तर सुरक्षेचे नियम तोडून सुर्ला येथील बाराजण धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेला बेळगावचा एक तरुण पाण्यात बुडाला.

पणजी : पावसाळा सुरू होताच निसर्गाचे विहंगम रूप पाहण्यासाठी आणि धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले जंगलांकडे वळू लागतात. मात्र, अनेकदा निसर्गाच्या या रौद्र रूपाचा अंदाज न आल्याने किंवा सुरक्षेच्या नियमांकडे सर्रास दुर्लक्ष केल्याने आनंददायी सहलींचे रूपांतर गंभीर दुर्घटनांमध्ये होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
विर्डी-दोडामार्ग येथील निसर्गरम्य वझरा सकला धबधबा परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या साखळी येथील सहा युवक रविवारी अचानक वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे जंगलात अडकून पडले. सुदैवाने, वन खाते आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेत धाव घेत अत्यंत शिताफीने बचाव मोहीम राबवून या सर्व सहा जणांची सुखरूप सुटका केली. परंतु, दुसरीकडे सुर्ला परिसरातील धबधब्यावर घडलेल्या अन्य एका घटनेमुळे पावसाळी पर्यटनातील धोके आणि पर्यटकांच्या निष्काळजीपणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.
सत्तरी तालुक्यातील ठाणे ग्रामपंचायत क्षेत्रातील सुर्ला गावाजवळ, म्हादई अभयारण्याच्या परिक्षेत्रात असलेल्या बाराजण धबधब्यावर रविवारी दुपारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या धबधब्यावर जाण्यास प्रशासनाने पूर्णपणे बंदी घातली असतानाही, सुमारे दीडशे ते दोनशे पर्यटकांनी वन कर्मचाऱ्यांच्या सूचनांना धाब्यावर बसवून तिथे प्रवेश केला. बेळगाव येथून मित्रांसोबत आलेल्या २० वर्षीय आदित्य दीपक कुमार सत्पती या तरुणाचा पाण्यात उतरल्यानंतर अचानक तोल गेला आणि तो खोल डोहात बुडाला. पाण्याचा वेगवान प्रवाह आणि खोली जास्त असल्यामुळे मित्रांचे त्याला वाचवण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. वाळपई अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक नागरिकांसह बेळगावच्या नौदलाच्या प्रशिक्षित जवानांनी तातडीने शोधकार्य सुरू केले. मात्र, रात्रीच्या अंधारामुळे आणि पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने ही मोहीम तात्पुरती स्थगित करावी लागली. आदित्यचे वडील निवृत्त नौदल अधिकारी असून, या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
तपूर्वी, १८ जून रोजी विर्डी येथील वझरा सकला धबधब्यात बुडून मृत्यू झालेल्या कर्नाटक-धारवाड येथील २३ वर्षीय विजय दोडमणी या तरुणाचा मृतदेह शोधण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना तीन दिवस अथक परिश्रम करावे लागले. 'सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीम'चे बाबल आल्मेडा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने, पाण्याचा प्रचंड दाब आणि इतर नैसर्गिक आव्हानांवर मात करत ड्रोन कॅमेरा आणि स्कुबा डायव्हिंग तज्ज्ञांच्या मदतीने ७ मीटर खोलीवरून हा मृतदेह बाहेर काढला. या घटनांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की, पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह आणि खोलीचा अचूक अंदाज बांधणे अशक्य असते. एका क्षणात पाण्याचा प्रवाह वाढून परतीचे मार्ग बंद होऊ शकतात.
पावसाळी पर्यटनाचा आनंद घेताना प्रत्येकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. वन खाते आणि स्थानिक प्रशासनाने घातलेले निर्बंध हे पर्यटकांच्या सुरक्षेसाठीच असतात. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांशी वाद घालून किंवा चोरट्या मार्गाने प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करणे म्हणजे स्वतःहून मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि वन विभागाचे कर्मचारी या परिसराची भौगोलिक स्थिती चांगल्या प्रकारे जाणतात, त्यामुळे त्यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करणे ही पर्यटकांची प्राथमिक जबाबदारी आहे. तरुणाईने केवळ सोशल मीडियावरील छायाचित्रे आणि साहसाच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालू नये. पावसाळ्यात पाणवठ्याच्या ठिकाणी जाताना अतिउत्साह टाळावा, खोल पाण्यात उतरणे टाळावे आणि प्रशासनाने दिलेल्या खबरदारीच्या इशाऱ्यांचे पालन करावे, जेणेकरून पर्यटनाचा आनंद कायम राहील.