बसवर डोंगरावरून कोसळला ढिगारा

हिमाचलमध्ये दुर्घटना : १५ जणांचा मृत्यू, चौघांना वाचवले


08th October, 12:38 am
बसवर डोंगरावरून कोसळला ढिगारा

जेसीबीच्या साहाय्याने बसवरील मातीचा ढिगारा हटवताना बचाव पथक.

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
बिलासपूर : हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी एका प्रवासी बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला. या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. बसमध्ये अडकलेल्या चौघांना वाचवण्यात आले. अपघातानंतर लगेचच एसडीआरएफ, पोलीस आणि स्थानिकांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्यासह इतरांनी दुःख व्यक्त केले आहे.
बिलासपूरचे पोलीस अधीक्षक संदीप धवल यांनी सांगितले की, बसवरील ढिगारा बहुतांश हटवण्यात आला आहे. बसमध्ये आणखी काही प्रवासी अडकले आहेत का, याची खात्री करण्यासाठी उरलेले दगड जलदगतीने काढण्यात येत आहेत. मंगळवारी सकाळपासून बिलासपूरसह राज्यातील बहुतेक भागात पाऊस सुरू आहे. सायंकाळी ६.२५ वाजता बर्थिनजवळील भालू येथे अचानक डोंगराचा ढिगारा बसवर कोसळला. बस मारोटनहून घुमरविनला जात होती. अपघातानंतर बसचे फक्त छतच दिसत होते. स्थानिकांकडून माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी पोहोचले.
अपघातात चालक, कंडक्टरचा मृत्यू
अपघातात चालक आणि कंडक्टरसह १५ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये नऊ पुरुष, चार महिला आणि दोन मुले आहेत. दोन जखमी मुलांना (एक मुलगा आणि एक मुलगी) प्राथमिक उपचारानंतर एम्समध्ये हलवण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, बिलासपूर येथील अपघातात झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीबद्दल मनापासून दुःख झाले आहे. या कठीण काळात पीडित लोक आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपये मदत दिली जाईल. जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत दिली जाईल.

हेही वाचा