बेळगाव : कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी करोनाच्या आरटीपीसीआर चाचणीची सक्ती अडचणीची ठरत आहे. मात्र, हा निर्णय तसेच अन्य निर्बंध मागे घ्यावेत, अशी सरकारकडे शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विजयादशमीच्या दिवशी म्हैसूर येथे होणारा शाही दसरा पाहण्यासाठी गोव्यातून तसेच महाराष्ट्रातून अनेक जण कर्नाटकातून मार्गस्थ होतात. त्यांना दिलाशाची अपेक्षा आहे. कर्नाटकात करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रवेश करण्यासाठी आयटीपीसीआर चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. गोव्यातून कर्नाटकात जाताना बेळगाव बॉर्डरवर चाचणी केली जाते.
बेळगाव व गोवा अशी लोकांची नेहमीच ये-जा असते. मात्र, नेहमी आरटीपीसीआय चाचणी करणे अडचणीचे ठरत आहे. निर्बंध हटवावे, अशी मागणी बेळगाव, कारवार आणि उत्तर कर्नाटक भागातून वाढत आहे. उत्तर कर्नाटक विभागातील जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात कर्नाटक सरकारला प्रस्ताव सादर केला आहे. बेळगावचे उपायुक्त एम. जी. हिरेमठ यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. मुख्यमंत्री बोम्मई यांनी सद्यस्थिती लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे म्हटले आहे.