सरकार, शिक्षण संस्था, शिक्षक, पालक आणि समाज या सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यासच विद्यार्थ्यांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि सकारात्मक शिक्षण वातावरण उपलब्ध करून देता येईल. कारण शिक्षण व्यवस्था सक्षम असेल, तरच देशाचे भविष्यही सक्षम असेल.

देशात शिक्षणाच्या क्षेत्रात शिक्षणाच्या नावाखाली जे काही ‘उद्योग’ चालू आहेत त्यावर लिहायचे म्हटले तर ‘काय लिहू अन् किती लिहू’ अशीच काहीशी अवस्था झाली आहे. आता लिहायचेच ठरवले आहे, तर सध्या एका भरभराटीच्या उद्योगाचे स्वरूप ज्याला मिळाले आहे ती ‘नीट’ शिक्षण पद्धत आणि विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या याची दखल घ्यावीच लागेल. या दोन्ही समस्यांचा एक समान धागा म्हणजे शिक्षणाचे वाढते व्यापारीकरण आणि स्पर्धेचा अतिरेक. ‘नीट’ परीक्षा म्हणजे, तर आताशा असा एक व्यापार होऊन बसला आहे की त्यास आता एका मोठ्या उद्योगाचेच स्वरूप मिळाले दिसते. ‘नीट’ परीक्षा महाघोटाळ्याची एकूण व्याप्ती पाहता अब्जावधींची उलाढाल या उद्योगात झाल्याचे तपासात दिसून आल्यास त्याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. ‘नीट’ उद्योगात पार्टटाईम ‘काम’ करूनही कोट्यवधींची माया जमवणाऱ्या महाराष्ट्रातील पुणे आणि लातूरसारख्या शहरांतील शिक्षकांचे कारनामे पाहिल्यास अदानी आणि अंबानींनाही त्यांचा हेवा वाटावा. पुणे शहर हे तर विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते, पण याच पुणे आणि लातूरमध्ये ‘नीट’ परीक्षा महाघोटाळ्याची मुळे सापडणे हे दुर्दैवी आहे. ‘नीट’ परीक्षा यावेळी रद्दच करण्याची वेळ यावी यातच या महाघोटाळ्याचे गांभीर्य लक्षात येते. २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी ज्यांनी खेळ केला, त्यांना शिक्षक म्हणायचे की कसाई हे कळत नाही; पण अशा शिक्षकांना खरे तर फासावर लटकावयाला हवे जेणेकरून भविष्यात असे 'उद्योग' करणाऱ्यांना चाप बसेल.
‘नीट’ परीक्षा महाघोटाळा असो, विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या असो, वा अन्य काही घटनांकडे पाहता शिक्षण व्यवस्थेसमोर आज जी गंभीर आव्हाने उभी राहिली आहेत त्याची कल्पना येते. ही व्यवस्था अनेक गंभीर समस्यांच्या भोवऱ्यात अडकलेली दिसते. शिक्षण हे केवळ पदवी, गुण किंवा नोकरी मिळविण्याचे साधन नसून व्यक्तिमत्त्व विकास, मूल्यसंस्कार आणि समाजनिर्मितीची प्रक्रिया मानली जाते. मात्र अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि ‘नीट’ परीक्षेशी संबंधित गैरव्यवहारांनी संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. या दोन्ही घटना स्वतंत्र वाटत असल्या, तरी त्यामागे असलेली मूळ कारणे अनेक ठिकाणी समान दिसून येतात. वाढता ताण, स्पर्धेचा अतिरेक, शिक्षणाचे झालेले व्यापारीकरण आणि व्यवस्थेतील दोष हीच त्यामागील कारणे म्हणता येतील. गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झालेली दिसून येते. आपला चिमुकला गोवादेखील त्यास अपवाद राहिलेला नाही. त्याबाबतीतही गोवा राष्ट्रीय प्रवाहात एकरूप झालेला आहे. विशेषतः उच्च शिक्षण संस्थांमध्ये आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये हा प्रश्न अधिक गंभीर होत आहे. परीक्षेतील अपयश, गुणांची स्पर्धा, पालकांच्या अपेक्षा, करिअरविषयीची चिंता, नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यातील अडचणी आणि मानसिक तणाव यामुळे अनेक विद्यार्थी निराशेच्या गर्तेत जात आहेत. काही विद्यार्थ्यांना एकटेपणा, नैराश्य आणि असुरक्षिततेची भावना सतावत असते. दुर्दैवाने, अनेक वेळा त्यांच्या भावनिक स्थितीकडे दुर्लक्ष केले जाते आणि त्याचा शेवट आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयात होतो.
विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची समस्या ही केवळ वैयक्तिक अपयश किंवा मानसिक कमकुवतपणाची बाब नाही. हे आपल्या शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींचे प्रतिबिंब आहे. आजच्या शिक्षणपद्धतीत विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यापेक्षा गुणांना आणि यशाला अधिक महत्त्व दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, भावनिक विकासाला आणि वैयक्तिक क्षमतांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांना स्पर्धेच्या अखंड शर्यतीत ढकलले जात आहे. दुसरीकडे, ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहार आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांनी विद्यार्थ्यांच्या मनातील विश्वासाला मोठा धक्का दिला आहे. लाखो विद्यार्थी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहत अनेक वर्षे कठोर परिश्रम करतात. त्यासाठी पालक मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करतात. परंतु जेव्हा परीक्षा प्रक्रियेतच भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार उघडकीस येतात, तेव्हा विद्यार्थ्यांच्या कष्टांची किंमत कमी झाल्याची भावना निर्माण होते.
‘नीट’ परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटणे किंवा परीक्षा व्यवस्थेतील गोंधळ हा केवळ तांत्रिक दोष नाही, तर संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाचे लक्षण आहे. या घटनांमुळे विद्यार्थ्यांवर पुन्हा परीक्षा देण्याचा मानसिक आणि आर्थिक भार पडतो. एखादा विद्यार्थी महिनोन् महिने अभ्यास करून परीक्षेला बसतो आणि नंतर परीक्षा रद्द झाल्याची बातमी ऐकतो, तेव्हा त्याच्या मनात निर्माण होणारी निराशा सहज समजण्यासारखी आहे. या परिस्थितीत अनेक विद्यार्थ्यांमध्ये तणाव, असुरक्षितता आणि भविष्याबद्दलची भीती वाढणे स्वाभाविकच ठरते.
वाढत्या आत्महत्या आणि ‘नीट’ परीक्षा घोटाळा या दोन्ही समस्यांचा एक समान धागा म्हणजे शिक्षणाचे वाढते व्यापारीकरण. आज अनेक विद्यार्थी कोचिंग क्लासेस, प्रवेश परीक्षा आणि गुणवत्तेच्या शर्यतीमध्ये अडकले आहेत. शिक्षणाचा आनंद हरवत चालला आहे आणि त्याची जागा दबावाने घेतली आहे. प्रत्येक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर किंवा उच्च पदावर पोहोचला पाहिजे, अशी समाजाची आणि पालकांची मानसिकता तयार झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आवडी, क्षमता आणि मानसिक स्वास्थ्य अनेकदा दुर्लक्षित राहते. या समस्यांवर उपाय शोधणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वप्रथम शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे. शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये समुपदेशन केंद्रे प्रभावीपणे कार्यरत असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या भावनिक समस्यांची वेळेवर दखल घेणे आणि त्यांना आवश्यक आधार देणे महत्त्वाचे आहे. तसेच परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुरक्षित बनविण्याची गरज आहे. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून परीक्षा व्यवस्थापनापर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण करणे आवश्यक आहे. आज विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहार या केवळ स्वतंत्र घटना नाहीत; त्या शिक्षण व्यवस्थेला लागलेल्या किडीची गंभीर लक्षणे आहेत. या समस्यांकडे दुर्लक्ष करणे भविष्यासाठी धोकादायक ठरू शकते. सरकार, शिक्षण संस्था, शिक्षक, पालक आणि समाज या सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यासच विद्यार्थ्यांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि सकारात्मक शिक्षण वातावरण उपलब्ध करून देता येईल. कारण शिक्षण व्यवस्था सक्षम असेल, तरच देशाचे भविष्यही सक्षम असेल.

- वामन प्रभू, (लेखक ज्येष्ठ पत्रकार असून, राजकीय तसेच क्रीडा विश्लेषक आहेत) मो. ९८२३१९६३५९