ऊर्जेची भूमिती

जरी तुम्ही या क्षणापर्यंत सर्व प्रकारच्या आसक्त प्रवृत्तींच्या अधीन असलात, तरीही जर तुम्ही आता, या क्षणी जाणीवपूर्वक प्रतिसाद दिला, तर तुमच्यामध्ये आणि तुमच्याकडे असलेल्या संचित प्रवृत्तींमध्ये एक ठराविक अंतर निर्माण होईल

Story: विचारचक्र |
08th February, 11:35 pm
ऊर्जेची भूमिती

सद्गुरू : या भौतिक अस्तित्वाला आणि ऊर्जा अस्तित्वाला एक विशिष्ट प्रकारची भूमिती असते. विश्वातील प्रत्येक गोष्ट, अगदी अणूपासून ते ब्रह्मांडापर्यंत, ती ज्या प्रकारे कार्य करत असते, ती त्या भूमितीय परिपूर्णतेमुळेच तशा प्रकारे कार्य करत असते. भूमितीमधील सर्वात मूलभूत आणि स्थिर आकारांपैकी एक आकार म्हणजे त्रिकोण. मानवी ऊर्जा प्रणालीमध्ये, दोन समभुज त्रिकोण असतात – एक खालील बाजूस वरच्या दिशेने टोक असलेला त्रिकोण आणि दुसरा वरच्या बाजूस खालच्या दिशेने टोक असलेला त्रिकोण. सामान्यतः, हे दोन्ही त्रिकोण अनाहत चक्राच्या अगदी वरच्या बाजूस एकत्र मिळतात. आपले मन आणि कल्पनाशक्ती यांच्या द्वारे कार्य करण्यासाठी, या दोन त्रिकोणांची मांडणी संरेखित करणे महत्त्वाचे आहे. एका आदर्श मांडणीमध्ये, वरच्या दिशेने टोक असलेला त्रिकोण आणि खालच्या दिशेने टोक असलेला त्रिकोण एकमेकांना छेदून एक परिपूर्ण सहा-टोक असलेल्या ताऱ्याचा आकार तयार करतात, ज्याच्या बाहेरील बाजूस सहा समभुज त्रिकोण असतात.

आवश्यक अशा संरेखनाद्वारे, तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर करू शकता आणि तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी तुम्ही तुमच्या बाह्य जगात साकार करू शकता. तुमच्या कल्पनाशक्तीची शक्ती विकसित करण्यासाठी, तुम्हाला वरच्या दिशेने टोक असलेला त्रिकोण आणखी वर उचलून विशुद्धी चक्रापर्यंत न्यावा लागेल, जो तुमच्या कल्पनाशक्तीचा मूलभूत आधार आहे. तो वरच्या दिशेने नेऊन तिथेच कायम स्वरूपी ठेवण्यासाठी काही ठराविक साधना आहेत. जर तुमच्याकडे अशी कोणतीही साधना नसेल, तर हे साध्य करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे, काही ठराविक काळासाठी काहीही न खाणे. साधारणपणे, जेव्हा पोट रिकामे असते, तेव्हा वरच्या दिशेने टोक असलेला त्रिकोण आपोआप वरच्या दिशेने उचलला जातो. एकदा का तुम्ही काही खाल्ले, तर तो पुन्हा खाली येतो.

आपल्या शरीरातील ७२,००० नाड्या, म्हणजेच ऊर्जा वाहिन्यांमध्ये, ११४ महत्त्वाची संधिस्थाने आहेत, जिथे या सर्व नाड्या एकत्र येतात आणि पुन्हा वितरित होतात. संधिस्थानांच्या या बिंदूंना चक्रे म्हणून ओळखले जाते, ज्याचा शब्दशः अर्थ 'चाक' किंवा 'वर्तुळ' असा होतो, जरी त्यांचा आकार त्रिकोणी असला तरी. या ११४ चक्रांपैकी, दोन चक्रे आपल्या भौतिक शरीर क्षेत्राच्या बाहेर आहेत. उर्वरित ११२ चक्रांपैकी, काही चक्रे शरीराच्या विशिष्ट भागांमध्ये स्थित आहेत. बाकीची चक्रे काही प्रमाणात गतिशील असू शकतात.

