महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी २२ रोजी

उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये धाकधूक वाढली


10th August 2022, 08:06 pm
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी २२ रोजी

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता पुन्हा दहा दिवस लांबणीवर गेली आहे. ही सुनावणी आता २२ ऑगस्टला होणार आहे. या आधी ती १२ ऑगस्टला होणार होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये धाकधूक वाढली आहे.
या सुनावणीचा सर्वात मोठा परिणाम हा महाराष्ट्रातील राजकारणावर होणार आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा हे २६ ऑगस्टला निवृत्त होणार असल्याने त्यांच्याच घटनापीठासमोर ही सुनावणी कायम राहील, याची शक्यता आता कमीच आहे. या आधी सरन्यायाधीश रमण्णा यांनी या प्रकरणावर सुनावणी करताना अत्यंत कडक अशा शब्दांत ताशेरे ओढले होते.
ही सुनावणी दहा दिवस लांबणीवर का गेली, यामागे काय कारण आहे, हे मात्र स्पष्ट झालेले नाही. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत ४० समर्थक आमदारांसह पक्षातून बाहेर पडण्याचा मार्ग अवलंबला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या वतीने बंडखोर १६ आमदारांवर कारवाई करण्याचे पत्र तत्कालीन विधानसभा उपाध्यक्षांना दिले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे गटाच्या वतीने आपलाच गट शिवसेना असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे.
३ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवरून सुरू झालेली कायदेशीर लढाई आता शिवसेना कोणाची यावर येऊन पोहोचली होती. यावर न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला. पक्षाच्या चिन्हाबाबत ही सुनावणी सुरू असेपर्यंत कोणताही निर्णय नको, असे निर्देश आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. निवडणूक आयोगानेही आता उद्धव ठाकरे गटाला चार आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे सत्तासंघर्षासंदर्भात सर्वोच्च न्यायालयासमोर एकूण सहा याचिका आहेत. सर्व सहा याचिका एकत्रित करून घटनापीठाकडे देण्यास कोणीही अद्यापपर्यंत विरोध दर्शविलेला नाही. त्यामुळे सर्व सहा याचिका एकत्रितपणे घटनापीठाकडे सोपवल्या जातील, अशी शक्यताही नाकारता येत नाही.

हेही वाचा