जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात विचारणार ४० प्रश्न

२०११च्या तुलनेत १० अतिरिक्त प्रश्नांचा समावेश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th August, 08:56 pm
जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात विचारणार ४० प्रश्न

जनगणनेच्या २०२७ मधील दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्रीय गृह खात्याने ४० प्रश्नांचे परिपत्रक जारी केले आहे. फेब्रुवारी २०२७ मध्ये सुरू होणाऱ्या या टप्प्यात प्रत्यक्ष जनगणनेसह नागरिकांची इतर विस्तृत माहिती गोळा केली जाणार आहे. जनगणना अधिकाऱ्यांना नागरिकांकडून माहिती घेताना याच प्रश्नांचा आधार घ्यावा लागणार आहे.

जनगणना २०११ च्या तुलनेत यावेळी १० अतिरिक्त प्रश्न विचारले जाणार आहेत. यामध्ये नाव, लिंग आणि वय अशा मूलभूत प्रश्नांसह राष्ट्रीयत्व, एकूण बँक खाती, कोविड लस घेतल्याची जागा, मोबाईल, आधार, पासपोर्ट क्रमांक, मतदार ओळखपत्र तसेच आई-वडिलांची माहिती आदींचा समावेश करण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्याला सुरुवात

याआधी जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात गृह जनगणना करण्यात आली आहे. आता दुसऱ्या टप्प्यात नागरिकांची वैयक्तिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक माहिती अधिक सविस्तरपणे नोंदवली जाणार आहे.

४० प्रश्नांद्वारे माहिती संकलनदुसऱ्या टप्प्यात नागरिकांकडून वैवाहिक स्थिती, धर्म, सामाजिक प्रवर्ग, दिव्यांगत्व, मातृभाषा, शिक्षण, रोजगार, स्थलांतर, आर्थिक स्थिती तसेच विविध ओळखपत्रांशी संबंधित माहिती घेतली जाणार आहे.

वैयक्तिक आणि कौटुंबिक माहिती

परिपत्रकानुसार, नागरिकांना घरातील मुख्य व्यक्तीशी असणारे नाते, सध्याची वैवाहिक स्थिती, लग्नावेळीचे वय आणि जोडीदाराचे नाव याबाबत माहिती द्यावी लागेल. याशिवाय धर्म तसेच नागरिक अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती समाजातील असल्यास त्याची माहितीही नोंदवली जाणार आहे.

नागरिकांच्या दिव्यांगत्वाची माहिती घेतली जाणार असून, मातृभाषा आणि समजणाऱ्या अन्य भाषा यांचीही नोंद केली जाईल. साक्षरता तसेच डिजिटल साक्षरतेशी संबंधित माहितीही जनगणना अधिकाऱ्यांकडून विचारली जाणार आहे.

ओळख आणि इतर माहिती

नागरिकांकडून राष्ट्रीयत्व, मोबाईल क्रमांक, आधार, पासपोर्ट क्रमांक, मतदार ओळखपत्र, एकूण बँक खाती, कोविड लस घेतल्याची जागा तसेच आई-वडिलांची माहिती यांसारखी माहितीही घेतली जाणार आहे.

शिक्षण आणि रोजगाराची माहिती

जनगणना अधिकारी नागरिकांचे शिक्षण, शिक्षणाची शाखा आणि मागील एका वर्षातील कामाची माहिती विचारणार आहेत. नागरिकांचा आर्थिक स्तर, व्यवसाय अथवा धंद्याचे स्वरूप, सेवा किंवा अन्य क्षेत्र याबाबतही माहिती घेतली जाणार आहे.

याशिवाय नागरिक रोजगाराच्या शोधात आहेत का, त्याचीही माहिती नोंदवली जाणार आहे. त्यामुळे जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात देशातील रोजगार आणि कामगारवर्गाशी संबंधित माहितीचे व्यापक चित्र उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

स्थलांतराचीही नोंद

नागरिकांचे जन्म ठिकाण, मागील रहिवासाचे ठिकाण आणि स्थलांतराचे कारण यांची माहिती जनगणना अधिकारी घेणार आहेत. सध्याच्या शहरात नागरिक किती कालावधीपासून राहत आहेत, तसेच त्यांचा कायमचा पत्ता काय आहे, याचीही नोंद केली जाणार आहे.

वाहन परवान्याची माहितीही घेणार

जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात नागरिकांकडून वाहन परवान्याची माहितीही घेतली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या वैयक्तिक माहितीसोबतच त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि गतिशीलतेशी संबंधित माहितीचेही संकलन केले जाणार आहे.

२०११ च्या तुलनेत १० अतिरिक्त प्रश्न

२०११ मध्ये झालेल्या मागील जनगणनेच्या तुलनेत यावेळी १० अतिरिक्त प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. डिजिटल साक्षरता, मोबाईल, आधार, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, बँक खाती आणि कोविड लसीकरणासह नागरिकांच्या बदलत्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीशी संबंधित माहिती यावेळी अधिक व्यापकपणे संकलित केली जाणार आहे.

जनगणना २०२७ : दुसरा टप्पाफेब्रुवारी २०२७ पासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष जनगणनेसह नागरिकांची वैयक्तिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, रोजगार आणि स्थलांतराशी संबंधित माहिती ४० प्रश्नांच्या आधारे संकलित केली जाणार आहे.
हेही वाचा
सर्व पहा