Home >> देश -परदेश >> वनरक्षकांच्या ८ जागा; भरतीला आली फक्त एकच उमेदवार! थेट निवड

वनरक्षकांच्या ८ जागा; भरतीला आली फक्त एकच उमेदवार! थेट निवड

सरकारी नोकऱ्यांसाठी लाखो तरुण धडपडत असताना एमपीमधील या अजब भरतीने वेधले सर्वांचे लक्ष

Story: गोवन वार्ता | वेब डेस्क |
2 hours ago
वनरक्षकांच्या ८ जागा; भरतीला आली फक्त एकच उमेदवार! थेट निवड

सिधी (मध्य प्रदेश):  मित्रांनो, सध्याच्या काळात एक साधी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी लाखो तरुण रक्ताचे पाणी करतात, रात्रंदिवस अभ्यास करतात आणि अटीतटीची स्पर्धा लढतात. पण जर आम्ही तुम्हाला सांगितले की, एका सरकारी भरतीत ८ जागांसाठी फक्त एकच उमेदवार आली आणि तिची थेट निवड झाली, तर तुमचा विश्वास बसेल? कदाचित नाही, पण मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात हा अजब गजब चमत्कार घडला आहे! वनरक्षक (फॉरेस्ट गार्ड) पदाच्या ८ जागांसाठीच्या भरतीत पात्र उमेदवारांचा असा काही दुष्काळ पडला की, सरकारला ८ पैकी तब्बल ७ जागा रिक्त ठेवाव्या लागल्या आहेत.

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, वर्ष २०२६ च्या विशेष भरती मोहिमेअंतर्गत राज्यातील बैगा, भारिया आणि सहारिया या विशेषतः असुरक्षित आदिवासी जमातींसाठी (PVTGs) वनरक्षकांच्या ८ जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेनंतर कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक चाचणीसाठी एकूण २५ पात्र उमेदवारांना बंपर कॉल लेटर्स पाठवण्यात आले होते. पण खरी गोची तेव्हा झाली, जेव्हा प्रत्यक्ष चाचणीच्या दिवशी २५ पैकी फक्त आणि फक्त एकच महिला उमेदवार तिथे हजर झाली.

यातली दुसरी रंजक गोष्ट अशी की, ही एकमेव उमेदवार स्थानिक सिधी जिल्ह्यातील नसून उमरिया जिल्ह्यातील होती. सरकारी नियमांनुसार वनरक्षक पदासाठी महिलांना १५ किलोमीटर आणि पुरुषांना २५ किलोमीटर चालण्याची कठीण चाचणी पूर्ण करावी लागते. या वाघिणीने कोणतीही स्पर्धा नसतानाही हिंमत न हारता सर्व नियम आणि १५ किमी चालण्याची शारीरिक चाचणी यशस्वीपणे पार पाडली. साहजिकच, ती एकमेव असल्याने आणि सर्व अटी पूर्ण केल्याने तिची थेट वनरक्षक म्हणून निवड करण्यात आली.

विभागीय वनअधिकारी (DFO) प्रीती अहिरवार यांनी सांगितले की, संपूर्ण निवड प्रक्रिया शासनाच्या नियमांनुसार अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवण्यात आली. २५ उमेदवारांना बोलावूनही केवळ एकच जण आल्याने तिची निवड झाली. एकीकडे बेरोजगारी आणि कटथ्रोट कॉम्पिटिशनची चर्चा असताना, या 'नो-कॉम्पिटिशन' भरतीने देशाचे लक्ष वेधले आहे. मात्र, २५ जणांपैकी २४ जण भरतीला का आले नाहीत, हा प्रश्न आता प्रशासन आणि स्थानिक आदिवासी समाजासाठी चिंतेचा विषय बनला आहे.

 

हेही वाचा
सर्व पहा