लखनऊ : उत्तर प्रदेशातील २६ जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. आतापर्यंत १७,५४४ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. राज्य सरकारच्या माहितीनुसार, पुरामुळे सुमारे ३.५३ लाख नागरिक प्रभावित झाले आहेत. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा पशुधनाची हानी झाल्याची नोंद नाही.
राज्याच्या मदत आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पूरस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाकडून बचाव व मदतकार्य वेगाने सुरू आहे. सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेल्या नागरिकांपैकी ४,८४७ जण सध्या मदत छावण्यांमध्ये आश्रय घेत आहेत. पूरग्रस्त भागांमध्ये नागरिकांना आवश्यक मदत आणि सुरक्षित निवारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.
प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष देण्याचे आवाहन
पूरग्रस्तांना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी प्रशासनातर्फे परिस्थितीनुसार वेळोवेळी देण्यात येत असलेल्या सूचनांचे पालन करावे. पाण्याचा जोरदार प्रवाहात उतरून कुठलीही जोखीम पत्करू नये. एकूण परिस्थिती जाणून घेऊन सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


