२ ते ४ फेब्रुवारी दरम्यान पर्यावरण संतुलन परिषद
पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल
गोवन वार्ता। प्रतिनिधी
पणजी : राज्यातील ४५ तलावांना पाणथळ क्षेत्र म्हणून अधिसूचित केले जाणार आहे. या तलावांच्या देखभालीसाठी व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. लोकसहभागातून तलावांची देखभाल केली जाईल, असे पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल यांनी सांगितले.
राज्यात २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान पर्यावरण संतुलन परिषद होणार आहे. यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र सिंग यादव आणि केंद्रीय राज्यमंत्री अश्विनीकुमार चुबे उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत सर्व राज्यातील पाणलोट प्राधिकरणांचे प्रमुख अधिकारी, शास्त्रज्ञ आणि उद्योजक सहभागी होणार आहेत. राज्यातील ४५ पैकी ९ तलाव ओलसर म्हणून अधिसूचित करण्यात आले आहेत. इतर तलाव अधिसूचित होण्याच्या प्रक्रियेत आहेत. पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल यांनी पत्रकार परिषदेत सदर माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील, सचिव डॉ. शमिला मोंतेरो उपस्थित होते.
२ ते ४ फेब्रुवारी अशी ३ दिवस सदर परिषद चालणार आहे. २ रोजी हा पाणलोट दिन आहे. त्यानिमित्त कुडचडे येथील नंदा तलावाजवळ विद्यार्थी आणि नागरिकांची पदयात्रा काढण्यात येणार आहे. ३ रोजी पणजी येथील हॉटेलमध्ये परिषद होणार असून देशभरातील तलावांचे व्यवस्थापक उपस्थित राहणार आहेत. ४ रोजी रवींद्र भवन कुडचडे येथे संवाद कार्यक्रम होणार असून यासाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र सिंग यादव आणि राज्यमंत्री अश्विनी कुमार चुबे उपस्थित राहणार आहेत.