किशोरवयीन मुलांचे पालकत्व स्वीकारताना

हल्लीच्या मुलांना योग्य शिक्षण देणे, व्यवस्थित संस्कार देणे हे पालकांसाठी आव्हान ठरत आहे. विशेषतः किशोरवयीन मुलांमध्ये आणि पालकांमध्ये नाते व्यवस्थित नाही असे सध्या दिसून येते.

Story: पालकत्व |
27th April, 05:19 am
किशोरवयीन मुलांचे पालकत्व स्वीकारताना

लहानपणापासून आपल्या मुलांना आई-वडील अगदी लाडाने वाढवतात मात्र टीनएज अर्थात किशोरवयात आल्यानंतर अनेकदा आई-वडील आणि मुलांमध्ये दरी वाढू लागल्याचे दिसून येते. मुलांचे म्हणणे आई-वडिलांना पटत नाही आणि आई-वडील आपल्या चांगल्यासाठीच सांगत आहेत, हे मुलांना कळत नाही असंच चित्र बऱ्याच घरांमध्ये दिसून येतं. यामुळे घरातील वादविवादही वाढतात.


साधारण १३ व्या वर्षापासून १९ व्या वर्षापर्यंत किशोरवयीन मुलं आणि आईवडिलांतील वाद इतके विकोपाला जातात की मुलं चिडचिडी होतात आणि आई-वडिलांचे म्हणणेही ऐकत नाहीत. आई-वडील आपल्या मुलांवर प्रचंड प्रेम करतात. मात्र या वयात आपल्या मुलांशी कसं वागायचं आणि त्यांची मनस्थिती कशी हाताळायची हे मात्र पालकांना कळत नाही ते त्यांच्यासाठी एक आव्हानच ठरतं.

किशोरवयामध्ये मुलांमध्ये अनेक बदल होत असतात. शारीरिक आणि मानसिक बदलांमुळे मुलांना समजून घेणे पालकांना फारच कठीण होते. मात्र आपल्या मुलांशी प्रत्येक विषयावर अत्यंत शांतपणे आणि त्यांना समजून घेत बोलणे अशावेळी महत्त्वाचे ठरते. अत्यंत मोकळेपणाने किशोरवयीन मुलांशी पालकांनी बोलावे आणि त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे द्यावीत.


आपल्या मुलांसह पालकांनी अधिकाधिक वेळ घालवा. कारण या वयात त्यांना आपल्या पालकांची अधिक गरज असते. एकत्र वेळ घालविल्याने पालक आणि मुलांमधील नाते अधिक घट्ट होण्यास मदत मिळते. तसेच तुम्ही मुलांशी प्रत्येक विषयावर मोकळेपणाने बोललात आणि त्यांना त्यांच्या प्रश्नांची योग्य उत्तरे देत काय योग्य आणि काय अयोग्य आहे हे सहजपणाने सांगितले तर तुमच्यात कोणताही दुरावा राहणार नाही. सर्व आई-वडील हे आपल्या मुलांवर अमाप प्रेम करतात मात्र मुलं जसजशी मोठी होतात तसे प्रेम व्यक्त करण्याचे प्रमाण कमी होते. किशोरवयीन मुलांना प्रेमाची अधिक आवश्यकता असते. कारण आपल्याला कोणी समजून घेत नाही ही भावना त्यांच्यामध्ये या वयात अधिक जागृत होत असते. मात्र पालकांनी त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करण्याने दोघामधील बाँड अधिक घट्ट होतो आणि मुलांना पालकांशी खोटं बोलण्याची गरज भासत नाही. या वयात मुलांवर अभ्यासाचे अधिक ओझे असते. अशावेळी त्यांना जबाबदारीची जाणीव देत आपण यामध्ये त्यांच्याबरोबर आहेत हे नियमित पालकांनी समजून द्यावे. त्यांच्यावर कोणतेही ओझे नाही आणि आता मुले मोठी झाली असून त्यांना योग्य - अयोग्य कळते ही जाणीव त्यांना करून द्या. निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यातही आहे हे त्यांना जाणवू द्या. ओरडून सांगण्यापेक्षा गोष्टी समजावून सांगा. यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास राहातो.

या वयात अभ्यास, करिअर आणि पुढे काय या सगळ्या चिंतेमध्ये मुले असतात. त्यामुळे त्यांचा निर्णय काय असेल यामध्ये पालकांनी सहभागी होत त्यांना योग्य मार्गदर्शन करावे. त्यांचा विचार आधी जाणून घ्यावा. आपल्या मुलांची तुलना इतर कोणत्याही मुलांशी न करता त्यांचा आत्मविश्वास वाढवणे पालकांचे कर्तव्य आहे. यामुळेच मुले अधिक चांगलेपणाने पुढे जाऊ शकतात.


साधना पांडुरंग आरोंदेकर, डिचोली गोवा.