मुलांसाठी सतर्कता बाळगताना नाहक भीती टाळण्याची गरज

..

Story: अंतरंग । अजय लाड |
03rd October 2022, 12:29 am
मुलांसाठी सतर्कता बाळगताना नाहक भीती टाळण्याची गरज

मुले पळवणारी टोळी राज्यात नाही व अशाप्रकारच्या एकाही प्रकरणाची नोंद गेल्या दोन वर्षांपासून झालेली नाही. याबाबत पोलिस अधीक्षकांकडून स्पष्ट विधान केल्यानंतर बेताळभाटीत एका युवकाला बेशुध्द होईपर्यंत मारहाण झाली तीही केवळ संशयावरुन. त्यामुळे नागरिकांनी मुलांबाबत सतर्क राहावे पण नाहक एखाद्याला संशयावरुन मारहाण करण्याचे प्रकार टाळण्याची व सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न होण्याची गरज सध्या आहे.

मुले पळवणारा म्हणून मारहाण करत लोकांनी कायदा हातात घेतल्यास काही अनुचित घडल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. एखाद्या व्यक्तीवर संशय असल्यास किंवा एखादा व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना आढळल्यास लोकांनी कायदा आपल्या हातात घेऊ नये. नागरिकांनी ११२ वर कॉल करावा किंवा नजीकच्या पोलिस ठाण्याला याची माहिती द्यावी, असे आवाहन दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक अभिषेक धानियांकडून करण्यात आलेले आहे. राज्यात मुले पळवणारी टोळी आल्याची अफवा सर्वदूर पसरलेली आहे. महाराष्ट्र, बिहार, उत्तरप्रदेश यासह गोव्यातही समाजमाध्यमांवर संदेशाव्दारे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे. यातून एकप्रकारची भीती मुलांच्या पालकांमध्ये व नागरिकांमध्ये निर्माण झालेली आहे. यामुळे संशयास्पद व्यक्ती आढळल्यानंतर जमावाव्दारे सदर व्यक्तीला मारहाण करण्याचे तीन प्रकार दक्षिण गोव्यात घडलेले आहेत. 

गोव्यातून काही मुलांना पळवण्यात आल्याचे काही संदेश समाजमाध्यमांवर फिरत आहेत. त्याबाबत काही व्हिडिओही पाठवले जात आहेत. अशा प्रकारचे व्हायरल मॅसेज गोव्यातच नाहीतर इतर राज्यात जसे बिहार, उत्तर प्रदेश व महाराष्ट्रातही अशाप्रकारे संदेश फिरत आहेत. गेल्यावर्षी व यावर्षीही आतापर्यंत मुलांना पळवण्यात आल्याची एकही तक्रार राज्यातील कुठल्याही पोलिस ठाण्यात नोंद झालेली नाही. मागील काही दिवसांपासून या अफवा पसरवणाऱ्या संदेशामुळे काही घटना घडलेल्या आहेत. भयभीत झालेल्या लोकांनी काहीजणांना मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. मडगाव मोतीडोंगर येथे २० सप्टेंबरला मोहम्मद जमशेर या भंगार गोळा करणाऱ्या व्यक्ती मुले पळवणारा असल्याची शक्यतेतून मारहाण झाली. २७ सप्टेंबरला वास्को खारेबांध परिसरातील मनोरुग्ण असलेल्या ५४ वर्षीय व्यक्ती मुलासोबत उभी असल्याचे पाहून मुले चोरणारा समजून जमावाने मारहाण केली,. तर फातोर्डा हॉस्पिसिओ इस्पितळासमोर भिकारी हा मुले पळवणारा असल्याची माहिती सुरक्षारक्षकाने दिली व चौकशीवेळी तो भिकारी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बुधवारी बेताळभाटी येथील व्हिडिओ व्हायरल झाला होता. राज्यात गेल्या दोन वर्षांपासून मुले पळवण्यात आल्याचे एकही प्रकरण नोंद नाही, साधी तक्रारही नाही. त्यामुळे समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावे. अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल असे सांगत पोलिसांकडून कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले. राज्यात मुले पळवणारी टोळी नाही, लोकांनी सतर्क राहावे पण भीतीपोटी संशयास्पद व्यक्तीला मारहाण करु नये. गेल्या आठवड्यात मंगळवारी खारेबांध वास्को येथे ५२ वर्षीय मनोरुग्ण व्यक्तीला मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर वास्को पोलिसांकडून जमाव करणे, मारहाण करणे व प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करत व्हिडिओवरुन ओळख पटवून तिघांना अटक केलेली आहे. आता बेताळभाटी येथील व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. बेताळभाटी येथे मद्यपान केलेला एक व्यक्ती घरात घुसू पाहत असल्याची शंका आल्याने लोकांनी त्याला पकडले व त्याला दोरीने बांधून बेशुध्द होईपर्यंत मारहाण करण्यात आली. अशीच मारहाण वास्को येथील घटनेतही जमावाकडून करण्यात आलेली होती. त्यामुळे एखादी संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यास, संशयास्पद हालचाली आढळून आल्यास स्थानिक पोलिसांना याची माहिती द्यावी. पोलिसांना त्याची चौकशी करु द्यावी. लोकांनी जमाव करुन एखाद्याला मारहाण केल्यास ही मारहाण प्राणघातक ठरु शकते, एखाद्याचा जीव जाऊ शकतो व नागरिक अडचणीत येउ शकतात. पोलिस गस्तीवर असतात, ते तत्काळ अशा घटनांची शहानिशा करतील, कुणीही कायदा हातात न घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलिसांचे म्हणणे योग्यच असून अफवांमुळे पसरलेल्या नाहक भीतीचे पर्यावसान संशयितांना मारण्यात होत असल्याने सत्यता जाणून घेतल्याशिवाय एखाद्यावर हात उचलण्याचा प्रकार न होण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधण्याची आवश्यकता जास्त आहे.