१७२ जणांची चौकशी : अद्याप एकही बांगलादेशी सापडला नाही

पणजी : गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज्यातील भंगार अड्ड्यांवर विशेष पडताळणी मोहीम राबवली. या मोहिमेचा उद्देश कामगारांची ओळख पटवणे आणि बेकायदेशीर स्थलांतरित किंवा वैध कागदपत्रांशिवाय राहणाऱ्या बांगलादेशी व इतर व्यक्तींचा शोध घेणे होता. या प्रकरणी गुन्हा शाखेने १७२ जणांची चौकशी केली. त्यात एकही बांगलादेशी सापडला नसल्याची माहिती समोर आली आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता आणि जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील भंगार अड्ड्यांची विशेष पडताळणी मोहीम हाती घेण्यात आली. त्यासाठी गुन्हे शाखेने ९ पथके तयार करून तपासणी केली. बेकायदेशीर वास्तव्य आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत म्हापसा, कोलवाळ, पर्वरी, बेती, मडगाव, दवर्ली, डिकरपाल, झुआरीनगर, कुठ्ठाळीसह विविध ठिकाणी ४८ भंगार अड्डे तपासण्यात आले. पथकांनी अड्ड्यांमधील कामगार, त्यांची ओळखपत्रे आणि वैयक्तिक माहिती तपासली. यावेळी सुमारे १७२ जणांची चौकशी करण्यात आली असून त्यात एकही बांगलादेशी सापडला नसल्याची माहिती समोर आली आहे.