाटेत सामील होण्यास प्रवृत्त झाले. एवढेच नाही तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या टीमला हे आंदोलन रोखण्यासाठी पुढे करण्यात देखील स्वारस्य दाखविले नाही. कदाचित गृहमंत्री अमित शहा यांनी रघुराज प्रताप सिंह राजा भैय्या यांना भाजपच्या गोटात आणण्याचा केलेला प्रयत्न पचनी पडला नसावा. त्याचे नुकसान म्हणजे उत्तर प्रदेशात जातीजातीतील दरी एवढी रुंदावली की आपल्याच जातीला मतदान करण्याची लाट पहावयास मिळाली आणि ते उघडपणे दिसले देखील. यात अर्थातच पक्षाची निष्ठा बाजूला पडली. जातीला सर्वोच्च प्राधान्य दिले गेले. आपल्याच जातीचा उमेदवार हवा, ही विचारसरणी बळकट झाली. पक्षाकडे नंतर पाहू, असे वातावरण निर्माण झाले.  या धोकादायक राजकीय जनक्षोभात तेल टाकण्याचे काम अखिलेश यादव यांच्या ‘पीडीए’ ने केले.

 उत्तर प्रदेशात मायावतींच्या कथित छुप्या मदतीवरचा पडदा देखील सरकला. त्यामुळे मायावती आणि भाजपला फायदा होण्याऐवजी नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. मायावतींचा प्रभाव कमी झालेला असताना या भूमिकेने तो आणखी आटला आणि या स्पर्धेतून बाहेर गेल्या. परिणामी अल्पसंख्याक तर दूरच, दलित समाज देखील बहनजी आपण बी टीम झाला आहात, असे म्हणू लागला. अर्थात निवडणूक प्रचारात विरोधकांची एकजूट किंवा ऐक्य दिसले असेही नाही. तेथेही मतभेद, मनभेद होते. मात्र या उणिवांचा फायदा उचलण्याची रणनीती आखली गेली नाही. एका ठिकाणाहून विट, दुसर्‍या ठिकाणाहून वाळू आणून तयार केलेल्या विरोधकांच्या आघाडीला धक्के देत मतदारांना आपल्या बाजूने ओढण्याची रणनीती दिसली नाही. डबल इंजिन सरकारची घोषणा तर बासनात गुंडाळून ठेवली. मोदी की गॅरंटी देखील चौथ्या टप्प्यात धुसर झाली. ‘चारसौ पार’ ची घोषणा तर पहिल्याच टप्प्यात हवेत गेली.

दहा वर्षांपासून सत्तेबाहेर राहिलेल्या आणि जनतेकडून पराभवाचा सामना करणार्‍या काँग्रेसला निवडणुकीच्या काळात प्रकाशझोतात आणण्याचे श्रेय भाजपच्या चुकीच्या प्रचार धोरणाला द्यावे लागेल. दीर्घकाळापासून उड्डाणाच्या प्रतिक्षेत असणार्‍या अखिलेश आणि राहुल गांधी यांच्या विमानाला बुस्ट देण्याची संधी भाजपच्या धोरणामुळेच मिळाली. काही काळापूर्वी सर्वसामान्य जनता आणि देश-विदेशातील विश्लेषक भाजपची वापसी होईल, असे म्हणत असताना भाजपच्या नेत्यांना या गोष्टी कशा समजल्या नाहीत? हा या निवडणुकीचा यक्षप्रश्न.

आज ज्या टीकाकारांवर एखाद्या विचाराचा आणि नेत्याचा चष्मा असेल तर तोदेखील भाजप दोनशेच्या पुढे जाईल, हे मान्य करावयास तयार नाही. म्हणजेच पक्ष तर सर्वात मोठा भाजपच असेल. राष्ट्रपती सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना निमंत्रित करतील. तसेच पश्चिम बंगाल, उडिशा, तेलंगण, आंध्र प्रदेशसारख्या राज्यात भाजपचा स्कोअर वाढेल. तमिळनाडू, केरळमध्ये खाते उघडेल. पण बिहार, हरियाना, महाराष्ट्र, पंजाब, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे संख्याबळ कमी होण्याच्या शक्यतेने तो दोन अंकांपर्यंत पोहचेल की काय हे सांगता येत नाही. भाजप २०१९ प्रमाणे प्रत्येक राज्यात कामगिरी तर पुन्हा करु शकणार नाही. त्यामुळे  मागच्या संख्याबळापेक्षा दहा जागा कमी किंवा अधिक होताना दिसतील, हे निश्चित. सर्वजण भाजपच्या आघाडीला मान्यता देत असताना स्वत: पक्ष मात्र स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याबाबत हमी का देत नव्हता? भाजपने एवढ्या तडजोडी का केल्या? त्यांच्या नेत्यांची भाषा शोचनीय का झाली? गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच भाजपा विरोधकांच्या खेळपट्टीवर का उतरली ? स्वत:ची खेळपट्टी का तयार केली नाही? निरर्थक गोष्टीत का वाहवत गेली ?  या प्रश्नांचे उत्तर निकालातून मिळणार नाही. पण भाजप नेतृत्वालाच उत्तर देण्यासाठी पुढे यावे लागेल. हे उत्तर पक्ष, पक्षाचे राजकारणी आणि कार्यकर्ता, नेत्यांसाठी आवश्यक आहेतच, त्याचबरोबर पक्षाच्या समर्थक जनतेसाठीही.

जगात प्रत्येक गोष्ट ‘इव्हॉल्व’ म्हणजेच विकसित होत जाते आणि हे चक्र सुरू राहते. कोणतीही गोष्ट पूर्णपणे विकसित होत नाही. हे विज्ञान नाही तर ते प्राचीन ग्रंथांतही सांगितलेले आहे. राजकारण देखील नेहमीच ‘इव्हॉल्व’ होत असते. थांबले तर सडते. अशा वेळी या निवडणुकीतून धडे घेत पुढे चालावे लागेल. जे काही घडले तो प्रवासाचा भाग होता. विकासचक्राची गाथा घेऊन पुढे मार्ग तयार करावा लागेल. या तयारीशिवाय नवीन खेळी सुरुवात करणे आणखी नुकसानकारक ठरेल. कमावलेली पत गमावण्यासारखे ठरेल. ‘इव्हॉल्व’ केले नाही तर सर्व संपून जाईल. त्यामुळे सर्वात अगोदर या प्रवासात आपण कसे हरवलो, दुधात मीठाचा खडा कसा पडला? कोणी आणि का टाकला? याचा शोध घ्यावा लागेल.


योगेश मिश्र, ज्येष्ठ पत्रकार-विश्लेषक