ही चक्रे कशा प्रकारे हालचाल करतात, हे तुम्ही स्वतःसोबत काय करता यावर अवलंबून असते. जर तुम्हाला विविध प्रकारची कार्ये पार पाडण्यासाठी स्वतःला सक्षम करायचे असेल, तर शरीराच्या प्राणिक शरीरविज्ञानाला त्यानुसार जुळवून घेता आले पाहिजे. या चक्रांना गतिशील ठेवण्यासाठी आवश्यक ते कार्य करणे महत्त्वाचे आहे, कारण हीच गतिशीलता ठरवते की, तुम्ही विविध प्रकारच्या परिस्थितींमध्ये किती प्रभावी आहात. बहुतेक मानवांच्या बाबतीत समस्या ही आहे की, एका परिस्थितीत ते चांगले कार्य करतात, तर दुसऱ्या परिस्थितीत त्यांची अवस्था पूर्णपणे गोंधळलेली असते. याचे कारण हे आहे की, ते फक्त एका ठराविक पद्धतीनेच विचार करू शकतात, अनुभवू शकतात आणि वागू शकतात.

काही प्रमाणात केलेल्या सरावाने तुम्ही सर्व काही चांगल्या प्रकारे करू शकाल. पण तुमची ऊर्जा प्रणाली जर ताठर असेल, तर हे शक्य होणार नाही. म्हणून, तुमची ऊर्जा प्रणाली लवचिक ठेवणे महत्त्वाचे आहे, केवळ आपण जगात विविध प्रकारची कार्ये करू इच्छितो म्हणून नाही, तर यामुळे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत अगदी सहजपणे राहता येते. सहज आणि शांत राहण्यासाठी, तुमची ऊर्जा प्रणाली लवचिक असणे आवश्यक आहे. ही ११२ चक्रे तुम्हाला तुमच्या अंतिम स्वरूपापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवेशद्वार म्हणून वापरली जाऊ शकतात. म्हणूनच आदियोगींनी अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्याचे ११२ मार्ग सांगितले आहेत.

मूलभूत गोष्ट म्हणजे या दोन त्रिकोणांचा छेदनबिंदू. जर तुम्ही दोन समभुज त्रिकोणांना एकमेकांना अशा प्रकारे छेदू दिले की, ते सहा समभुज त्रिकोणांनी बनलेला एक तारा तयार करतील, तर तुमची ऊर्जा प्रणाली संतुलित होते आणि ती खूप ग्रहणशील बनते.


जर तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीबद्दल निश्चित असे निष्कर्ष असतील, तर ही ग्रहणशीलता टिकून राहत नाही. तुमच्याकडे जितक्या जास्त प्रमाणात निष्कर्ष असतील, तितक्या जास्त प्रमाणात तुमच्या मनात आणि शरीरात ताठरता येईल. विश्वातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आनंदाने गोंधळलेले असणे म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे सतत लक्ष देत आहात. एकदा का तुम्हाला कळले की, तुम्हाला काहीही माहित नाही, तेव्हा तुम्ही ग्रहणशील बनता.

जर तुम्ही दररोज हठयोग करत असाल, तर तुमच्या असे लक्षात येईल की, ज्या दिवशी तुमचा दृष्टिकोन ताठर असतो, त्या दिवशी तुमचे शरीर योग्य प्रकारे वाकत नाही. दुसऱ्या दिवशी, जेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या लवचिक असता, तेव्हा तुमचे शरीर खूप चांगल्या प्रकारे वाकते. तुमच्या चेतनेचे स्वरूप हे तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये, तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षणी प्रकट होत आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी आपल्या चेतनेच्या स्वरूपामुळेच निर्माण झाली आहे, ही गोष्ट आपण समजून घेतलेली नाही.

आपण मानव म्हणून ते सर्व काही करतो, जे इतर प्राणी करतात - आपण खातो, झोपतो आणि प्रजनन करतो. पण यात सर्वात महत्त्वाचा फरक हा आहे की, आपण या सर्व गोष्टी जाणीवपूर्वक करू शकतो. म्हणून हा आसक्त प्रवृत्तींकडून जागरूकतेकडे केलेला प्रवास आहे. जागरूकता तुम्हाला तुमच्या आसक्त प्रवृत्तींपासून मुक्त होण्याची शक्यता प्रदान करते. जरी तुम्ही या क्षणापर्यंत सर्व प्रकारच्या आसक्त प्रवृत्तींच्या अधीन असलात, तरीही जर तुम्ही आता, या क्षणी जाणीवपूर्वक प्रतिसाद दिला, तर तुमच्यामध्ये आणि तुमच्याकडे असलेल्या संचित प्रवृत्तींमध्ये एक ठराविक अंतर निर्माण होईल. जर तुम्ही या जीवनाचा प्रत्येक पैलू जाणीवपूर्वक हाताळला - केवळ कृतीतूनच नाही, तर विचार, भावना आणि ऊर्जेमध्येही - तर तुम्ही जगाच्या शिखरावर असाल.


सद्गुरू

(ईशा फाऊंडेशन)