कुंपणच शेत खात असेल, तर सुधारणा कशी होणार?

Story: अंतरंग- उत्तर गोवा |
23rd August, 08:10 pm
कुंपणच शेत खात असेल, तर सुधारणा कशी होणार?

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाला राज्य सरकारकडून सुधारगृह संबोधले जाते. या ठिकाणी न्यायालयीन कोठडीतील नवोदित आरोपी, अंडरट्राईल आणि शिक्षा भोगणारे कैदी यांनी स्वतःला गुन्हेगारी मानसिकतेतून बाहेर काढावे आणि समाजात सज्जन व्यक्ती म्हणून वावरावे, असा या सुधारगृहामागचा सरकार किंवा तुरुंग प्रशासनाचा उद्देश आहे. मात्र हा सरकारचा उद्देश खराच सफल होत आहे का, यावर वारंवार प्रश्न उपस्थित होतो आहे.

कारागृहातील कैदी आणि तुरुंग प्रशासनाच्या कारभारावर सवाल उभे करणार्‍या घटना घडत आहेत. त्यामुळे या मध्यवर्ती कारागृहाची सुधारगृहाकडे खरीच वाटचाल सुरू आहे का, हा प्रश्न जनतेला पडणे गैर नाही. कैद्यांमधील गुन्हेगारी वृती कमी व्हावी व ते सुधारले जावेत म्हणून कारागृहात वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. कैदी हे स्वतःच्या पायावर उभे राहावेत व त्यांना कारागृहातून बाहेर पडल्यावर उदरनिर्वाहाची चिंता सतावू नये म्हणून रोजगारयुक्त प्रशिक्षण दिले जाते. यातून काही कैदी सुधारलेही असतील, परंतु ही संख्या तुटपुंजी आहे.

हल्लीच तस्करीचे प्रकरण उघडकीस आले आहे. कारागृहात ड्रग्ज, इतर अमली पदार्थ किंवा मोबाईलसारख्या प्रतिबंधित वस्तूंचा होणारा पुरवठा हा कारागृह सुरक्षा यंत्रणेच्या आशीवार्दानेच होतो आहे, हे सरळसरळ उघड आहे. त्यामुळे कोलवाळ कारागृहात जी काही गैरकृत्ये घडत आहेत, त्यांला सुरक्षा यंत्रणाच कारणीभूत आहेत; म्हणजेच कुंपणच शेत खाण्याचा हा प्रकार आहे.

कैदी आणि कारागृहाच्या सुरक्षेसाठी असलेले अधिकारी-कर्मचारी, कैद्यांना समुपदेशन देणारे समुपदेशक, प्रशिक्षण देणारे परीक्षक हे कैद्यांच्या आमिषांना बळी पडतात. या लोकांची कारागृहात सहजपणे ये-जा असते. स्वतःत सुधारणा करण्यात किंचितही रस नसलेले कैदी अशा लोकांना गाठतात. त्यांना धमकी देऊन, आमिष दाखवून हव्या त्या वस्तू पुरवण्याच्या व्यवस्थेचे जाळे तयार करतात.    

कुंपणाकडून शेत खाण्याच्या या प्रकारामुळेच कारागृहात प्रतिबंधित असलेल्या व्यसनाच्या वस्तू सहजपणे मिळतात. या वस्तू मिळू लागल्यामुळे व्यसनग्रस्त कैद्यांचे व्यसन सुटले जात नाही, व्यसन सुटत नसल्याने त्यांच्यात सुधारणा होत नाही. तसेच कारागृहातून आपल्या गुन्हेगारी कारवाया काही कैद्यांकडून हाताळल्या जातात. याच कारणांमुळे सुधारगृहाचा उद्देश सफल होत नाही.

 कारागृहातील हे सर्व गैरकारभार संपुष्टात आणण्यासाठी सरकारने कैदी आणि तुरुंग प्रशासनाच्या निगडीत कर्मचारी आणि अधिकार्‍यांवर वचक ठेवणण्याबरोबरच त्यांचे योग्यरित्या समुपदेशन करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. यातून तस्करी आणि कारागृहातील गुन्हेगारी कारवायांना आळा बसेल आणि खर्‍या अर्थाने कारागृहाचे सुधारगृहात रूपांतर होण्यास सकारात्मक मदत मिळेल.

- उमेश झर्मेकर