डिजिटलमुळे पारदर्शक कारभार शक्य !

पंतप्रधानांचे उद्गार : ‘ग्लोबल कॉन्फरन्स ऑन सायबर स्पेस’ परिषदेचे उद्घाटन


24th November 2017, 03:02 am

नवी दिल्ली : जनधन खाते, आधार आणि मोबाईल फोन हे तीन घटक भ्रष्टाचार संपवण्यात आणि पारदर्शक कारभारात महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. शेतकऱ्यांनाही डिजिटल सुविधा उपलब्ध करून देत असून, कृषी क्षेत्रातही तंत्रज्ञानाचा वापर वाढवत आहोत. भारतातील जनता आता कॅशलेस व्यवहारांवर भर देत आहे. भारतीय नागरिक ‘भीम' अॅपचा वापर करत असून यामुळे भारत विकासाची नवी उंची गाठेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
दिल्लीत ‘ग्लोबल कॉन्फरन्स ऑन सायबर स्पेस' या परिषदेचे गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. १२० देशांमधील सायबर तज्ज्ञ या परिषदेत सहभागी झाले आहेत. या परिषदेत मोदी म्हणाले, गेल्या दोन दशकांत डिजिटल विश्वातील बदल आपण सर्वांनीच पाहिले आहेत. १९७० च्या दशकातील मोठमोठे संगणक आजही आठवतात. डिजिटल क्षेत्रात भारताची स्पर्धा ही विकसित देशांशी आहे. मोबाईल फोन आता डेटा स्टोरेज आणि संवादाचे नवे साधन ठरू लागले आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. केंद्र सरकारने सुरू केलेल्या विविध अॅप्सचीही त्यांनी या कार्यक्रमात माहिती.
सोशल मीडियाने डिजिटल क्षेत्रात सर्वांना समान संधी उपलब्ध करून दिल्या. तरुणांना त्यांची कल्पकता दाखवण्यासाठी इंटरनेट हे उत्तम माध्यम आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

मोबाईलचा वापर सशक्तीकरणासाठी
आयटी क्षेत्रात भारतातील तरुणांनी जगावर छाप पाडली असून, त्यामुळे भारतीय प्रतिभेची सर्वांना ओळख झाली. भारतीय कंपन्यांनी आयटी क्षेत्रात नाव कमावले आहे. तंत्रज्ञानाने सर्व बंधने तोडले असून, भारतीय विचारधाराही अशीच आहे. ‘वसुधैव कुटुंबकम' हीच आमची विचारधारा आहे. भारतात सर्वसामान्यांना डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. मोबाईलचा वापर आम्ही नागरिकांना सशक्त करण्यासाठी करत आहोत. यात ‘आधार'चीही मदत घेतली जात आहे. ‘आधार'चा वापर केल्याने लोकांना दरवेळी रांगेत उभे राहण्याची गरज नाही, असा दावा पंतप्रधानांनी केला. 

डिजिटल विश्व दहशतवादी व कट्टरतावाद्यांसाठी मोकळे मैदान ठरू नये, याची जबाबदारी प्रत्येक देशाने घेतली पाहिजे. सायबर सुरक्षा हा आगामी काळातील सर्वात मोठा विषय असून सुरक्षा यंत्रणांनी माहितीची देवाण-घेवाण करण्याची आवश्यकता आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान